२० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग ३

जीसी  सुनील खेर चार दिवसाच्या सुट्टीवर गेला होता. तो परत काही आला नव्हता.   तो गेल्या पासून आजचा पाचवा दिवस होता. आम्ही काळजीत होतो. तो कोठे असेल आता, येईल का परत. सुट्टी वरून उशीराने परत जरी आला तरी आय एम ए च्या नियमानुसार त्याचे काय होईल. त्याचा तो निग्रही चेहरा आठवून आम्हाला वारंवार वाईट वाटत होते. आठ महीने एकत्र रगडा खाल्लेले आम्ही जीसी, एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतो. त्यातून तो आमच्याच बटालियनचा, आमच्याच कंपनी मधला व आमच्याच प्लटूनचा. मला दोन गोष्टींची काळजी लागून राहिली होती. तो परत येईल का, व तो त्याच्या आईला कोठे सोडणार – त्याची आई घर सोडून कोठे जाईल, कोठे राहील व तिचे कसे होईल.

कोणाला जर का फर्मावले की, तुमचे राहते घर तडकाफडकी खाली करा व चालते व्हा तर काय वाटेल त्या कुटुंबाला. कोठे राहतील, कसे होईल. त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल. कोणाला आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या अशा अचानक घडामोडी पाहिल्या की पूर्व संचित म्हणून काही असते का असा विचार डोकावून जातो. वाटते, आपण असतो तर त्यांच्या जागी. त्यांनाच का ही पिडा. जी लोकं संचित मानत नाहीत, ते अशा घडामोडींकडे कसे पाहतात. लॉटरी लागण्या एवढी निसर्गात ही प्रोसेस रॅन्डम असते असे जे संचित मानीत नाहीत ते सुचीत करतात. संचिताला अंधश्रद्धा म्हणून त्याविरुद्ध बोलत राहतात. अंधश्रद्धा मानू नये हे खरे आहे. पण कोणती गोष्ट अंधश्रद्धा मानावी व कोणती नाही हे कोण ठरवणार. डोळस श्रद्धा असते का. का श्रद्धा हाच एक भंपकपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संचित म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांना जर स्वतः उद्या अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी ते निसर्गातील एक रॅन्डम प्रोसेसचा भाग आहे असे समजतील का त्या वेळेला सोयीने त्यांच्या दृष्टिकोनात फरक येईल. ह्याचे उत्तर मी अजून शोधत आहे. संचित जर नसेलच तर अशा घटनांना निसर्ग नियम म्हणून आपण विषय संपवू शकतो का. अशा घटना काहींनाच का भोगाव्या लागतात ह्या प्रक्रियेला काही नाव व कारण देऊ शकतो का.

सुनील खेर गेल्या पासून आमच्या डोक्यात एकच विषय – त्याचे काय झाले व आय एम एत परतला तर काय होणार.
 आमच्या रोजच्या कार्यक्रमात सुनील गेल्याने काही बदल झाला नाही. नाही म्हणायला आमचा डि एस कॅप्टन गिल आम्हाला सांगून गेला होता की सुनीलच्या बद्दल काहीही माहिती समजल्यास त्वरित कळवा. सुनील सुट्टीवर गेल्याच्या सहाव्या दिवशी जीसी सुनीलच्या खोलीत आम्हाला दिवा लागलेला दिसला. आमच्या जिवात जीव आला. आम्ही पि टी परेड ला जायच्या आधी त्याला भेटलो. कॅप्टन गिलनी निरोप पाठवला की जीसी सुनीलला आठ वाजता कंपनी कमांडरने त्याच्या ऑफिस मध्ये बोलावले आहे. आम्हाला त्याच्याशी बोलून गेल्या सहा दिवसांचा हिशोब घ्यायला वेळच नव्हता. तो आम्ही संध्याकाळसाठी सोडला, व आम्ही पि टी परेडला गेलो. त्याचे रेलीगेशन होणार का त्याला काढून टाकणार अशा अटकळी लावे पर्यंत संध्याकाळ झाली. जीसी सुनील दिवसभर दिसला नाही. संध्याकाळी जेवायच्या वेळेला भेटला. खूप थकल्या सारखा वाटत होता. पण चिंता कमी झाली होती. आम्ही आतूर होतो त्याच्या दोन्ही गोष्टी ऐकायला. एक तर तो सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा आला होता व त्यामुळे बटालीयन कमांडरने त्याचे काय केले हे ऐकायचे होते व त्याच्या आईचे काय झाले, सुखरूप आहे का कशी आहे हे दुसरे. ह्या दोन्ही गोष्टी ऐकूया त्याच्याच शब्दात...............

