मोक्षप्राप्ती

मोक्षप्राप्ती   


           वंदनीय मावशींच्या अथक प्रयत्नांमुळे समितीची कीर्ती दैदीप्यमान शिखरावर पोहोचली. मावशींचे स्वप्न साकार करण्यासाठी सेविका सर्वत्र सदैव प्रयत्नशील होत्या व समितीच्या शाखा वेगवेगळ्या राज्यात पसरल्या होत्या. 

             इ‌. स. १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली तेंव्हा मावशींची दूरदृष्टी, साहस, व्यवस्थापन कौशल्य, हुशारी व हजरजबाबीपणा पुन्हा एकदा दिसून आला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती त्याचा समितीच्या कार्यावरही परिणाम झाला. तरीसुद्धा मावशींनी प्रत्येकाला आत्मविश्वासाने         व ध्यैर्याने तोंड देण्यास व लढण्यास प्रेरित केले. लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली होती. सरकार दडपशाहीचा वापर जनतेचा आवाज बंद करण्यासाठी करत होते. स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबीयांना पकडण्यात येत होते व तुरुंगवासही भोगावा लागत होता. रा‌‌. स्वं. संघावरील बंदी उठवण्यात यावी याकरता बिकट परिस्थितीत मावशींनी सेविकांना संघटित केले व विविध राज्यात सत्याग्रहाचे आयोजन केले. सेविकांनी पोलिसांच्या दडपशाहीचा फटका बसलेल्या कुटुंबांना मदत केली व त्यांचे सांत्वन केले. आणीबाणीच्या काळातही समितीचे प्रशिक्षण वर्ग, प्रात्यक्षिके, व्याख्याने नियमितपणे सुरु होती. सेविकांना त्यामुळे मोठी शक्ती व ध्यैर्य प्राप्त झाले. ह्याचाच परिणाम असा झाला की सेविकांनी आपल्या पतीला व कुटुंबीयांना सरकारच्या अत्याचाराला ध्यैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा दिली. सेविकांनी त्यांच्या अडचणी न सांगता उलट आपल्या पतीला लढण्यास स्फूर्ती दिली. १९७५-७७ ह्या आणीबाणींच्या दोन वर्षाच्या कालखंडात समितीचे कार्य पूर्ण जोमाने व ताकदीने सुरु होते.

                मावशींची तब्येत खालावत होती तरी त्यांचे दौरे व समितीचे कार्य अखंडित सुरु होते. १९७७ साली समितीचे राष्ट्रीय अधिवेशन भाग्यनगर येथे पोंगलच्या सुटीदरम्यान करायचे ठरले होते. परंतु दुर्दैवाने आंध्रप्रदेशाच्या सागरी किनाऱ्याला समुद्री वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे अपरिमित जीवित व वित्तहानी झाली. अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत अधिवेशन घेणे योग्य आहे वा नाही हे ठरवण्यासाठी समितीची बैठक घेण्यात आली. बऱ्याच विचारविनिमयानंतर समितीचे अधिवेशन कमीत कमी खर्चात करावे व उरलेला निधी मदत कार्यासाठी उपयोगात आणावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लगेचच सेविकांनी मदत कार्यास स्वतःला वाहून घेतले.  

              भाग्यनगरचे अधिवेशन सुरळितपणे पार पडले. अधिवेशनातील भाषणात मावशींनी गीतेत सांगितलेल्या स्त्रियांच्या सात शक्तींबद्दल भाष्य केले. मावशींनी त्यांची मते विषयाला धरून असलेल्या हृदयस्पर्शी व मनावर बिंबणाऱ्या उदाहरणांनी पटवून दिली. मावशींनी जेंव्हा सेविकांचा निरोप घेतला तेंव्हा कुणालाही कदाचित ही मावशींची अखेरची भेट असेल असे मनातही आले नाही.
अधिवेशन झाल्यावर मावशी नागपूरला परतल्या. रामनवमी नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली. मे महिन्यात उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नेहमीप्रमाणे करण्यात आले. प्रकृती खालावत असतांनाही मावशींनी त्याचे सर्व आखलेले दौरे केले. प्रत्येकाला मावशींनी विश्रांती घेणे गरजेचे आहे हे जाणवत असले तरी मावशींना तसे सांगण्याचे धैर्य एकाजवळही नव्हते.  कष्ट आणि केवळ कष्ट हेच मावशींचे जीवन बनले होते.

