हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा (अंतिम)

लाचलुचपत व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे. ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकून नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकून आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. लाच घेणाऱ्या प्रत्येक माणसापाठीमागे नेहमी त्याचे हावरट कुटुंब असते. लाचखोरी करून "दुसऱ्याने मला लाच घ्यायला लावली" आपल्याला असे म्हणून टाळता पण येत नाही, कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपल्या स्वतःचाच असतो. जो इसम लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, लाच खातो तो इसम जास्त मोठा शत्रू. मग इतर वेळेला किती का राष्ट्रप्रेमाचा आव आणूदे. जो लाच घेतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो.

- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.   आपली मातृभाषा सुधारण्याचा ध्यास घ्या. भाषाकौशल्य वाढवा. बऱ्याचदा आपले भाषाकौशल्य जर अपुरे असेल तर गैरसमज उद्भवण्याचा संभव असतो. आपला जो अभ्यासक्रम असतो, त्याच बरोबर आपण वेगवेगळे आवडणारे असे विषय शिकावेत व ज्यात आपल्याला गती व रस आहे अश्या कला जोपासाव्या व कौशल्य वाढवावे. आपला शालेय अभ्यासक्रम हा बुद्धीला चालना देणारा नसून पुस्तकी जास्त आहे व कौशल्य वाढवणारा नाही. आपणही कौशल्य वाढवायच्या मागे नसतो. कसेतरी करून पदवीधारक बनून नोकरी लागली की झाले, अशी आपली स्वतःची भावना असते. कमरेवर हात ठेवून दुसऱ्यांकडून काम करवून घेण्यात आपण फार तरबेज असतो. उंटावरून शेळ्या हाकायला फार आवडतात आपल्याला. पण आपल्याकडे कौशल्याची कमी असेल तर फार काळ आपला टिकाव लागत नाही. कोणी तरी जास्त कौशल्याचा आपल्या पुढे निघून जातो. कौशल्या बरोबर एखादा छंद जोपासावा. छंद हे व्यसन नाही. कॉम्प्युटरवर सारखे खेळ खेळणे हे व्यसन म्हणता येईल. सारखे नेट चॅटींग करणे हे व्यसन म्हणता येईल. हल्ली आपले कॉम्प्युटर मित्र फार व आसपासच्या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. ह्याचे पर्यवसान लोकांना ‘डिप्रेशन’, मन उदास होणे, नैराश्य व तत्सम व्याधी मधून पाहायला मिळते. ह्याच कारणास्तव आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला छंद जोपासायला शिकवले पाहिजे. प्रत्येक लहान मुलाला एखादा चांगला छंद अंगिकारायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या ‘न्युक्लीयर’ कुटंबांतून छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनःस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्याने बऱ्याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गिकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दूर करतात. छंद जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवून ठेवली जाते. छंद हा एक विरंगुळा आहे. शेवटी प्रत्येकाने आपला ‘जू’ आपणच उचलून पुढे चालले पाहिजे. ह्या जगात ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे तोच मनुष्य यशस्वी गणला जातो. स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालू ठेवा असेच गुरू रवींद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ ह्या गीतात उद्धृत आहे. आयुष्यात जरी कितीही अडचणी आल्या तरी,    छंद हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करतो. आपल्या शरीराला व्यायामाची सवय ठेवा. दररोज किमान अर्धा तास तरी शरीराला व्यायाम द्यावा. आपला हा व्यायाम आपण मुलांमध्ये मिसळून त्यांना शिकवत असताना करू शकता. स्वतःच्या शरीराला व्यायाम देताना तो कशा पद्धतीने करायचा ह्याचा आराखडा आपण स्वतःच तयार करू शकता. आपल्या ह्या अर्ध्या तासाची सुरवात प्राणायामाने करू शकता, त्यानंतर थोडे पळणे, घरातली कामे करणे – साफसफाई, केर काढणे तत्सम गोष्टी व्यायामाच्या आराखड्यात प्रविष्ट करू शकता,   महिलांना भारतीय नृत्य येत असेल तर त्या त्याची तालीम करू शकतात. जे ठरवू त्यात नियमितता आणली पाहिजे. चांगली सवय लावून घेण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तो उपक्रम सतत एकवीस दिवस करावा, आपोआप त्याची सवय लागेल व मग आपले मनच चुकचुकेल व व्यायाम नियमित व्हायला लागेल.    आपल्या शरीराला व्यायाम हा हवाच. कोणतीही सरकारी वा बिनसरकारी स्वास्थ्य योजना असली आणि नीट राबवली जात असली तरी आपले शरीरच जर कमकुवत असेल तर आपल्याला प्रसन्नता, तरतरीतपणा व शरीर सौष्ठव कदापि लाभणार नाही.

कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे.   चांगले काम हे कौशल्य, प्रतिभा व मनाची प्रसन्नता ह्यावर अवलंबून असते. तोंडपुजेपणा, अपात्रतेला प्रोत्साहन व नाकारतेपण ह्यावर नाही. चोख काम होणे हे वेळेत व बरोबर कले जाणे ह्यावर अवलंबून असते, हलगर्जीपणावर नाही. तसेच ते चांगल्या प्रशासनावर अवलंबून असते, धाकदपटशाहीवर नव्हे. एक दुसऱ्याच्या आदर भावनेवर अवलंबून असते. कोणच्या ही राष्ट्राची समृद्धता पिढ्या पिढ्यांच्या परिश्रमातून निर्माण होते व पिढ्या पिढ्यांच्या त्यागा मुळे टिकून राहते. ती काही कोणा एका महात्म्या मुळे बनत नाही व टिकत नाही. अशा महात्म्यांची माळ लागते व त्याही पेक्षा तुमच्या आमच्या सारखे सामान्यच लोकं ती टिकवून ठेवू शकतात. कोणतेही काम हे कनिष्ठ नसते. हलकट असतात ती लोकांची मने. कोणतेही कर्तब व कौशल्य कमीपणा आणणारे नसते. प्रत्येकाला परस्परांबद्दल आदरभावना असली पाहिजे मग तो कामगार असो, अधिकारी असो वा मालक असो. अहम भाव व उर्मटपणा, परस्परांमधला आदरभाव संपुष्टात आणतात. अहम भावावर जो मात करत नाही त्याला अहम भाव मारतो. साधेपणा नेहमीच फायद्याचा ठरतो. आपल्या कामावर श्रद्धा ठेवावी. कामाची अस्मिता जोपासावी व दुसऱ्यांचे काम कमी दर्ज्याचे लेखू नये.

नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा वापर सतत करणे.   आपल्या धर्माने दिलेली व आपल्या सदसद्विचार बुद्धीला साजेशी अशी नीतिमत्ता व समाजात राहायचे म्हणून अंगिकारलेले काही सामाजिक नियम आपण स्वतः ठरवायला हवेत व एकदा ठरवले की त्यांच्याशी बांधील राहायला हवे. स्वतःला पटलेले व स्वतःनी ठरवलेली नीतिमत्ता व नियम म्हणजे स्वतःनी स्वतःला दिलेला शब्द. शब्द पाळण्यासाठी लोकं स्वतःचा जीव देतात अशी कित्येक उदाहरणे पाहिला मिळतील. ही नीतिमत्ता आपण हाती घेतलेल्या कामात, आपण करत असलेल्या अभ्यासात,   आपल्या शेजारच्यांबरोबर राहताना आणि दुसऱ्यां बरोबरच्या व्यवहारात अमलात आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. एकदा ठरवल्यावर नीतिमत्तेचे ढोंग करून उपयोग नाही. ते म्हणजे स्वतःलाच फसवल्यासारखे झाले. ह्यात काही पुरुषार्थ नाही. आपण ठरवलेल्या नीतीमते प्रमाणे आपण वागलो तर स्वतःत आत्मविश्वास जागृत होईल. आपणाला कणखर बनवेल. प्रलोभनांपासून दूर राहायची शक्ती देईल. नीतिमत्तेला धरून चालणाऱ्याला आपोआपच कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी उत्तरे सापडतात. कठीण प्रसंगात मन शांत राहायला मदत मिळते. मानसिक धैर्य वाढते. समाजात राहायचे म्हणजे प्राथमिक सुचार शिकले पाहिजेत व वापरले पाहिजेत. त्यांनी स्वतःचाच फायदा होतो. दुसऱ्यांना भेटल्यावर त्याचे पहिल्यांदा अभिवादन करायला विसरू नका. त्यांनी एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो. हसतमुख राहा आणि व्यवहार आटोपल्यावर दुसऱ्याला धन्यवाद द्यायला विसरू नका. नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याने स्वतःला बरे वाटते व एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो, जोडलेले नाते वाढीस लागते. ह्या सोप्या तीन गोष्टी आचरणात आणल्या आपण तर एकदुसऱ्यात मेळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, एक नाते तयार होईल, सद्भावना वाढीस लागेल व त्या योगे दोघांचा फायदा होईल. वेळेचे महत्त्व काय सांगावे. कोणाला वेळ दिली तर तिचे पालन करणे हे कोणाला शब्द दिल्या इतकेच महत्त्वाचे आहे.

- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे. स्वतः बद्दलची कीव करणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ती कोणत्याही प्रगतीच्या आड येते. कोठचाही नवीन उपक्रम हाती न घेण्यासाठी आपण कारणे शोधत राहतो. घालून दिलेला सरकारी नियम हा स्वतःस कसा नुकसानदायी आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा स्वतःला मग दुसऱ्यांना. हा नियम आपल्याला कसा लागू होत नाही ह्यासाठी कारणे शोधतो. त्या नियमाविरुद्ध अर्ज करतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण नियम वाकवायचा प्रयत्न करतो. एकदा का आपले काम झाले की मग आपण तोच नियम कसा चांगला आहे व लोकांनी नियमाबरहुकूम का वागले पाहिजे ह्याचे ‘पाढे’ म्हणायला सुरुवात करतो. तीच गोष्ट सामाजिक कार्याच्या बाबतीत सुद्धा, किंवा रोजच्या व्यायामाबाबतीत. जेव्हा अशी गोष्ट हाती घ्यायची वेळ येते तेव्हा हजार कारणे आपल्याला सुचतात व दाखवता येतात. मग आपण स्वतःलाच समजवायचा प्रयत्नात असतो की ‘हा खोकला गेला की रोज सकाळी उठून फिरायला जाईन’, किंवा ‘माझे अंग दुखायचे जेव्हा कमी होईल तेव्हा मी पळायला जात जाईन’. अशी कीव जो करतो तो अंग दुखायचे थांबले तरी कधी पळायला जाऊ शकणार नाही कारण तो पर्यंत त्याला न करण्याचे दुसरे काहीतरी कारण सापडलेले असते. त्यापेक्षा सगळे बाजूला ठेवायचे मनात निश्चय करायचा व पळायला जायचे मग बघा चमत्कार,   आपले शरीर जादूची कांडी फिरवल्यासारखे वागायला लागते ते. आपल्या जवळ जर रोज लागणाऱ्या गोष्टींच्या बद्दल टोकाच्या आवडी निवडी असतील – खायच्या बाबतीत, साफसफाईबाबत, कपड्यांबाबत, चवीबाबत तर आपल्याला खूप त्रास होईल व होत राहील. छोट्या छोट्या कारणांनी तुमचे मन दुःखी होईल. छोट्या छोट्या गोष्टीत मन गुंतले जाईल व आपण उदास होऊ. जर आपल्या आवडीनिवडी अशा प्रकारच्या टोकाच्या असतील तर येणारे रोजचे ‘कठीण’ प्रसंग आयुष्याची ‘दुःख’ समजून हिरमुसले होऊ. इतके दुःखी होऊ की, आपण मग चालू घटकेचा आनंद उपभोगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत व प्रत्येक माणसात उगाचच खोट काढत बसायची सवय लागेल, कोणालाही समजून घेता येणार नाही, कोणाशीही नाते जोडता येणार नाही व माणसे जोडली जाणार नाहीत. जितक्या जास्ती आवडीनिवडी व जितका जास्त छांदिष्टपणा तितके आपले मित्र मंडळी कमी होत जातील व आपण एकटे पडू. एकटेपणा माणसाला दुःखी करतो. त्या उदास होण्याने पुढे आपले मनःस्वास्थ्य बिघडते. आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एक कान मंत्र लक्षात ठेवायचा – टोकाच्या आवडीनिवडी सोडून द्याव्या. लहानपणा पासून मुलांना टोकाची आवडनावड कशी घातक आहे ते त्यांना समजवले पाहिजे.

- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम,   उदात्त व उत्तुंग बनवा. दुसऱ्यांच्या चांगल्या संस्कारांची पुनरावृत्ती करण्यात काही गैर नाही. शत्रूच्याही चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आपल्या धर्मात सांगितलेच आहे की रोज सहा गुरू करावेत म्हणजे रोज दुसऱ्यांच्या कडून सहा चांगल्या गोष्टी शिकाव्यात त्यांनी आपली प्रतिभा उत्तुंग होते. इंग्रजांनी एकशेवीस वर्षापूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचा छत्रपती शिवाजी टर्मिनस बांधला. त्या वेळेला वीस गाड्या व हजार बाराशे प्रवासी त्याचा वापर करीत होती. पण तो टर्मिनस त्यांनी इतका भव्य बांधला होता त्यावेळेला, की आज तीन हजार गाड्या व तीस लाखापेक्षा जास्त प्रवासी तो वापरू शकतात. ह्याला म्हणतात दूरदृष्टी ठेवून केलेली आखणी. अशी दूरदृष्टी व अशी आखणी आपण आत्मसात केली पाहिजे व लहान मुलांना पण अश्या दूरदृष्टीची सवय लावली पाहिजे. आपण कोणचाही कामाचा आराखडा तयार करताना अशी दूरदृष्टी बाळगली पाहिजे. आपली पिढी जरी चाळीस, पन्नास वर्षे त्याचा उपयोग करणार असली तरी पण पुढे येणाऱ्या दहा पिढ्यांचा आपण विचार केला पाहिजे व तशी आखणी केली गेली पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून आपली बांधकामे, रस्ते, पुल, खेळाची मैदानं इत्यादी आखले गेले पाहिजेत. जरी दुर्दैवाने आपल्या हातात अशी आखणी किंवा तिचा कार्यान्वय नसला तरी मनात नेहमी आपल्या राष्ट्राबद्दल चांगले उत्तुंग असे विचार आणावेत. अश्या राष्ट्राविषयीच्या उत्तुंग विचारांची सवय लावण्याने आपल्या स्वतःच्या दृष्टीमध्ये पुष्कळ फरक पडेल. मग आपण छोट्या छोट्या गोष्टीतला हेकेखोरपणा सोडून देऊ,   आपोआप आपली दृष्टी विशाल बनेल, व रोजच्या जीवनातल्या अडचणींना सामोरे जाताना दुःख होणार नाही.

आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.   आपले धर्मनिर्देश, आपली धर्म शास्त्रे, घालून दिलेली धर्म सूत्रे ही आपल्या पूर्वजाने त्यांच्या अनुभवातून आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली समाजाला एक दिशा आहे. ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते,    सचेतन बुद्धी वाढीस लागते. धर्म निर्देश, शास्त्रे, सूत्रे, व्रत, वैकल्ये ही सगळी स्वतःचे मन व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतूने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्र व समरसता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजूनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सूत्रे विचार करून अमलात आणली पाहिजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करून प्रसंगी त्या सूत्रात यथार्थ बदल करून त्या त्या सूत्रांचा, व्रतांचा व धर्मनिर्देशाचे पालन केले पाहिजे. सतीची प्रथा एकेकाळी चालू होती आता ती कालबाह्य झाली व आपण ती टाकून दिली. तीच गोष्ट बाकीच्या चालीरुढींबाबत लागू आहे. ह्याचा विचार करून आपल्या धर्माच्या चौकटीत वागले तर आपल्याला मानसिक सुरक्षितता लाभेल. त्याच बरोबर बाकीच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. आपल्या धर्मात सांगितल्या प्रमाणे जो वागतो त्याला कठीण परिस्थितीत मार्ग काढायला शक्ती व बुद्धी मिळते, कारण आपला धर्म, सामान्य माणसाच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संभ्रमांवर तोडगा देत असतो. आपल्या धर्मात, आपल्या समोर ठाकणाऱ्या सगळ्या द्विधा मनस्थितींवर उहापोह करून ठेवलेला आहे. आपल्या आयुष्याच्या मार्गावरून आपण जेव्हा घसरायला लागतो तेव्हा धर्म आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. म्हणूनच आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा असू द्यावी त्यावर पण अंधश्रद्धा टाळावी.

ही दहा सूत्रे व्रता सारखी जो आचरण करेल तो राष्ट्रव्रती. देश, काल, पात्राच्या परिसीमेत आजच्या हिंदू माणसाला जर हिंदुत्वाचा पुरस्कार करायचा असेल तर तो वर्णन केलेल्या दहा सूत्रांप्रमाणे वागून करता येईल. ह्यालाच राष्ट्रव्रत असे नाव आपण देऊ. ह्यालाच खऱ्या हिंदुत्वाचे पालन करणे असे होते. आता कोणी म्हणेल की मी ही दहाच्या दहा सूत्रे काही नेहमी पाळत नाही पण कधी कधी, थोडी थोडी पाळली जातात. कारण असे पाळणे म्हणजे आपल्याला सुलभ जे ते स्वीकारणे व बाकीचे सोडून देणे होते. व्रत हे एकदा घेतले की थोडे करू, मग करू, आपल्या सोयी प्रमाणे करू असे नसते. घ्यायचे तर पूर्णपणे पाळायचे. आपणच आपल्याला दिलेल्या शब्दासारखे व्रत असते. आपण आपल्याला दिलेला शब्द जर पाळणार नसू तर द्यायचाच का? ह्यात कसला पुरुषार्थ? म्हणून अर्धा राष्ट्रव्रती किंवा सोयीने राष्ट्रव्रती नको. अशा राष्ट्रव्रतींचा राष्ट्राला काही उपयोग नाही. राष्ट्रव्रती म्हणजे ही सर्व दहा सूत्रे नेहमी पाळणारा.

शिवाजीने ही जाणीव त्याच्या स्वतःच्या उदाहरणाने करून दिली व एक साम्राज्य निर्माण झाले. ही जाणीव संपली व आपण इंग्रजांकडून पराभूत झालो. आपला आत्मविश्वास आपल्या हिंदू मनाच्या अभिमानाबरोबरच संपला. देशासाठी, आपोआप स्फूर्ती एक दुवा होता देणारा तोच संपला. संकटाला तोंड देण्याला, कठीण काम करण्यास जी स्फूर्ती लागते ती स्फूर्ती देणारी गुटिकाच नसेल तर माणसाचे हातपाय लटपटायला लागतात. इंग्रजांनी हे ओळखले व पहिल्यांदा हिंदू धर्माबद्दलचा अभिमानच संपुष्टात आणला. इतका की आजची पिढी हिंदू हे नाव घ्यायलाही लाजू लागली आहे. जो मग हिंदू धर्माचा नुसता उच्चार करता झाला त्याला जातीय म्हणून आपली पिढी स्वतःची सुटका करून घ्यायला लागली आहे. आपल्याला आपल्या शक्तीची परत जाणीव करून घ्यायची वेळ
आली आहे.

