" दुःख-भेट "

हे ही बरेच झाले की आयुष्याच्या प्रारंभीच 'ती' निघून गेली...

हे ही बरेच झाले की दुःखाशी ओळख ही तेव्हाच होऊन गेली...

'ती' भेटली नाही परत कधी नंतर...

अगदी रस्त्यावर चालताना अनेक अनोळखी चेहरे दिसतात तशीसुद्धा नाही...

पण तिने ओळख करून दिलेले दुःख.. ते मात्र सातत्याने भेटते...

अगदी हौसेने घरी बोलावलेल्या पाहुण्यासार्खे...

मग त्याला विचारतो मी " काय साहेब बरयाच दिवसानी येणे केलेत"

ते शांतपणे ऊसासा टाकून उत्तरते " मित्रा मला काही तु एकटाच नाहीस "

आत्महत्या, खुन, चक्रीवादळे, भुकंप, युद्धे आणि अधून मधून येणारया रोगाच्य साथी....

सगळीकडे मला एकट्यालाच लक्ष ठेवावे लागते बाबा...

मग गप्पा मारताना ऐकवतो आम्ही एकमेकाना.. भंगलेल्या प्रेमवीरांचे विनोद...

तेव्हढीच होते करमणुक माझी.. अन त्या दुःखाचीही...

परत जाताना ते जोरात टाळी देऊन म्हणते " धन्यवाद मित्रा".. बरे झाले तु भेटलास...

नाहीतर आमच्या नशिबात कायमच नुसता आरडा-ओरडा, वेदना,अश्रू अन रडगाणी...

साला हसतमुखाने कुणी स्वागतच करत नाही आपले.. शेवटी मी तरी किती सहन करायचे...

मग मीच थोडा धीर देतो त्याला.. समजुतीचे चार शब्द सांगुन...

म्हणतो आभार मानायचेच असतील तर 'तिचे' मान.. जिने आपली ओळख करून दिली...

हो पण लांबुनच बर का.. 'तिच्या' जवळपास ही न जाता...

कारण त्या नाजुक वळणावरून वळल्यावर जरी 'तिने' परत मागे फिरून पाहीले नाही...

पण तिकडे वळण्याआधी ती फक्त मागेच पाहत होती हे ही विसरून चालणार नाही...