 ज्या दिवशी भदराजवरून आल्यावर मला आईची तार मिळाली व त्या नंतर सुट्टी मिळत नाही असे कळले तसा मी खूप उदास झालो. कर्नल कटोच ह्यांचा भयंकर राग आला होता. आईची आठवण येत होती. काळजी लागली होती. कशातच लक्ष लागत नव्हते. डोक्यात गोंधळ उडाला होता. संध्याकाळ झाली तसा एक एक क्षण एक तासा सारखा जाणवत होता. शांत राहा, १ ते १० मोजा, उलटी गिनती करा, देवाचे नाव घ्या, डोळे मिटून स्वस्थ बसा हे सगळे डोके शांत ठेवण्यासाठी करायचे उपाय माहीत असून राहून गेले. हे उपाय करायचे सुद्धा स्वारस्य राहिले नव्हते. मलाच माहीत होते काय परिस्थिती होती खोऱ्यात ती. सगळ्यात वाईट वाटत होते ते कर्नल कटोच ह्यांचा माझ्या सुट्टी मागण्याच्या कारणावर विश्वास बसला नव्हता ह्या गोष्टीचा. खोऱ्यातले वातावरण हळू हळू बदलायला लागले होते. रोज जवळच्या मशिदीतून प्रक्षोभक भाषणे सुरू झाली होती. रोज कोणते न कोणते काश्मिरी हिंदू कुटुंब खोरे सोडून जाण्याचा विचार करत होते व जात होते. तेव्हा आम्हाला काय माहिती होते की त्याची परिणती काश्मिरी हिंदूंचे खोरे सोडून जाण्याची सगळ्यात मोठ्या विस्थापनात होणार आहे ते. ह्या आधी सहादा असे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंचे स्थलांतरण झाले होते.   पहिले स्थलांतरण तेराव्या शतकात झाले – सुलतान शमसुद्दीनने मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरांची तो़ड फोड करून हिंदूंना धाक दाखवून पळवून लावले असा इतिहास आहे. १४ व्या शतकात दुसरे व तिसरे स्थलांतरण, सुलतान अली शाहच्या जाचक सुलतानशाहीने उद्भवले. त्याने पहिल्यांदा काश्मीर मध्ये हिंदूंवर जिझिया कर सुरू केला. १४ व्या शतकातच पुढे मीर शमसुद्दीन इराकी ह्या नवाबाने जोर जबरदस्तीने हजारो हिंदूंना पळवून लावले. चवथे व सगळ्यात मोठे स्थलांतरण १६ व्या शतकातले. औरंगजेबाच्या बादशाहीत झाले. गुरू तेग बहादूर, शिखांच्या नवव्या गुरुंना प्राणाना मुकावे लागले ह्या बादशहाशी लढता लढता. हा औरंगजेबाच्या काळातील इतिहास पाहता असे वाटते की जसे महाराष्ट्राला शिवाजी राजे मिळाले तसे काश्मीरला लाभले असते तर कदाचित इतिहास काही वेगळा झाला असता. पण काश्मिरी हिंदूंपेक्षा महाराष्ट्रातल्या हिंदूंचे नशीब जास्त बलवोत्तर होते असेच म्हणावे लागेल. पाचवे  स्थलांतरण, १७ व्या शतकात मुल्ला अब्दुल ह्याच्या नवाबीत झाले. सहावे स्थलांतरण, अफघाण सुलतांनांच्या क्रूर कारवायांमुळे झाले. १९८९-९० सालातले सातवे स्थलांतरण पाकीस्तानच्या ऑपरेशन टोपूक मुळे होत होते. ते त्यावेळेला आम्हाला अवगत नव्हते. कोणालाच माहीत नव्हते. कोठल्याही देशा पुढील समस्येवर मानसिक दृष्टिकोन बदलायला वेळ लागतो. खूपदा लोकांना समजे पर्यंत वेळ निघून गेलेली असते. ह्या सगळ्या सहा स्थलांतराने एकेकाळी काश्मीर मध्ये फक्त हिंदूच होते ते १९४८ मध्ये फक्त १० टक्के राहिले. हिंदूंची संख्या सातव्या स्थलांतरानंतर १ टक्का राहिली. ज्या समाजाला इतिहासाचा विसर पडला तो समाज संपला हे आम्हाला सातव्यांदा कळणार होते. ह्या कलियुगात शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच फक्त सत्य आहे बाकी सभ्यता वगैरे सोयीच्या गोष्टी आहेत. आपल्या जवळ ती लाठी का नसते कधी. सभ्यता ह्या नावाखाली आपण लाठी सोडली हे खरे पण दुसरे सोडतात की नाही हे पाहिले नाही. दुसऱ्याने घेतली तर तेवढ्या पुरती तरी आपण लाठी घेतली पाहिजे नाहीतर शतकानुशतके हे असेच चालत राहणार. पूर्वी क्रृर सुलतानशाही होती आता एक क्रृर असे शेजारी राष्ट्र आहे.    

