काचेची बरणी आणि २ कप चहा

आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवुन पहा.


तत्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरु झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरुन झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणुन विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणी हळुच ती बरणी हलवली.  बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यानी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालुन चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले "आता जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा. पिंगपाँगचे बॉल ही महत्त्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार.  उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी.


"आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड खडे यांच्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणी सारी शक्ती लहान लहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा..आपल्या सुखासाठी महत्त्वाचं काय आहे त्याकडे लश द्या.


"आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला बाहेर जेवायला घेऊन जा. घराची साफ़-सफ़ाई करायला आणि टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल."


"पिंगपाँगच्या बॉलची  काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरे महत्त्व आहे. प्रथम काय करायचे आहे हे ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."


सरांचे बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं - "यात चहा म्हणजे काय?"


सर हसले आणि म्हणाले - "बरं झालं तु विचारलंस. तुझ्या प्रश्नाचा अर्थच असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर एक-दोन कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते."