आता ते चाचपडणं, थरथरणं;
हरवून गेलं कुठेतरी;
सांगण्यास आतुर असणारे ओठ ;
गोठूनच गेले कधीतरी.
मी सोडलं होत वाऱ्यावर त्यांना;
तोडून माझी नाळ बाजूला;
पण येतात चमकून ते;
आठवणीत पुन्हा पुन्हा.
अचानक मला ऐकू यायचं;
ते बसणाऱ्या खुर्चीच करकरणं;
अन् मला असं टाकू नको;
म्हणून त्यांचं कळवळणं.
मी मनाचे दरवाजे उघडलेच नाही;
मृत्यू घुटमळायचा भवति;
अन् त्यांचं झगडणं चालू असायचं;
भीष्मासारखं सोसून शरपंजरी.
मी टाकताना त्यांचे डोळे विरक्त;
आवाज कातर अन् भावना शून्य;
माझ्यावर आयुष्यभर सावली धरून;
त्यांच्या हाती मी न्यून.
त्यांच्या मरणाच संचित असलेलं;
मडकं मी पाण्यात सोडलं;
प्रायश्चित्त घ्यायचं म्हटलं तरी;
माझ्या वेळेच पारडंच भरून गेलं.