 १९८९ च्या सुरवातीला हिंदूंचे एखाद दुसरे कुटुंब सोडून गेल्याचे ऐकीवात होते. त्यात हळू हळू वाढ होऊ लागली. हळू हळू अतिरेकी प्रेरित हिंदूंच्या स्थलांतराची मोहीम कशी पाकीस्तानच्या ऑपरेशन टोपूक प्रमाणे घडत आहे ती आमच्या लक्षात यायला लागली. खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण करायचे. कोठच्यातरी गल्लीतल्या एका दोघा तरुणाला किंवा काश्मिरी हिंदूला मारायचे. त्याचे परिणाम लागलीच त्या गल्लीतल्या इतर हिंदूंवर व्हावयाचे. गर्भगळीत अवस्थेत ती गल्लीची गल्ली रिकामी होऊन खोरे सोडून जायची. ह्याच बरोबर सतत मशिदीदतून होणारी प्रक्षोभक भाषणे एक प्रकारचे भयानक तणावाचे वातावरण निर्माण करायचे. त्यात हिंदूना काफिर म्हणवून त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारण्याची मुस्लिम जनतेला हाक असायची. खोऱ्यात अशा प्रकारचा तणाव कायम असायचा. कधी कोणा हिंदूला पळवून धाक निर्माण करायचा. कोणा हिंदूचे घर जाळून त्या गल्लीतल्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे, असे वारंवार घडू लागले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, राज्याचे प्रशासन दिलासा वाटण्यासारखे काही करत आहे असे आढळत नव्हते. तो विश्वास राहिलाच नव्हता. अतिरेक्यांना फार काही करावे लागायचे नाही. गल्लीतल्या कोणा हिंदूला मारले की गल्लीतले सगळे हिंदू आपले सामान घेऊन पसार व्हायचे. त्यामुळे जर कोणी मानव हत्या किती झाली ह्यावरच फक्त क्रूरता ठरवणार असेल तर मानव हत्या फार झाली नाही. सगळे मिळून २५० ते ३०० हिंदूंची हत्या झाली असेल. पण महिलांवर सततचे अत्याचार करुन, हिंदूंना पळवून नेऊन, धाक धप्पटशहा दाखवून, घाबरवून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून स्थलांतरण करायला अनावृत्त केलं गेले. वाईट ह्याचेच वाटत होते की पाकिस्तान हे हिंदूंना पळवून लावायचे व इथल्या मुस्लिम जनतेला चिथवण्याचे काम त्यांचे परराष्ट्रधोरण म्हणून ऑपरेशन टोपूकच्या नावा खाली राबवत होता, व आपल्या सरकारला हे समजत नव्हते. इथले मुस्लिम पण जिहादाच्या नावाखाली भरकटून जात होते व काश्मिरी हिंदूंच्या विरुद्ध शस्त्र घेऊन सज्ज होत होते. तशातच कलम ३७० लागू होते. त्यामुळे काश्मिरात एकी कडे कोणाला स्थायिक होता यायचे नाही व दुसरी कडे हजारोंच्या संख्येने असलेले काश्मिरी हिंदू लोकं खोऱ्यातून जात होते. त्यामुळे साहजिकच खोऱ्यातल्या काश्मिरी हिंदूंच्या संख्येत घट पडत चालली होती.  

