लग्नाचा करार

करारपत्राच्या चिटोऱ्यावर;

आपण दोघानींही सह्या केल्या;

अकरा महिन्यांसाठीच का होईना;

नवराबायकोच्या भूमिका पत्करल्या.

तो करार ठरत होता जोखड;

आपण दोघांनीही मानेवर घेतलेलं;

अति महत्त्वाकांक्षेच्या नादात;

आपण जगालाच वेडं ठरवलेलं.

खरंतर आपलं हे नातं;

बघायला गेलं तर नाईलाजाचंच होतं;

थोडं तुझ्या फायद्याचं अन्;

थोडं माझ्याही फायद्याचं होतं.

आपल्या दोघांचं एकाच घरात राहणं;

भावनेला अडवत शब्दांना नाचवणं;

तुझं नि माझं हे नातं निभावणं;

अन् झालेल्या कराराची आठवण ठेवणं

भावनांच्या कोंडाळ्यात पडतो एखादा प्रश्न.

कशासाठी करायचं हे सारं?

जगाला फसवत; स्वतः फसत;

कशासाठी पेलायचं हे ओझं?

का धमकच नव्हती आपल्यात;

नाही पटलं तर जुळवून घ्यायची;

अन् दोघांनीही केलेली चूक;

दोघांनीच सावरायची.

हळू हळू आपल्याला समजत जाईल;

लागतच थोडसं दुःख संसार गोड करायला;

म्हणून तर टाकतो आपण मिठाची चिमुट;

गोड सरबताला चव आणायला.

कदाचित कळेलही या करारानंतर;

जुळतील आपले सूर आयुष्याच्या सतारीवर;

पण नंतर शरीराने एकत्र येउनसुद्धा;

आपली मनं मात्र राहतील काठावर.

आता फक्त इतकच कळतंय;

जगाचे नियम टाळताना आपले अपवाद झाले होते;

करारपत्राप्रमाणे लग्न जगताना;

सप्तपदी अन् अक्षतांचे दुष्काळ सोसले होते.