मिळून सातजणी (३)

     प्रत्येक भाविकाला व निसर्गप्रेमीला सामावून घेणारं ठिकाण म्हणजे  'घांगरिया'. लक्ष्मणगंगेच्या काठी वसलेलं गाव पण गाव कुठे दिसतच नाही. सगळीकडे हॉटेल्स, धर्मशाळा व गरजेच सामान विकणारी किंवा भाड्याने देणारी दुकानेच  दुकाने. जिकडे पाहावं तिकडे शीखच शीख, आमच्यासारखे निसर्गप्रेमी तुरळकच. लक्ष्मणगंगेच्या डाव्या बाजूला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तर उजवीकडे हेमकुंड साहिब. दुसऱ्यादिवशी सकाळी सहा वाजताच जेवणाचे डबे भरून निघालो. घांगरिया ते व्हॅली हा तीन किमीचा ट्रेक आहे. प्रवेश व क्यामेराचे पैसे भरून निघालो. पुढे आपल्याला सोबत करते पुष्पावती नदी.   गोविंदघाट ते घांगरिया ह्या तेरा किमीच्या प्रवासात सतत सोबत असतो शेणाचा वास, त्या वासाची जागा आता छान फुलांच्या वासांने तर अलकनंदेच्या खळखळाटाची जागा  आता रातकिड्यांच्या आवाजाने घेतलेली असते. नितांत सुंदर निसर्ग आणि निर्मळ स्वच्छ निर्मळ हवा! 'स्वर्ग' असेल कुठे ह्या धरतीवर तर तो इथेच.

सरकचित्रदर्शन:
(चित्रावर दर्शक रेंगाळेल तितका वेळ सरकचित्रदर्शन थांबेल. तेव्हा चित्रावर टिचकीमारल्यास पुढचे चित्र दिसेल. दर्शक चित्राबाहेर जाईल तेव्हा सरकचित्रदर्शन स्वयंचलित रीतीने चालू राहील. )

     व्हॅलीत शिरल्यावर आधी थोडी निराशाच झाली कारण कल्पनेत होती हिंदी सिनेमातली  गेंदेदार फुलांची दृश्ये. पण बाराकाईने बघायला लागलो तो निसर्गाचा चमत्कार पाहून आचंबित झालो इतक्या वेगवेगळ्या आकाराची, रंगांची फुले बघून! छ्योट्यात छोटी तुरीच्या दाण्या एवढी दोन रंगांची फुले तर काही सूर्यफुलाएवढी मोठी फुले. आदल्यादिवशी फुलांचा स्लाईड शो बघितल्यामुळे सगळी फुलं ओळखीची वाटत होती. "अगं हे फुल पाहिलंस का? वॉव ! ह्या पानांचा आकार कित्ती छान आहे" करत टोळी टोळीने पुढे पुढे जात होतो. सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारी फुले होती सुरमा, वज्रदंती आणि तेरड्याची. 'संजीवनी' इथे आढळते असं ऐकलं  होतं पण आम्हाला काही दिसली नाही. भोजपत्राची झाडे मात्र विपुल होती. एवढी फुलझाडे होती पण भुंगे व फुलपाखरे मात्र अगदी तुरळक आणि पक्षी तर एकही दिसला नाही. दुपारनंतर वातावरणात एकदम बदल होतो. एक वाजता परतायचं होतं त्यामुळे मेरी लेगीच्या समाधी पर्यंत पोचू शकलो नाही.   १९३९ मध्ये मेरी(वनस्पतीशास्त्रज्ञ) इथे अभ्यासाकरिता आली आणि एका अपघातात मरण पावली. तिच्या बहिणीने  तिला जिथे स्थानिकांनी दफनवलं व तिथे तिच्या नावाचं  स्मारक बांधलं.

     आता पोटात कावळे कोकलायला लागले होते. इथे एकही धाबा,हॉटेल नाही त्यामुळे कुठेही कचरा दिसत नाही आणि पर्यटाकांनी टाकल्यास दंड आकारण्यात येतो. सावली पाहून डबा खायला बसलो. कालच्याप्रमाणे आजही मंदाने एका झऱ्याचे पाणी आणले आणि म्हणाली, "मंजू तुझ्या त्या मनोगतीला नक्की सांग खरंच इथलं पाणी अख्ख्या जगाच्या बिसलेरीच्या थोबाडीत मारेल असंच  पाणी आहे म्हणून!".  रमत-गमत, टवाळक्या करत संध्याकाळी पाच वाजता मुक्कामी पोचलो.