संध्याकाळी कॅप्टन गिल माझ्या रूमवर आला तो म्हणाला बटालीयन कमांडरला अजून सुद्धा वाटते की जीसी रोजच्या आय एम एच्या रगाड्यातून काही दिवस सुटण्यासाठी सुट्टी घेऊन जाण्याचा कांगावा करत आहे. १९८९ च्या सुरवातीच्या काळात काश्मीरच्या बाहेर काश्मीरच्या स्थितीवर अगदी त्रोटक बातम्या यायला लागल्या होत्या. त्या मुळे काश्मिरी हिंदूंच्या विस्थापना बरोबर उत्पन्न होणाऱ्या अडचणी व काश्मिरी हिंदू कुटूंबियांना झेलावे लागणारे प्रश्न आणि बिकट परिस्थितीशी बाकीची जनता अवगत नव्हती. काश्मीर बाहेर राहणाऱ्या लोकांना कानावर पडणाऱ्या बातम्यांनी काश्मीर मधली खरी स्थिती किती गंभीर रूप घेत आहे हे समजले नव्हते. ह्याचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर व काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होत होता. माझ्या सुट्टीच्या अर्जात दिलेल्या कारणा बद्दल सुद्धा हेच झाले असावे. बटालियन कमांडरच्या दृष्टीने माझा सुट्टीचा अर्ज अवाजवी होता. ह्या उलट कॅप्टन गिल जरी कठोर होता तरी आमचा प्लटून कमांडर असल्या मुळे आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ भेटायचा. आमचे प्रश्न तो जाणायचा.

 तो मला म्हणाला की - संध्याकाळी बटालियन कमांडरने मला परत बोलावले होते. मी त्यांना सांगितले की जी सी सुनील खेरच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे वडील आधीच अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत व अजूनही बेपत्ता आहेत. आता हीच परिस्थिती त्याच्या आईवर येऊन ठेपली आहे. कर्नल कटोच ह्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर तुला चार दिवसाची सुट्टी देऊ केली आहे. चार दिवसात परत ये नाहीतर मी दिलेला शब्द वाया जाईल. कॅप्टन गिलने चार दिवसाच्या सुट्टीचे पत्र माझ्या हातात दिले व म्हणाला सुट्टी जरी उद्या पासून सुरू होत आहे तरी आजच रात्री जायची परवानगी तुला देतो. माझ्या जिवात जीव आला. हुरूप आला. आता एक नवा प्रश्न उभा राहिला माझ्या समोर. चार दिवस – ह्या चार दिवसात डेहराडूनहून खोऱ्यात जायचे व आईचा राहण्याचा कोठेतरी बंदोबस्त करून परत यायचे. भदराजचा कॅंप मला ह्याच्या पुढे एकदम सोपा वाटायला लागला.

मला सुट्टी तर मिळाली आता चार दिवसात येण्याचा आराखडा ठरवत मी माझे मोजकेच सामान बांधले. मित्रांकडून काही पैसे उसने घेतले व रात्रीच्या बसने डेहराडूनहून निघालो. दिल्लीहून जम्मूला सुट्टीच्या पहिल्या दिवशी रात्री पोहोचलो. कॅप्टन गिलने रात्रीच जाऊ दिले होते म्हणून बरे झाले नाहीतर अजूनच वेळ लागला असता. जम्मू ते  श्रीनगर अशा एक दिवसाच्या रस्त्याला दोन दिवस लागले पोहोचायला. बर्फवृष्टी मुळे बनीहाल घाटात असणारा जवाहर बोगदा बंद होता. त्यामुळे एक रात्र रामबन येथेच काढावी लागली होती. जवाहर बोगदा थंडीत नेहमीच असा मधून मधून बंद असतो. रामबनला थांबणे माझ्या जिवावर आले होते. कारण सुट्टीचा एक दिवस वाया जाणार होता. मजल दर मजल करत तिसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचलो. मला बघून आईला आनंद व थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटले नव्हते मला सुट्टी मिळेल असे. आम्हाला एकमेकांशी आय एम एतल्या गोष्टी करायला वेळच नव्हता. राहते घर सोडून जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आईला खूप वाईट वाटत होते. सामान कसे घेऊन जायचे हा प्रश्न होता. वडिलांचा अजून पत्ता नव्हता. शेवटी आम्हाला दोघांना नेता येईल इतकेच सामान घेऊन जायचे असे ठरले. मग सामान बांधायला वेळ लागला नाही.

(क्रमशः)

(राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)

दुवा क्र. १ (मराठी ब्लॉग) (मराठी ब्लॉग)
दुवा क्र. २