मुर्डी...
मी पाहिलेले गांव, तसं म्हणण्यापेक्षा मला भावलेले गांव म्हणणे जिल्हा रत्नागिरी, दापोली तालुक्यातील मुर्डी... माझं मूळ गांव.
दृष्य पहाण्याची क्रिया डोळ्यांशी थांबते. पण ती अंतरापर्यंत उतरली, घर करून राहिली की ते दृष्य भावतं, तेथे जवळीक निर्माण होते.
मुर्डी, मुळ नांव मरुत्तटी. मरुत म्हणजे डोंगर. डोंगराचे तटी वसलेले गाव म्हणुन मरुत्तटी. असा या नावाचा अर्थ. शिवरायांनी ह्या गावाला भेट दिल्याचा इतिहास आहे.
फर्ग्युसन कॉलेज पुण्याचं प्रसिध्द, तितकेच प्रसिध्द त्याचे प्राध्यापक रॅग्लर र. पु. परांजपे, पहिले रॅग्लर. हे ह्याच मुर्डी गावचे. दुसरे म्हणजे कोकणचे साहित्य म्हटले की प्रकर्षाने लक्षात येतं ते नाव श्री. ना. पेंडसे, ते ही ह्याच गांवचे. मुर्डीचे.
तुमच्या लक्षात आलंच असेल हे गाव कोकणातील आहे. कोकण म्हट्ल की समॉर येतात माडा पोफळींच्या बागा, खळखळणाऱ्या नद्या-खाड्या आणि फेसाळणारा समुद्र. अशा निसर्गाचे सानिध्य.
माझा गाव ह्या पाडगांवकरांच्या कवितेतील गावासारखंच हे गांव. रम्य मनोहारी... फक्त बदलत्या काळानुसार तांबड्या मातीच्या रस्त्यांची जागा आता डांबरी रस्त्यांनी घेतली इतकंच. अर्थात त्यामुळे आपल्यासारख्या शहरी लोकांना निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग सुखकरच झाला म्हणा...
पण त्याचं गावपण, संस्कृती, तीथले सण, उत्सव, आपलं वेगळेपण, जुनेपण टिकवुन आहेत.
ॠतुमानाप्रमाणे निसर्ग बदलतो. निसर्ग बदलला की हे गांवही आपला गेट-अप बदलते.
पावसात हिरवीगार वस्त्र लेवुन चींब भिजतं, तरतरीत होतं. थंडीत ठिबकणाऱ्या धुक्यात, दवात शहारत आम्रराजाच्या स्वागताच्या तयारीला लागत. ऊन्हाळ्यात तापलं, घामाघुम झालं तरी आम्रराज्याची बडदास्त ठेवण्यात रंगुन जातं. तोही त्यांच्यावर प्रसन्न होतो, भरभरुन देतॉ.
श्रीफळाचा आशिर्वाद असतोच., कायम. मग पुन्हा एकदा पावसात चींब होतं. भाताच्या संगतीत अक्षत जीवन वहात रहातं.
मस्त ना? खरंच... कुठेही बेगडीपणा नाही, दिखाऊ झगमगाट नाही, निखळ निरपेक्ष आतिथ्य करण्यास सज्ज निसर्गरम्य गांव आणि फणसाचे गुण ल्यालेली माणसं, वरुन खडबडीत आतुन मधाळ.
ह्या सर्व निसर्गरम्य गावांचे सौंदर्य सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्यांच आतिथ्य स्विकारणाऱ्या अतिथींची म्हणजे आपल्यासारख्या पर्यटकांचीच. नाही का? त्यांच निखळ सौदर्य जपत पर्यटनाचा आस्वाद लुटण्याचा वसा उचलुया...