देवाचे खाते

"देवाचे वचन" या मथळ्याखाली मनोगतावर एक एका वाक्याचा लेख प्रसिद्ध झाला होता. अनेक वाक्ये असलेल्या कांही प्रतिक्रिया त्बावर आल्या होत्या. कांही लोकांनी हे कुठल्या देवाचे वचन आहे याची चौकशी केली होती तर कांहीनी याबाबत माहिती दिली होती. मुळात देव आहे की नाही, असे कोणी म्हणते किंवा म्हणत नाही, देवाला बोलायला येते किंवा नाही वगैरे मुद्दे मांडणारे कांही प्रतिसाद होते. त्यातील कांही सरळ सोपे होते, कांहीमध्ये उपरोध, उपहास, विपर्यास वगैरे अलंकारांचा प्रयोग केला होता. त्यामधील एका प्रतिसादात केलेला "देवाचे खाते" हा शब्दप्रयोग मला आवडला व त्याबद्दल थोडेसे लिहावेसे वाटले.


जन्माला आलेले मूल नुसतेच डोळे मिचकावत असते. त्याला पांच ज्ञानेंद्रियामधून मिळणाऱ्या संदेशांचे कितपत आकलन होते ते कळायला मार्ग नाही. हळू हळू त्याची नजर स्थिर होते. चेहरा व आवाज ओळखून ते प्रतिसाद देऊ लागते. शब्दाशब्दाने भाषा शिकते. बोलायला लागल्यावर अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पालकांच्याकडे नसतात किंवा कांही कारणाने त्यांना ती द्यायची नसतात. यातूनच "देवाचे खाते" उघडले जाते. जे जे आपल्याला माहीत नाही किंवा करता येणे शक्य नाही ते सगळे त्याच्या खात्यात मांडले जाते. त्या क्षणी तरी हा सर्वात सोपा मार्ग वाटतो. जसजसे त्याचे ज्ञान वाढत जाईल तसतशा कांही गोष्टी देवाच्या खात्यातून त्याच्या खात्यात जमा होतात. पण देवाचे खाते त्यामुळे कमी होते कां?


'कां', 'कुणी','कधी', 'कुठे', 'कसे', 'कशामुळे' 'कशासाठी', वगैरे प्रश्नरूपी दरवाजे ज्ञानाच्या प्रत्येक दालनाला असल्यामुळे कोठलाही एक दरवाजा उघडताच त्या दालनातील विहंगम दृष्य दिसते, तेथील गोष्टींचा आस्वाद घेता येतो पण त्याचबरोबर अनेक बंद दरवाजे समोर दिसतात. वेगवेगळे लोक त्यातून त्यांना आकर्षक वाटतील असे दरवाजे उघडून पलीकडील दृष्य पाहतात व जगाला दाखवतात अशा प्रकारे ज्ञानाचा सतत विस्तार व प्रसार होत जातो. या परिस्थितीत कोणालाही सगळे कांही समजले आहे ही स्थिती कधी येणेच अशक्य आहे. जेवढ्या गोष्टी देवाच्या खात्यातून माणसाच्या खात्यात वर्ग होतील त्याच्या अनेक पट गोष्टी देवाच्या खात्यात (निदान गॉड नोज या सदराखाली) वाढत जातील.


उदाहरणादाखल पहा. फक्त दहा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात संगणक आला, आज त्यावर काम करतांना अनपेक्षित गोष्टी घडतात. जेंव्हा आपली चूक लक्षात येते तेंव्हा आपण "ऊप्स" म्हणतो, नाही आली तर "गॉड नोज". यापायी दिवसातून किती तरी वेळा तसे म्हणावे लागते. दहा वर्षापूर्वी हे नव्हते. म्हणजे देवाचे खाते वाढतच चालले आहे.


पुलंच्या एका लेखात लिहिले आहे की कोणीतरी कोणाला विचारले,


 "हे गाणे कोण गाते आहे?
"लता मंगेशकर."
"ती घरात बसली आहे कां?"


"नाही. तिचा आवाज रेडिओतून येतो आहे."
"ती झुरळासारखी रेडिओच्या आत शिरून बसली आहे कां?"
"नाही. गाण्याच्या रेडिओ लहरी रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित केल्या जात आहेत"
"म्हणजे ती आता तिथे बसली आहे कां?" 
"नाही. ते पूर्वीच रेकॉर्ड केलं होतं"


 "म्हणजे कोणी व कधी?", "बरं मग पुढे काय?", "ते आतां कसे ऐकू येते आहे?" टेप, डिस्क, प्लेअर, ट्रान्स्मिटर, रिसीव्हर, फिल्टर, स्पीकर इ.इ.
शेवटी पु.ल. म्हणतात "तू असाच बोलत रहा. कांही मिनिटांनी तुलाच समजेल की तुला कांही समजलेले नाही."
माणसाचे खाते संपून गेले की पुढे सगळे देवाचे खाते.