             १९७८च्या ऑगस्टमध्ये आखिलं भारतीय कार्यकारिणीची सभा घेण्यात आली. पूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांचा आराखडा ठरवण्यात आला. मावशींनी खेड्यापाड्यातील व आदिवासी भागातील जनतेच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावे असे मत आग्रहाने मांडले. मावशींना भागवत कथेचे सामुदायिक वाचन व श्रवण व्हावे असे नेहमी वाटे. परंतु कार्यबाहुल्यामुळे ही इच्छा त्यांना पूर्ण करता आली नव्हती. विदर्भातील प्रसिद्ध संत श्री. अच्युत महाराजांनी अहिल्या मंदिरात भागवताची कथा वाचून मावशींची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण केली. मावशींना आत्यंतिक समाधान लाभले. धार्मिक व राजकीय मुद्द्यांवर मावशींची महाराजांशी चर्चा झाली. सप्टेंबर महिन्यात भरतनगरला रामायणाचे वर्ग घ्यायचे होते. जाणे येणे सोयीचे व्हावे म्हणून मावशी त्यांची मुलगी वत्सला हिच्याजवळ राहण्यास गेल्या. ज्यांना ही रामायणाची प्रशिक्षण मालिका ऐकायला मिळाली ते आनंदित झाले होते. हा आनंद संपू नये असेच त्यांना वाटत होते. परमेश्वराने मनात दुसरेच काही योजले आहे याची श्रोत्यांना एवढीही जाणीव नव्हती . या व्याख्यानमालेत मावशींचा आत्मा जगाचे भान विसरुन श्रीरामाशी केव्हाच एकरूप झाला होता.

            रामकथेची समाप्ती झाली त्या मध्यरात्री मावशींना थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्या जेमतेम न्हाणीघरात गेल्या आणि तेथे भोवळ येऊन पडल्या. डॉक्टरांनी मावशींना हृदयविकाराचा झटका आला आहे असे निदान केले व मावशींना तातडीने नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात हालविले.

               डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यमंत्री व सेविका डॉ. प्रमिलाताई टोपले मावशींना सर्वोत्कृष्ट सेवा मिळते आहे ना हे पाहण्यास इस्पितळात स्वतः जातीने आल्या. जेंव्हा मावशींच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली तेंव्हा आपल्या उपचारासाठी असलेली अद्ययावत उपकरणे व औषधे पाहून मावशींनी "इतर गरजू रूग्णांना देखील अशीच उपचाराची सोय उपलब्ध आहे ना की मला विशेष सवलती देण्यात आल्या आहेत?" असा प्रश्न डॉक्टरांना विचारला व जेंव्हा त्यांना तीच सेवा प्रत्येक रूग्णांला उपलब्ध आहे याचे आश्वासन डॉक्टरांकडून मिळाले तेव्हाच मावशींनी उपचार सुरु ठेवण्यास संमती दिली.

               मावशींच्या आजारपणाची बातमी आकाशवाणी व नियतकालिकांमधून देशभर पसरली. मावशींची भेट घेण्यास लोकांना मज्जाव होता तरीही अतिदक्षता विभागासमोर त्यांना भेटायला येणाऱ्यांची खूप मोठी रांग होती. मावशींना विश्रांतीची गरज आहे तेंव्हा त्यामध्ये व्यत्यय आणू नका हे भेटायला येणाऱ्यांना कसे समजावावे हे डॉक्टरांनाही समजत नव्हते.  सर्व डॉक्टर, परिचारिका, आणि इतर कर्मचारी रोज सकाळी मावशींना शुभेच्छा देत व त्यांना नमस्कार करून आपल्या दिनक्रमाची सुरुवात करीत.  डॉक्टरांनी भेटायला येणाऱ्यांना जरी मावशींना विश्रांती घेऊ द्या असे सांगितले तरी ते मावशींबरोबर रामायण व इतर विषयांवर बोलण्याचा मोह आवरू शकत नव्हते.