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग ४ (अंतिम)
 
ज्या धर्माने ज्या विचारसरणीने आपल्या देशाला जिवंत केले, ज्याला अर्थ दिला आहे, देशाचे राष्ट्र बनवले आहे, त्या देशातल्या जर कोणी हिंदू हे नाव घेतले, त्याचा उच्चार केला तर तो जातीय कसा बनेल. ज्या श्वासांनी आपल्यात जीव फुंकरला आहे, तोच घ्यायला मला आता लाज वाटते असे कोणाला वाटायला लागले तर त्याने मेलेलेच बरे. मला श्वास तर घ्यायचा नाही पण जगायचे मात्र आहे असे कदापि शक्य होणार नाही. हे तर सोडाच पण हल्ली आपल्या देशात आपण हिंदू धर्माचा अभिमान न धरणे म्हणजे आपोआपच ‘सेक्युलर’ मानले जातो, असे वातावरण झाले आहे. ह्या विश्वात इतर अनेक देशात आपला म्हणण्यासारखा भारत एक देश आहे व ह्या भारताचे आम्ही आग्रही आहोत व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणणे म्हणजे साऱ्या मानवजातीचा जसा अपमान होत नाही तसेच ह्या आपल्या देशात आपला म्हणण्यासारखा आमचा धर्म आहे व त्याचा आम्हाला अभिमान आहे असे म्हणण्याने बाकीच्या धर्मांचा अपमान होत नाही. आता गरज आहे आपल्या धर्माबद्दलची जाणीव होऊन अभिमान बाळगण्याची.

काही लोकांना उगाचच असंबद्ध प्रश्न करायची सवय असते. ते मग नेहमीच्या बिनबुडाच्या शंका काढतात -  "लोकांना हिंदू असण्याचा नुसता गर्व असून काय उपयोग होणार. कोणाला नीट माहिती नाही हिंदू धर्म किंवा हिंदुत्वा बद्दल. हिंदू हिंदू करणाऱ्यांनी गीता पण कधी वाचलेली नसते. ह्या लोकांना हिंदू ह्या शब्दाचा अर्थही कळलेला नसतो. हिंदुत्व म्हणजे काय हे ही समजावून घ्यायचे नसते वगैरे वगैरे". त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, जो भारतात राहतो, जो भारतासाठी जगतो, जो भारता साठी झटतो, ज्याच्या पूर्वजांनी येथे जन्म घेतलेला आहे – हो तरच त्याला आपल्या देशा बद्दल आपुलकी वाटणार. जो मनुष्य भारत हीच त्याची पुण्यभुमी आहे असे समजतो, जो भारत हीच त्याची कर्मभुमी आहे असे समजतो. ज्याला भारताच्या, पूर्वीपासून चालत आलेली समृद्ध अशी संस्कृती ही त्याचीच आहे असे वाटते. ज्याचा आपल्या विचारसरणीवर विश्वास आहे. तो हिंदू होय व त्या तत्त्वावर जो जीवनक्रम उभारतो, ह्या तत्त्वाचा ज्याला अभिमान आहे ते म्हणजे हिंदुत्व. ह्या पुढे जाऊन जो राष्ट्रवताच्या दहा सूत्रांबरहुकूम वागतो तो राष्ट्रव्रती व त्याचे राष्ट्रव्रत हेच खरे हिंदुत्व.    इतकेच आपल्या हिंदू बांधवांसाठी पुरे आहे. प्रत्येकाने काही गीता वाचायलाच पाहिजे असे नाही. सगळेच लोकनेते होऊ शकत नाहीत. ज्यांना लोकसंग्रह करायचा आहे, त्यांनी हे व बाकीचे सगळे अभ्यासावे, मनन करावे व लोकांना शिकवावे. लोकांनी अशा श्रेष्ठांचा पुरस्कार करून, त्यांनी दिशा दाखवल्या प्रमाणे जीवनक्रम अनुसरावा. सामान्य जनांसाठी श्रेष्ठांवर विश्वास व हिंदुत्वाचा अभिमान एवंम राष्ट्रव्रताचा पुरस्कार व त्याचे आचरण एवढेच पुरे आहे. श्रेष्ठ लोकनेत्यांनी काय करायचे ते श्रेष्ठांना सांगावे लागत नाही. ते करतात व म्हणूनच त्यांना लोकसंग्रहाचे कार्य करायचे काम ईश्वर सोपवतो. अशा श्रेष्ठ लोकांनी गीतेत काय आहे त्याचा जरूर अभ्यास केला पाहिजे.

यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।
  
गीतेचा हा श्लोक ह्या बद्दलचा संभ्रम दूर करतो. सामान्य लोकं नेहमी श्रेष्ठ लोकांचे अनुसरणं करतात असे दिसून येते, कारण श्रेष्ठ लोकांचे कर्म सामान्य लोकं प्रमाण मानतात. व श्रेष्ठ लोकं उत्तुंग कार्य करतात म्हणूनच ते लोकमान्य होतात. त्यांचा लोकसंग्रह कारणी लागतो.

माणसाच्या मानसिक व चेतनेच्या प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक व चेतनेच्या  प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. ती कक्षा ओलांडता येत नाही त्याला. जेव्हा एक मानसिक प्रगल्भतेची श्रेणी पार करून तो दुसऱ्या अजून उच्च दर्जाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत पदार्पण करतो, तेव्हाच तो आधीची कक्षा ओलांडू शकतो. प्रत्येक चढत्या मानसिक व चेतनेच्या प्रगल्भतेच्या श्रेणीत त्याचे विचार व्यापक बनतात. सामावून घेण्याची कक्षा वाढते. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. मन विशाल होते. आधीच्या मनाच्या श्रेणीत त्याला बऱ्याच गोष्टी पटण्यापलीकडे होत्या. जेव्हा मनुष्य मनाच्या इतक्या प्रगल्भावस्थेत पोहोचतो तेव्हा त्याच्या दृष्टीने वेगवेगळे देश किंवा राष्ट्र ही कल्पना फार कोती ठरते. तो साऱ्या जीवसृष्टीचा विचार करतो. तो मग कोणत्याही धर्माचा, देशाचा, राष्ट्राचा राहत नाही. तो विश्वाचा होतो. विश्व त्याचे असते. त्याचा धर्म हा ‘जीववाद’ होतो. त्याचे राष्ट्र अखिल मानवजात ठरते. त्याचा देश संपूर्ण विश्व असते. त्याच्या दृष्टीने कोणी शेजारी राष्ट्रे नसतात. कोणी शत्रू राष्ट्रे नसतात. ह्याच संकल्पनेतून "सर्व भूत हित" हे ब्रीद वाक्य आपल्या धर्माने आपल्याला दिले आहे. बृहदअरण्यक उपनिषदात सर्व सृष्टीला उद्देशून केलेली सर्वेपिसुखिनःसंतू । सर्वेसंतू निरामया। सर्वेभद्राणी पश्यंतु। मा कश्चित दुःखमाप्नुयात। (१. ४. १४ बृहदअरण्यक) अशी प्रार्थना  आढळेल. ही प्रार्थना सर्व सृष्टीला लागू आहे. तसेच "सर्व भूत हीतार्थ" (भगवद्गीता, १२ अध्याय, ४ श्लोक) ही संकल्पना हल्लीच्या "सर्व धर्म समभाव" ह्या पेक्षा प्रगल्भ आहे. "सर्व भूत हितार्थ" ही संकल्पना सर्व धर्मांना तर सामावून घेतेच पण त्याही पुढे जाऊन सगळ्या प्रकारच्या विचारसरण्यांना सामावून घेते, नास्तिक लोकांना सामावून घेते, जिवंत गोष्टी व त्यापेक्षाही पुढे जाऊन निर्जीव गोष्टींना सुद्धा सामावून घेते. एवढेच काय आपली पृथ्वी ही साऱ्या सृष्टीचा एक घटक समजून साऱ्या सृष्टीचा येथे विचार असतो व त्या सर्वांचे उत्थान करण्याचा प्रयत्न ह्या संकल्पनेत केलेला आढळतो. आपली "वसुधैव कुटुंबकम्" ही संकल्पना आजच्या "ग्लोबल व्हिलेज" पेक्षा फार पूर्वीची व सर्व समावेशक आहे. बहुतांशी असे आढळून येते की अश्या मानसिक प्रगतीच्या उच्चतम श्रेणीत पोहोचलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्या सारखी असतात. त्यांच्या मानसिक प्रगल्भतेच्या कमतरते मुळे, बहुतांशी लोकांची विचारांची क्षमता, ह्या संतांएवढी व्यापक होऊ शकत नाही. त्यांचे विश्व एवढे विशाल नसते व अशांची जर प्रगती व्हायची असेल तर त्यांना झेपणाऱ्या अशा छोट्या वर्गात पहिल्यांदा त्यांना बसवून, शिकवून मगच ते पुढच्या इयत्तेत जायला तयार होतात. अशा कोट्यवधी लोकांच्या प्रगतीसाठी राष्ट्रांची संकल्पना उभारावी लागते. अशा तऱ्हेने मग वेगवेगळ्या राष्ट्रांचा पुढचा प्रवास  - प्रगतीच्या दिशेने त्या त्या लोकसमूहावर सोपविला जातो. त्या त्या विचारसरणीने मंत्रित होऊन, ते ते देश मग प्रगत होण्यात गढून जातात. ह्या प्रक्रिये मधूनच हळू हळू अजून अजून प्रगल्भ, अजून अजून उन्नत व उत्तम विचारसरणी जन्म पावते. ही गोष्ट राष्ट्रा राष्ट्रात विश्व वाटले गेल्यामुळेच होऊ शकते.

