मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रू, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच. कॅंटीन भव्य आणि वातानुकुलीत होते. बुफेमुळे आणि वेटरच्या व्हेजी, नानव्हेजीच्या गोंधळात काहीच न कळल्याने पानात पकोडा घेतला तो मनसोक्त खाल्ल्यावर कळले की तो चिकनचा होता! पूर्ण शाकाहारी असलेल्य्या माझ्या खाद्यजीवनाला बसलेला तो पहिला धक्का. शेवटी'इदं न मम"म्हणून सोडून दिले. इथे हॉटेलातही प्रत्येक वेळेस सांगावेच लागते 'नो चिकन, नो फिश, नो पोर्क, नो बीफ'एवढे सांगूनही व्हेजी फ्राईड राईस येतो त्यात २-४ कोलंबी डोकावतातच, शांतपणे काढून टाकणे हाच एक उपाय! मलेशियात सी फूड खूप चांगले मिळते असे म्हणतात. "मी गोरेंग"(फ्राईड नूडल्स), "नासी गोरेंग"(फ्राईड राईस), "नासी लेमा"(स्पे. राईस), "नासी आयाम"(चिकन राईस), रोटी चनई, सारडीन करी हे पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. के. एफ. सी. सेंटर्स तर नुसती माण्सांनी भरून वाहत असतात. हॉटेलमध्ये गेलात तर पहिल्यांदा फ्रूट जूस मागवावा लागतो. आपल्यासारखे पाणी येथे मिळत नाही. मागवून घेतलेच तर जेमतेम ग्लासभर देतात पण ते ही गरम!! त्याचे ही वेगळे पैसे द्यावे लागतात. गरम पाणी न दिल्यास, हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. सुंगाई पेटानीसारख्या शहरात फक्त दोन इंडियन हॉटेल्स आहेत. तिथे मात्र केळीच्या पानावर सुंदर दाक्षिणात्य जेवण मिळते.
शनिवार रविवार तिथे जाऊन जेवणे हा आमचा आठवडाभराचा एक ध्यास असतो. बाकी वेळा घरीच रंधा, जेवा आणि भांडी घासा! नाहीतर व्हेजी-नॉनव्हेजीच्या जाळ्यात अडका. अशावेळी 'मेरा भारत महान' असे वाटते. मलेशियातील फलजीवन मात्र रसभरीत आहे. त्यामुळेच की काय माझे येथील जीवन फ्रूटफुल्ल झाले आहे. येथे एकच ऋतू असल्यामुळे बारमाही फळे मिळतात. अत्यंत रसाळ आणि चवदार अशी काही त्यातील फळे आहेत.
रामबुतान-- वरवर काटेरी दिसणारी ही फळे म्हणजे मलेशियाचा मेवा आहे. इतकी गोड व रसाळ असतात की कितीही खाल्ली तरी मन तृप्तच होत नाही. मँगोस्ट्रीम -- नावावर फसू नका. आंब्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. कठीण कवच्याच्या ह्या फळाच्या आतील पांढऱ्या बिया इतक्या रसाळ असतात की पूछो मत!!
ड्यूरियन -- हे फळ मलेशियन लोकांच्या अत्यंत आवडीचे. फणसासारखेच दिसणारे, आतील गऱ्यासारखा भाग अत्यंत गोड व भरपूर प्रथिनयुक्त पण उग्र आणि विचित्र वासाचे.
किवी--चिकूसारखे दिसणारे पण आतून हिरवे व काळ्या छोट्या बिया असणारे, चवीने आंबट गोड.
येथील शहाळ्याचे पाणी अतिशय गोड जणू पृथ्वीवरील अमृतच. "" ह्या व इतर काही व्हेज खाद्यपदार्थंनी माझे खाद्यजीवन समृद्ध केले आहे. पण तरीही बरेच वेळा मला वडापाव, पाणीपूरी इ. चटपटीत पदार्थंची आठवण येतेच. अशावेळेस मी रामबुतानचे एक फळ तोंडात टाकते आणि मानते की मी पाणीपूरी खात आहे. शेवटी काय, समाधान-असमाधान, तृप्ती-अतृप्ती आपल्या मानण्यावरच अवलंबून असते ना???