     आज होता 'हेमकुंड साहिब' ट्रेक.   'हेमकुंड' म्हणजे बर्फाचे सरोवर.   ४, ३२९ मी. उंच. वर्षातले आठ महिने बर्फाच्छादित.  भारतातलं सगळ्यात उंच सुंदर तिर्थस्थान. रोजच्या सारखं आजही सहा वाजता निघालो.   काल व्हॅलीत मुंबईकर स्वातीला इतकी निर्मळ शुद्ध हवा न मानवल्यामुळे त्रास झाला म्हणून आम्ही सगळ्यांनीच खबरदारी म्हणून होमियोपॅथीच्या 'कोका' घेतल्या व कापूर जवळ ठेवला. हा सहा किमीचा अतिशय अवघड ट्रेक! फक्त चढणच चढण. मध्ये मध्ये ग्लेशियर्स, उबड-खाबड वळणं, रस्त्याच्या दोन्ही बाजूला धाबे, घोडे-पिट्टुवाल्यांची गर्दी, भरीस भर सतत पाऊस आणि दाट धुकं त्यामुळे चढायला वेळ लागत होता.   आज घोड्याने जाणाऱ्यांची संख्या खूप होती.   अंगात गरम कपडे नाहीत, बरसाती नाहीत,  नंगे पैर असे अगदी आठ वर्षाच्या मुलापसून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत,  'सतनाम वाहे गुरू' जप करत जाणारे भक्त पाहिले की त्यांच्या श्रद्धेपुढे आपण नतमस्तक होतो आणि नकळत 'ग्यानबा तुकारामचा' गजर करत जाणाऱ्या वारकऱ्यांची आठवण होते. काटकोनातल्या आईबापांना डोलीत बसून घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळाचे वारसदार बघितले की म्हणावेसे वाटते 'इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया' हे दृश्य केदारनाथालाही दिसतं.  थांबत थांबत (प्राणवायूच्या अभावामुळे एका दमात फक्त दहा पावलं चढू शकतो) चढतोच आहे चढतोच आहे.   "सतनाम वाहे गुरू! बिटीया/बहनजी थोडासाही बचा है" असं गेल्या दोन तासापासून ऐकतो आहे पण गुरुद्वारा काही दिसत नव्हता.   एक वाजेपर्यंत पोचू की नाही अशी शंका यायला लागली.  घोड्यावरून गेलेली मंडळी परतत होती.  घोडा करावा की काय असा  विचार करत नाही तो सत्संगाचा आवाज कानी पडला. चालायला जरा हुरुप आला तरी गुरुद्वारापर्यंत पोचायला एक तास लागला.   वर पोचल्यावर धुकं अजून दाट झालं होतं. थंडी तर इतकी प्रचंड होती की गारठून पुतळा होतो की काय वाटायला लागलं. दर्शन घ्यायला जायचं म्हणजे बुट काढावे लागणार होते. बुट काढायची हिम्मत होत नव्हती. एवढे कष्ट घेवून वरपर्यंत आलोच आहोत तर दर्शन घेवूनच जावे असा विचार करून हिम्मत केली. दर्शन घेऊन थेट लंगरमध्येच गेलो.   गरमा-गरम खिचडीच स्टीलच वाडगं हातात घेतलं पण हाताला चटके बसायचं  तर सोडाच गरम सुद्धा लागत नव्हतं.   वाडगंभर खिचडी आणि चहा प्यायल्यावर जरा तरतरी वाटायला लागली. तेवढ्यात विनायकसर बोलावायला आले.   धुकं जरा हटलं होतं.   कुंड आता दिसायला लागलं होतं. चारी बाजूला पर्वत  व मध्ये सरोवर.   पाण्यात पडणाऱ्या गेल्शियरच्या प्रतिबिंबाचा सुंदर फोटो काढत नाही तो परत धुकं दाटून आलं. एवढ्या थंडगार सरोवरात  भाविक शिख स्नान करत होते.   एका  धाब्यावर सरदारणीशी गप्पा मारत होतो. तिनेही आम्हाला तिथे नक्की स्नान करायला म्हटलं होतं पण स्नान तर सोडूनच द्या, पाण्यात हात घालायची हिंमत झाली नाही.

      इथलं वातावरण  मिनीटा मिनीटाला बदलतं.  आता  धुक दाट झालं होतं आणि एक वाजला होता त्यामुळे एकमेव लक्ष्मणाचं मंदिर न बघताच परतीची वाट धरली.  थोडसं उतरून आल्यावर धुक आणि पाऊस कमी झाला होता.   बह्मकमळ जे फक्त इथे आढळतात, ती नीट बघू शकलो.   व्हॅलीत एकही न आढळलेले ब्ल्यू पॉपी इथे मुबलक होते. क्यामेरात बंद करत नाही तो परत धुकं दाटून आलं.   आयुष्यात कधी इतकी मान तुकवली  शरमेने, लज्जेने किंवा विनम्रतेने?  नसेल तेवढी ह्या सहा तासात तुकवून दुखायला लागली होती ( जरा मान वर केली आणि पाय घसरला की थेट वरचाच रस्ता). मानेला, डोक्याने पूर्ण १००%सक्रिय पाठिंबा दिला. केव्हा एकदा पोचतो असं वाटायला लागलं होतं. आता हॉटेल्स, राहुट्या दिसायला लागल्या होत्या. तरी पण पोचायला एक तास लागला. इथे बऱ्याच जणांना हाय अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास झाला. दुसऱ्या दिवशी घांगरिया सोडायचं होतं म्हणून परत इथला नेहमी प्रमाणे रंगलेला निरोप समारंभ व कॅंप फायरचा कार्यक्रम साडे नऊ वाजता दिवे बंद होत असल्यामुळे आटोपता घ्यावा लागला.