 ‘हे विश्वची माझे घर’ मानणारे महात्मे मंडळी सुद्धा प्रबोधन करताना, त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक पण सामान्य लोकांच्या प्रगती करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी धर्म व राष्ट्रांची संकल्पना उभारतात. जो शिक्षक दोन गटात खेळाचे सामने घेतो, त्याच्या दृष्टीने दोन्ही गट सारखेच असतात. पण दोन्ही गटांचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांना त्यांचा त्यांचा गट, अत्यंत महत्त्वच वाटतो. चुरशी शिवाय प्रगती नाही. त्यामुळे खेळात कर्णधाराने, त्याचा त्याचा गट कसा पुढे जाईल हेच बघायचे असते व शिक्षकाला दोन्ही गटात फरक वाटत नसून सुद्धा त्याने चुरस निर्माण करायची असते – खेळ व खेळाडूंच्या फायद्या साठी. ह्या प्रक्रियेत कर्णधारही बरोबर आहे व शिक्षकही बरोबर आहेत. इथे फक्त त्यांची श्रेणी वेगवेगळी असल्या मुळे त्यांना ह्या भूमिका घ्याव्या लागतात. कर्णधार जर शिक्षका सारखा विचार करू लागला तर त्याच्या गटाला परवडणार नाही. प्रगती – म्हणजे खेळात त्या गटाची आगेकूच थांबेल व त्याचा गट हरेल. अजून एक उदाहरण पाहण्या सारखे आहे. ह्या भौतिक जगात, भूमितीची जी प्रमेय लागू आहेत, उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तीन अशांची बेरीज १८० अंश भरते, चौरसाच्या अंशांची बेरीज ३६० असते व आपल्याला वाटत राहते की हे नेहमी असेच राहणार आहे. ही प्रमेय आपण विविध गणिते सोडवायला वापरतोही आणि ती गणिते बरोबरही येतात. हे किती बरोबर आहे ते बघू. ह्या रोजच्या वापरातल्या भूमितीला ‘युक्लीडीयन’ भूमिती असे म्हणतात. कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही की हिच भूमितीची प्रमेय जेव्हा संपूर्ण विश्वाला (युनिव्हर्स) आपण लावतो तेव्हा ती चूक ठरतात. गणितं चुकतात, कारण जेव्हा संपूर्ण सापडलेल्या, व अवलोकन करता येण्या सारख्या विश्वाला आपण ही प्रमेय लावतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या नेहमीच्या लांबी, रुंदीच्या मापदंडां पासून मुक्त होऊन त्याच्या कोट्यवधीच्या पटीने मोठ्या व गोलाकार अशा मापांशी खेळत असतो. पृथ्वीवर काढलेली लांबलचक सरळ रेघ, खूप वरून बघितले कर पृथ्वीचा गोलाकार घेतलेली दिसते. त्या वेळेला तेथे ‘युक्लीडीयन’ भूमिती कामास येत नाही. ‘युक्लीडीयन’ प्रमेयांनी ह्या विश्वाची गणितं चुकू लागतात. कारण येथे भूमितीच्या ‘युक्लीडीयन’ पेक्षाही वेगळ्या प्रमेयांची गरज पडते. ह्या प्रमेयां प्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेहमीच १८० अशांपेक्षा जास्त भरते. पण म्हणून आपण ‘युक्लीडीयन’ भूमिती बाद ठरवत नाही. कारण आपल्या श्रेणीला तीच बरोबर आहे व उपयोगी आहे. आपल्यासाठी जशी ‘युक्लीडीयन’ भूमिती आहे, तशीच राष्ट्रांची संकल्पना आपल्या प्रगती साठीच आहे. देश जिवंत करणाऱ्या, देशाचे राष्ट्रात रुपांतर करणाऱ्या धर्माची आपल्याला अत्यंत गरज आहे. तो धर्म ज्या विचारसरणीतून जन्म पावला त्या विचारसरणीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण तीच विचारसरणी, आपल्या मनुष्य समूहाची मानसिक, भौतिक व आधिभौतिक प्रगती करणारी आहे.

