आज पपांचा पिट्टू अमेरिकेतून येणार होता.आता तो काही पिट्टू राहिला नव्हता.आता तो तरणाबांड ,उंचापुरा ऐटबाज युवक सुमेध झाला होता त्याचा दोन वर्षापूर्वीचा फोटो पपांना आठवत होता. तरुणपणी आपण असेच दिसत होतो हे पपांना आठवले.या दोन वर्षात मात्र तो फिरकला नव्हता.मधूनमधून त्याचे फोन येत आणि पपांशीही त्याचे बोलणे होई. पण का कोण जाणे त्याच्या बोलण्यात पहिला उत्साह जाणवत नसे.त्याचा आवाजही पूर्वीसारखा वाटत नसे.काय फरक झाला आहे हे काही पपांना समजत नव्हते,मीताला विचारले तर "पपा तुम्ही उगीचच काळजी करता सगळ ठीक चालल आहे" अस ती सांगायची.
सहा वर्षापूर्वीच सुमेध अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला आणि आपल्या हुशारीमुळे जॉर्जिया विद्यापीठातील त्याच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सर्व पारितोषिकांचा मानकरी झाला. पदवीदानसमारंभाचे फोटो त्याने पाठवले होते.खर म्हणजे त्या समारंभास जातीने हजर रहाण्याची पपांची फार इच्छा होती,पण त्याना व्हिसा काही वेळेत मिळाला नाही आणि मग जाण्यात त्याना काही उत्साह उरला नाही.पदवी घेतानाचा आणि पदवी हातात घेऊन त्याचे काढलेले फोटो बघून पपांना आनंद तर झालाच पण त्या फोटोत सुमेधने मिशांना चाट दिलेली पाहून त्याना बरे वाटले नाही.आपल्या घराण्यात बाप मेल्याशिवाय कोणी मिशी उतरवत नाही असे त्यांनी विशालला बोलूनही दाखवले,पण त्यानेही "ही हल्लीची मुल त्यांचा या गोष्टींवर विश्वास नसतो पपा " अस म्हटल्यावर किमान विशालची तरी मिशी अजून शाबूत आहे हेच आपल भाग्य अशी त्यानी स्वत:ची समजूत घातली.
सुमेध आला की त्याच लग्न करून टाकायचा हा बेत त्यानी पक्का केला होता.विशालसारखेच त्याने अमेरिकेत काही जमवले नाहीना याची त्यानी मीता आणि विशालकडून पुन्हापुन्हा विचारून खात्री करून घेतली होती.आणि त्यासाठी आपल्या अगदी जवळच्या मित्राची नात त्यानी मनात पक्की ठरवून ठेवली होती.
मात्र विशाल,मीता आणि ममासुद्धा त्याना वारंवार सबुरीचा सल्ला का देत होते हे त्यांना लक्षात येत नव्हते,पण त्याना काहीतरी एक अशी गोष्ट माहीत आहे की जी ते आपल्यापासून लपवून ठेवत आहेत असा ठाम संशय मात्र त्याना आला होता.
विमानतळावर जाण्यासाठी पपांची केव्हापासून तयारी चालू होती. मात्र त्यांना इतक्या दूरवा पल्ला कारने जाणे त्यांच्या प्रकृतीला मानवणार नाही असे विशालने म्हटल्यावर मात्र त्यांचा पारा चढला
"आप क्या समझते है मै बूढा हो गया हूं ?" असे म्हणत सगळ्यांची त्यांनी इतक्या कडक शब्दात हजेरी घेतली की त्यावर काहीही न बोलणेच श्रेयस्कर असा निर्णय घेऊन सगळेजणच विमानतळावर निघाले.