                सगळेजण मावशींची प्रकृती सुधारते ह्या विचाराने सुटकेचा श्वास सोडणार तेवढ्यात मावशींना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. पुन्हा सगळीकडे चिंतातूर वातावरण पसरले. मावशींच्या आजारातही समितीचे दैनंदिन कार्य नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते. अहिल्या मंदिरातील प्रशिक्षण वर्गासाठी केरळातील सेविका सुद्धा आल्या होत्या. त्यांना मावशींना भेटण्याची खूप इच्छा होती. त्यांना हिंदी येत नव्हते आणि मावशींना मल्याळम्. तरीसुद्धा त्यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याला भाषेचे बंधन जाणवले नाही.
दिवाळीला मावशी इस्पितळातच होत्या. मावशींच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. डॉक्टर प्रमिलाताई टोपले ह्यांनी पुन्हा एकदा सगळ्या डॉक्टरांची भेट घेतली. मावशींच्या प्रकृतीतील सुधारणा पाहून त्यांना आनंद झाला व या बातमीने सेविकासुद्धा आनंदित झाल्या.  अहिल्या मंदिरात काय काय शुश्रुषाव्यवस्था उभारावी लागेल त्याची आखणी सेविकांनी केली. एकीकडे त्यासंबंधी विविध सेविकांनी वाटून घेतलेल्या कामांची यादी करण्यात येत होती  व दुसरीकडे सेविका मावशींना इस्पितळातून घरी आणण्यासाठी उत्साहाने तयारीस लागल्या होत्या. परंतु दैवाच्या मनात वेगळेच होते. आपण सर्व दैवाच्या हातातली खेळणी आहोत हे त्या सेविकांना कळले नाही!

              २५ नोव्हेंबर १९७८ रोजी मावशींनी सेविकांबरोबर किरकोळ चर्चा केली. त्यावेळी मावशी उत्साही दिसत होत्या आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसत होती. झाशी राणी चौकात राणी लक्ष्मीबाईंचा जन्मदिन साजरा करण्याचे ठरले होते. त्यासंबंधी सर्व सूचना मावशींनी सेविकांना दिल्या होत्या. मावशींनी त्यांना निरांजन वाऱ्याने विझू नये म्हणून काळजी घेण्यास सांगितले होते. परंतु स्वतःच्या आयुष्याचा दिवा विझू नये म्हणून मात्र त्यांनी सेविकांना सूचना दिल्या नाहीत! मावशींचा आत्मा वैकुंठाला जाण्याची तयारी करत होता याची कल्पना कुणालाही नव्हती.

               २७ नोव्हेंबर १९७८ रोजी पहाटे ३ च्या सुमारास मावशींना अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टर ताबडतोब त्यांच्या जवळ उपचारासाठी धावले पण त्या प्रयत्नांना यश आले नाही.  पहाटे ३वा.४०मि. मावशींचा आत्मा अनंतात विलीन झाला ,जणू काय ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी  स्वर्गात साजरी करण्याचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले होते.


                 आकाशवाणीवरून सकाळच्या बातम्यांत ही दुःखद वार्ता प्रसारित करण्यात आली तेंव्हा सगळीकडे धक्कादायक व दुःखद वातावरण पसरले.  लोकांनी त्यांच्या लाडक्या व प्रिय मावशींचे शेवटचे दर्शन घेण्याकरता देशभरातून नागपूरला धाव घेतली.


                 मावशींचा देह त्यांच्या मुलाकडे, ऍड. मनोहर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.  त्यानंतर मावशींचा देह त्यांच्या हृदयात कायमचे स्थान असणाऱ्या अहिल्या मंदिरात नेण्यात आला. ज्या भिंतीतून मावशीच्या शिकवणीचे पडसाद उमटत होते त्याच भिंती जणू अहिल्या मंदिराचा आत्मा असणाऱ्या मावशींना अखेरचा प्रणाम करीत होत्या. 


                 २८ नोव्हेंबर १९७८ रोजी संध्याकाळी ४ वाजता मावशींच्या महायात्रेस सुरुवात झाली. गंभीर आणि शिस्तबद्ध लोकांचा महासागर मावशींना आदरांजली वाहण्यास मावशींनी निर्माण केलेल्या "श्री शक्तीपीठ" येथे लोटला होता की जे आता मावशींचे स्मारक झाले होते. 


               मावशींचे शरीर जरी अग्नीत विलीन झाले असले तरी मावशींचे जीवन आणि त्यांच्या कार्याचा प्रकाश अजूनही त्यांच्या अनुयायांच्या व इतरांच्या हृदयात कायम आहे.  हिंदू तत्त्वज्ञानाचे त्यांनी रोवलेले बीज आता लोकांच्या मनात खोलवर रुजले आहे.  मावशींच्या नवीन विचारधारा आता समाजात मान्यताप्राप्त झाल्या आहेत.  मावशींनी दाखवलेल्या वाटेवर समितीची वाटचाल वेगाने होते आहे. विकासासाठी सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्यांच्या यादीमध्ये मावशींचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. 


"माते, तूच तर आम्हाला झटण्याची शक्ती दिलीस. जसे गंगेच्या जलाने गंगेचेच पूजन करावे तशी तू दिलेल्या शिकवणीने आचरण करून आम्ही आयुष्यभर तुझी आणि तू ज्या कार्यासाठी झटलीस त्या राष्ट्रकार्यासाठी झटू."