आपल्या धर्माचे आपणच रक्षण कर्ते आहोत. धर्माचे रक्षण करणे म्हणजे तलवारी काढणे नव्हे. जर वेळोवेळी कालबाह्य झालेल्या संकल्पनांचा आढावा घेऊन आपल्या धर्माला लागलेली बुरशी काढून तो सोपा करून व लहान, तरुण व वयस्कर लोकांना आकलनीय करून आकर्षित करणारा असा आपला धर्म केला व आपल्या धर्मातल्या चांगल्या प्रथा ठेवून बाकीच्या काढून टाकल्या तर आपल्या धर्माचे आपोआपच रक्षण होईल, तो वाढीस लागेल, त्याला परत पूर्वीचा कस येईल व तो वृद्धींगत होईल. तरुण पिढीला आलेली आपल्या धर्माबाबतची ग्लानी अशीच दूर होईल.

उठा ह्याची जाणीव करून घ्या. ह्याची जाणीव दुसऱ्यांना करून द्या. आपला धर्म जागवा. हे काम आपले आहे. वेळ गेलेली नाहीये, उशीर झालेला नाहीये. आपली ताकद ओळखा. हनुमानाच्या प्रचंड शक्तीची जाणीव करून द्यायला जांबुवंत होता. आपल्यावर लागलेल्या शापाचा आपला उतारा आपणच शोधला पाहिजे. आपल्यातल्या सुप्त ताकदीची जाणीव करून घ्या. संघटित शक्तीचे राष्ट्रव्रत घ्या. आपणच आपले जांबुवंत बना. राष्ट्रव्रती व्हा. राष्ट्रव्रत घ्या.

आता जे राष्ट्रव्रताच्या संकल्पनेशी आकृष्ट झाले असतील त्यांना राष्ट्रव्रत कसे घेता येईल ते पाहू. ज्यांना राष्ट्रव्रत घेण्याचे महत्त्व पटले आहे त्यांनी सर्वात आधी दहा सूत्री राष्ट्रव्रत घेण्याचे मनात ठामपणे आणले पाहिजे. बरेचजण ह्या सूत्रामधील काही सूत्र किंवा कधी कधी सोयी प्रमाणे सगळी सूत्र अमलात आणत असतील. पण म्हणून तो मनुष्य काही राष्ट्रव्रती ठरत नाही. हे व्रत पूर्णतः स्वीकारले पाहिजे. हे ज्यांना पटले त्यांनी राष्ट्रव्रती बनायचा प्रयत्न करावा, कोणाला दाखवायचे म्हणून तेवढ्या पुरते नको. पैशासाठी नको, जोर जबरदस्तीने नको, सोयीसाठी नको. राष्ट्रव्रत हे स्वतःला मानसिक प्रगतीच्या वरच्या श्रेणीत नेण्यासाठी हाती घ्या. आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी घ्या, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी घ्या. आपल्या मानसिक समाधानासाठी घ्या. राष्ट्रव्रत घेण्याने आपोआप आपल्या जीवनाला अर्थ येईल. ह्या विश्वातले आपले वास्तव्य अर्थपूर्ण करण्यासाठी घ्या. नाहीतर आयुष्याच्या शेवटी आपण का जगलो व काय मिळवले असे वाटायला नको. श्वास आहे तोवर जगलो, खाल्ले, प्याले, काही पैसे जोडले गाठीला व प्रजनन केले असे नको. एवढे उद्योग तर बाकीचे प्राणीपण करतात आणि ते सुद्धा आपल्या सारखे रडत कुढत नाही.   

आपण ठरवा, पटले तर राष्ट्रव्रत घ्या व एकदा घेतल्यावर स्वतःला दिलेला शब्द पाळा. आपल्या सदसद्विवेक बुद्धीला चालना द्या.
 
राष्ट्रव्रत घेतल्याने काय होईल? – आपली चित्तशुद्धी होईल. मानसिक व चेतनेच्या प्रगल्भतेच्या अजून वरच्या श्रेणीत आपण सहजच पदार्पण करू शकाल. आपण जर ही सूत्र तंतोतंत नेहमी पाळत गेलो तर आपोआपच आपले एक वेगळे अस्तित्व तयार होईल. बाकीचे लोक आपल्याला राष्ट्रवती म्हणून ओळखतील व आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे जगण्याचा प्रयत्न करायला लागतील.    आपल्या सगळ्यांच्या अशा राष्ट्रवती आचरणांनी सांघिक शक्तीचा प्रत्यय येईल जे आपल्या राष्ट्राला पोषक ठरेल.

राष्ट्रव्रत घेतले नाही तर काय होईल?
काही नाही, आपले आयुष्य तसेच पुढे रेटत राहील बिनार्थाचे, रडत कुढत. आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर विश्वास असेल तर आपण राष्ट्रव्रती होऊ शकता. प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -

आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
 
तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.

स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची सुरक्षा - शेवटी, नेहमीच शेवटी.

आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्या पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरून घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या  परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातून घडवून आणणारे आहे.

तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?

दुवा क्र. १ (मराठी ब्लॉग)

दुवा क्र. २