आठवतं तुला ते चोरून भेटणं;
भर उनाचीही सावली होणं;
निमिषभर तुला बघायचं म्हंटल;
तर वेळेचं घड्याळंच संपून जाणं.
शब्दांचा खजिना घेउन;
आपलं अबोल होणं;
अन् शपथांच्या खेळामधलं;
ते लोभसवाणं जगणं.
असे किती एकांत तेव्हा;
तुझ्या असण्याने गजबजले होते;
अन् या जगाच्या कोंडाळ्यात;
आपले विश्व वेगळे होते.
तुझं मला सोडून जाणं;
जाताना मौनात गुदमरणं;
माझं अश्रूंना सावरणं;
अन् स्मीतचांदणं पसरवणं.
आपल्या दोघांच्याही वाटा;
नव्या गावाला चाललेल्या;
अक्षता झेलत झेलत;
मनाने तुझ्याशी सप्तपदी चाललेल्या.
ही प्रतारणा होती का नव्हती;
याला आता अर्थच नाही;
होईल कधीतरी सोपं अन् सरळं;
म्हणूनतरं मी चालत गेले हे वळण.
पण तुझ्यामाझ्यातलं वाढलेलं अंतर;
भरलंच नाही रे कधी नंतर;
सप्तपदी,अक्षता,मेंदी अन् सनईचं;
वावडंच होतं तुझ्यामाझ्या नात्याला खरंतर.