नेहमीप्रमाणेच विमानतळावर तुडुंब गर्दी होतीच.सुमेधची फ्लाइट आल्याची घोषणा झाली आणि पपांना केव्हा एकदा नातवाला पहातोय आणि मिठीत घेतोय असे होऊन गेले. इतक्या गर्दीत तो आपल्याला कसा सापडेल याचीच चिंता त्याना लागून राहिली,पण अर्ध्या तासातच विशालचा मोबाइल वाजला आणि मीताला,"अग सुमेधा येतेय "अस म्हणताना त्यानी ऐकले आणि हा अस का म्हणाला याचा त्यानी विचारही केला नाही म्हटला असेल घाईत अशी स्वत:ची समजूत त्यांनी घातली.आणि पंधरा मिनिटातच ड्रायव्हर मारुतीने "आल्या बरका ताई."अस म्हटल्यावर त्याने दाखवलेल्या दिशेने त्यानी आपले डोळे बारीक करत दृष्टी टाकली आणि त्यांच्या दिशेने हसत हसत येणाऱ्या एका गुलाबी गालाच्या कुरळ्या केसांच्या तरुणीने मीता आणि विशालकडे पाहून हात उंचावून हलवला तेव्हां त्याना हा काय प्रकार आहे काहीच कळेना,"अरे विशाल सुमेध कोठे आहे ?"पण विशालने काही उत्तर देण्यापूर्वीच ती तरुणीच पुढे येवून पपांच्या पायाला हात लावत म्हणाली,"पपाजी मीच तुमचा सुमेध पण आता सुमेधा "
विशालने त्यांच्या खांद्याला स्पर्श करीत म्हटले,"पापाजी अब घर चलिये,मै सबकुछ समझाता हूं आपको."
पपांना आता काही सांगायची आवश्यकता उरली नाही.आपण इतका खटाटोप करून डॉ.विश्वासच्या सहाय्याने निसर्गावर एकदा मात केली पण शेवटी मात्र निसर्गानेच आपल्यावर मात केली याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि ते स्वत:शीच उद्गारले,"हेचि फल काय मम तपाला ?"
ही कथा बऱ्याच वर्षापूर्वी लिहिली होती. त्यामुळे शेवट ज्या प्रकारे केला आहे त्यात आजच्या परिस्थितीत बदल करावा वाटतो तो पुढीलप्रमाणे असेल आणि मग कथेचे शीर्षकही " जे झाले ते चांगलेच ! "असे बदलावे लागेल.
पण विशालच्या कानात कुजबुजावे तसे ते म्हणाले,"विशाल बेटा,मला समजले सगळे.सुमेधमध्ये बदल घडावा ही ईश्वराचीच इच्छा .आम्ही एकदा प्रयत्न केला विधिलिखित बदलण्याचा पण यही उसके भाग्यमे लिखा था । आणखी एक सांगतो जो होता है वही अच्छाही होता है ।"
विशाल आश्चर्याने पपांकडे पहात राहिला.तो स्वत:,मीता आणि ममासुद्धा मानसिक दृष्ट्या या गोष्टीला पहिल्यापासूनच तयार होते.त्यामुळे आपल्यात होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक बदलाविषयी आणि शेवटी पूर्णपणे आपण सुमेधा झाल्याची गोष्ट सुमेधने त्यांच्यापासून लपवून ठेवली नव्हती मात्र पपांना ती कितपत मानवेल याविषयी साशंक असल्यामुळेच ती त्यांच्यापासून लपवण्यात आली होती पण आता त्यांची प्रतिक्रिया पाहून त्याना आश्चर्य वाटले.
"क्षमा कीजिये पपाजी आपसे ये बात हमने इसलिये छुपायी थी की ---- "
"बस बस समजलो मी आणि त्या बाबतीत मी तुम्हाला दोष नाही देणार --"त्याला मध्येच थांबवत पपा म्हणाले.
" झाले त्यात वाईट काय आहे? जो हुवा वो अच्छाही हुवा है । इसलिये गम किस बातका ? सबको खुषही होना चाहिये।अब जमाना लडकियोंकाही है, देखो कल वोही राज करनेवाली है ।कल उन्हीका है । " आणि पपांच्या उत्साहात सगळे वातावरण आनंदमय झाले.