गझल
काय गर्दी माजली सर्वत्र गाजरपारख्यांची!
केवढी कोंडीच होते, जागजागी शाहण्यांची!!
आज बाजारात चलती निरनिराळ्या गाजरांची!
आज चोरांना न भीती राहिलेली चांदण्यांची!!
सूर्य ढळण्याचीच खोटी काय ती होती खरोखर;
पाहण्याजोगीच असते ऐट नंतर काजव्यांची!
कोण संध्याअर्चना करतो, निरामिष राहतो रे?
लाज वाटू लागली का जानव्यांना जानव्यांची?
चार शेरांची शिते अन् शायरांची ही भुतावळ......
लागते स्पर्धाच, तारे तोडण्या भांबरभुत्यांची!
वाट अडवायास केव्हाचे उभे हे वाटमारे!
मी इथे येताच भंबेरी उडाली भामट्यांची!!
लोक सारे दामटाया लागले भरधाव घोडे.....
जायची ऐकू कशी कोणास पिरपिर पारव्यांची?
भेट घेण्याला पुरेशी, आज एखादीच टिचकी!
माणसे नाहीत, नुसती भेट होते सावल्यांची!!
कोणता धरबंध नाही बोलण्याचा, चालण्याचा......
कैकदा करुनी गुन्हे, माफी हवी त्यांना गुन्ह्यांची!
फक्त बोलाची कढी अन् भात बोलाचाच त्यांचा!
तो बळीराजा पहातो वाट त्यांच्या कालव्यांची!!
पाखरे सुद्धा किती झाली समंजस अन् शहाणी!
ओळखू आलीच पोंची त्यांस फांसेपारध्यांची!!
सावकारांहून जास्ती चोर झालेले शहाणे!
बदलत्या काळासवे शैली बदलते चोरट्यांची!!
वाबऱ्या पोरांस नसते काळजी मातापित्यांची!
मायबापांनाच खाते खंत त्यांच्या कारट्यांची!!
मी भिडस्तासारखा सोज्वळ, न काही बोलणारा!
पर्वणी झालो जणू सगळ्याच इथल्या फावड्यांची!!
रंगबेरंगी पतंगांचे पहातो खेळ आम्ही......
लागली आम्हासही आता चटक या खेळण्यांची!
भिरभिराया लागती ते निवडणूकांच्या हवेने!
केवढी जनतेस आवड कागदी या भिरभिऱ्यांची!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१