एक माणूस - सुरतेचा अब्दुलचाचा

मी कधीच विसरणार नाही अशी माणुसकी एकदा अनुभवली.

१९९० मध्ये कंपनीतर्फे बडोद्याला गेलो. लहान वय असल्यामुळे व फारसा प्रवास केलेला नसल्यामुळे प्रवासाची धमाल वाटायची.

काम संपले त्या दिवशी मिळेल ती एस. टी घेऊन पुणे गाठायचे ठरवले व स्थानकावर गेलो. गुजरात एस. टी तासाभराने होती.

गुजरातच्या शासकीय बसला मधोमध दार असते.

दाराच्या आत गेल्यावर दाराच्या बाजूलाच उजवीकडच्या पहिल्याच सीटवर कंदक्टरसाहेब एकटे बसतात. त्यांच्या मागच्या सीटवर मी दोनपैकी एक मोठी बॅग ठेवली लहान बॅग हातातून घेऊन कंडक्टरला 'एक मिनिटात पाण्याचे पाउच घेऊन येतो' असे म्हणालो. (इतका वेळ का घेतले नाही असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण माहीत नाही कसे, पण राहून गेले होते. ) कंडक्टर त्यावर हो म्हणाला.

मी धावत जाऊन स्टॉलवर गेलो. पाऊच घेऊन एक रुपया द्यायला जेवढा वेळ लागला तो साधारन एक मिनीट असावा कारण तेथे इतरही काही ग्राहक काही गोष्टी घेत होते. मागे पाहतो तर बस गुल्ल!

चौकशी केली तर कळले की बस अगदी वेळेवर लागते व वेळेवर निघते.

कंडक्टरला सांगीतले होते म्हणालो तर एकजण म्हणला बस गेलेली नाही, त्या बाजूला उभी असते.

धावत तिकडे गेलो तर तिकडे प्राचीन बसेसचे अवशेष ठेवलेले होते. पुन्हा धावत आलो तर जुन्या जागी नवीनच बस होती. ती चालली होती भलतीकडेच.

आपली बस गेली हे मला खात्रीलायकरीत्या कळले. धावाधाव करून मी एक रिक्षा बोलवली. त्याला म्हणालो जास्त पैसे घे पण पुण्याकडे जाणाऱ्या बसचा पाठलाग कर. कसे काय माहीत नाही, पण त्याने ऐकले व तुफान वेगात अँब्युलन्स सारखी रिक्षा पळवली. दहा मिनिटांनी एका हमरस्त्यावर एक बस पुढे जात असलेली दिसली. माझी खात्री झाली, हीच बस आपली. रिक्षावाला तुफान उत्साहाने व ऍचिव्हमेंट च्या सेन्सने त्या बसच्या पुढे आला. मी उतरलो. रस्त्यात ति बस थांबवली तर ती होती भरूचची! त्या ड्रायव्हरला कहाणी सांगीतल्यावर तो म्हणला पुण्याची बस आणखीन पुढे आहे. मग निराश झालो. ड्रायव्हर म्हणला झगेडिया नाक्यावर सोडतो. मला काही समजत नव्हते, पण बहुतेक माझ्याच रस्त्यावर कुठेतरी तो सोडनार असावा हे समजले. रिक्षावाल्याने फक्त वीस रुपये घेतले व गेला.

नवीन बसच्या कंडक्टरने 'नवे तिकीत काढावे लागेल' हे घुश्यात सांगीतले. अर्थातच मान्य केले. बस चालू झाली. मी इतर बसेसकडे खिडकीतून पाहत होतो. लोकांना हळूहळू माझी कहाणी समजल्यावर मग कंडक्टर आला व म्हणाला 'आसारामजींची आठवण काढा, मिळेल बॅग! ' मला काय? काढली आठवण! माझी मूळ बस काही जाम दिसेना. बर, ही बसही वेगात होतीच, पण तरी दिसेना!

जवळजवळ पाउण तासाने झगेडिया का कुठलातरी नाका आला.

मी उतरलो. त्या नाक्यावरच्या माणसाने सांगीतले 'अगदी पाचच मिनिटांपुर्वी पुण्याची बस इथून गेली'. क्षणाक्षणाला निराशा दाटत होती. मी ज्या बसमधून आलो त्याच्या द्रायव्हर कंडक्टरने मला हात केला व ती बस निघून गेली.

नाक्यावरचा माणूस म्हणाला ' सुरत स्टँदला फोन करा'. 'अब्दुल म्हणून आहेत त्यांच्याशी बोला'. मी फोन केला.

कोण अब्दुल काय माहीत? पण त्यांनी फोन उचलला व माझी माहिती ऐकली. तो माणूस बोलायला भलताच संतापी वाटला.

'तुमची तुम्ही काळजी घेत नाही, बॅग ठेवून उतरायचे कशाला, आम्हाला इथे कामे नाहीत का, आणि ती बस तर म्हणे सुरतला येतच नाही' - बोंबला! येतच नाही तर इतका चिडला कशाला तेच समजेना. मी नाक्यावरच्या माणसाला विचारले तर तो म्हणाला ती बस थेट नवसारीला जाते, सुरत स्थानकावर जात नाही, पण बाहेरचा रस्ता स्थानकापासून पाच दहा मिनिटांवर आहे, केली तर अब्दुल मदत करतील'.

मी पुन्हा अब्दुल यांना फोन केला. ते आणखीनच तावातावाने बोलले. पण मी ऐकून घेतले. कारण सुरतजवळचा रस्ता हे माझे बॅग मिळू शकण्याचे बहुतेक शेवटचे ठिकाण होते. कारण एकदा नवसारीला पब्लिक आत बाहेर करायला लागले की संपले. मी त्यांना सांगीतले की दुसऱ्या बसने मी सुरत स्थानकात येत आहे. त्यांनी फोन आपटला. माझी आशा जवळजवळ संपली.

जवळजवळ सव्वा तासाने मी स्थानकात पोचलो. अब्दुलसाहेब कोण म्हणून खिदकीत चौकशी केली. एक वय झालेले गृहस्थ आत उभे होते. त्यांनी माझे नाव विचारले. माहिती दिल्यावर म्हणाले 'काय काय होते बॅगेत?' मग मी वस्तूंची यादी सांगितली.

त्यांनी माझी बॅग काढून माझ्या हातात दिली व मिष्कील हासले.

माझ्या आयुष्यात तोवर इतका माणुसकीचा प्रसंग आलेला नव्हता. मी स्पीचलेस झालेलो होतो.

त्यांनी मग किस्सा सांगीतला. नाक्यावरून मी निघाल्यानंतर नाक्यावर फोन करून त्यांनी पुण्याची बस तिथून गेल्याचे टायमिंग घेतले. ती बस सुरतच्या बायपासवर येण्या आधी जवळजवळ पंधरा मिनिटे ते तिथे उभे राहिले. बस आल्यावर आतली बॅग ताब्यात घेतली. 
कंडक्टरला चार शब्द सुनावले. त्यानेही चक्क ऐकून घेतले यावरून त्यांना मी बरोबर असावा असे वाटले म्हणे! कंडक्टरनेही बेगची काळजी घेतली होती असे तो त्यांना म्हणाला.

मी त्यांना विचारले मी आपल्यासाठी काय करू शकतो? ते 'काही नको' म्हणाले. मी शेवटी 'चहा घ्याल का' विचारले तर त्यालाही ते नाही म्हणाले.

मी घरी फोन करून बॅग मिळाल्याचे सांगीतले व नाशिकची दुसरी बस धरली.

कुठे कुठे 'माणसे' भेटतील काही सांगता येत नाही. खिसेकापू व बॅगचोरांपासून सावध राहा अशा पाट्या असनाऱ्या ठिकाणी माझी बॅग सहिसलामत!

-सविनय
बेफिकीर!