नाईलच्या देशात
(प्रस्तावना - नमस्कार मनोगतींनो. काही तांत्रिक तृटींमुळे मला मनोगतावर गेले अनेक दिवस लेखन करता येत नव्हते. आता मार्ग सापडला आहे. मात्र एव्हाना सदर लेखमालेचे तीन भाग अन्यत्र प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे सर्व म्हणजे तीनही भाग एकदम प्रसिद्ध करीत आहे.)
प्रवास सूचीवर मुंबई ते कैरो उड्डाण ७३७-८०० विमानाने असल्याचे वाचून थोडा विरस झाला. ही ३ * ३ आसन रचनेची विमाने देशांतर्गत प्रवासाला ठीक असली तरी मोठ्या प्रवासाला थोडी अडचणीची वाटतात. मात्र तिथे पोहोचण्याची / तिथून परत येण्याची सोयीस्कर वेळ आणि वाजवी किमतीत हव्या असलेल्या तारखांना असलेली उपलब्धता - तिही ऐन मोसमात या निकषांवर इजिप्त एअर हा सर्वोत्तम पर्याय होता. संपूर्ण प्रवास नियोजन करून देणाऱ्या माझ्या मित्राने मला आगाऊ कल्पना दिलीच होती की ही विमानसेवा काही मोठी खास नाही पण वरील निकषांप्रमाणे योग्य आहे आणि वाईट नक्की नाही. आधी चौकशी केलेली बरी, नपेक्षा आयत्या वेळी उड्डाणे रद्द करणारी सेवा गळ्यात पडली तर सहलीचा बट्ट्याबोळ व्हायचा. रॉयल जॉर्डन चे विमान ठरलेल्या वेळेत निघतेच असे नाही आणि निघते तेव्हा ठरलेल्या स्थळी थेट जातेच असेही नाही; समजा मुंबईला निघालेल्या विमानाला अचानक कलकत्त्याचे घसघशीत मालवाहू भाडे मिळाले तर ते उड्डाण कलकत्तामार्गे मुंबई असे बदलण्यात येते असे ऐकून होतो. बाकी एअर इंडियाने प्रवास केलेल्याला इतर कुठल्याही विमानसेवेबद्दल तक्रार असायचे काही कारण नसते म्हणा. असो.
मी, पत्नी व चिरंजीव असे तिघे होतो. तिघांना मिळून साठ किलो बोजे सामानात नेता येत असतानाही (खांद्यावरचे ओझे वेगळे हो! )आपले सामान कमी आहे असे अनेकदा ऐकावे लागले. मी दुर्लक्ष केले. मात्र प्रवासात उगाच लोढणे नको म्हणून मला माझी चित्रण तिपाई घेण्यास मनाई केली गेली होती. असो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. दहाचे उड्डाण म्हणताना आम्ही नियमानुसार मुकाट्याने सातलाच दाखल झालो. खरेतर तिथे तीन तास ताटकळणे हा काही सुखाचा अनुभव नाही पण वेळ पाळलेली बरी. विमान आणि डॉक्टर यांची एकतर्फी शिस्त असते. तुम्ही उशीरा आलात तर तुमचे उड्डाण वा ठरलेली वेळ गेली. मात्र तुम्ही वेळेवर आल्यावरही तुम्हाला आपल्या सोयीने घेण्याचे अधिकार या दोहोंकडे असतात. त्यांची कारणे नेहमीच ’रास्त व अपरिहार्य’ असतात, आपण काय ते रिकामटेकडे. विमानतळावर सर्व सोपस्कार संपवून आम्ही उड्डाणद्वारासमोर येऊन स्थिरावलो. दिवसाचे उड्डाण म्हणजे कंटाळवाणा प्रकार.
उड्डाणपत्र, बहिर्गमन, सुरक्षा तपासण्या वगैरे सोपस्कार संपवून आम्ही आमच्या निर्दिष्टीत उड्डाणदरवाज्या समोरील जागेत आसनस्थ झालो. पलीकडील खुल्या उपाहारगृहात कर्मचाऱ्यांची जमवाजमव सुरू होती. आमच्याच उड्डाणदरवाज्याने एअर इंडियाचं परदेशातून आलेल्या उड्डाणाचे आता चेन्नईला प्रस्थान होते. आता यांचे उड्डाण कोणत्या दरवाज्यावर लावले आहे ते जाहीर केले नव्हते की ते त्यांनाच आगाऊ माहीत नव्हते हे तेच जाणोत, पण दर पाच मिनिटांनी होणाऱ्या उद्घोषणेबरोबर दारावरचे तसेच आसपास वावरणारे कर्मचारी तोंडाने ’चेन्नै, चेन्नै’ असे कोकलत होते. मला माझ्या लहानपणचे ठाणे स्थानक आठवले. स्थानका बाहेरील टॅक्सी अड्ड्यावर लाकडी बांधणीच्या डॉज, प्लायमाउथ गाड्या उभ्या असायच्या आणि चालक व त्यांचे अडते स्थानकाबाहेर पडणाऱ्या उतारूंकडे पाहत ’भिवंडी एक शीट’ असे ओरडत असायचे. गाडीची क्षमता वा उपस्थित उतारूंची संख्या काहीही असो, ’भिवंडी एक शीट’ हे परवलीचे वाक्य होते.
कुठे घरी संपर्क साध, कुठे कॉफी घे, कुठे आपल्या बरोबर कुठले उतारू आहेत ते अजमावून कुणी बोलका दिसल्यास नमस्कार चमत्कार कर, असे करीत वेळ काढत असताना अखेर आमचे उड्डाण जाहीर झाले आणि आम्ही सरसावलो. सुरक्षा रक्षकांबरोबर विमानसेवेचा सेवकवर्गही आत शिरणाऱ्यांच्या तपासणीत तैनात होत. कर्मचारी वर्ग हसतमुखाने वावरत होता हे पाहून बरे वाटले. विमानात शिरलो आणि आसन व्यवस्था बरी वाटली. दोन रांगांमध्ये बऱ्यापैकी अंतर होत. अगदी ऐसपैस नाही तरी गुडघे समोरच्या आसनाच्या पाठीला घासत नव्हते ही जमेची बाजू. जवळ पास सहा तास एकाच जागी बसायचे म्हणताना खरेतर बोईंग ७७७ श्रेणी वा एअर बस ३३० श्रेणी हवी. जनता दर्जाची आसनेही मोकळी व सुखद असतात. योगायोगाने आमच्या रांगेतील पलीकडच्या तीनही आसनांवर कुणीच न आल्याने ती ओस पडलेली लक्षात आली. चिरंजीवांनी विमानाचे दरवाजे बंद होण्याची उद्घोषणा होताच आम्हाला सोडून त्या आसनांपैकी मधल्या आसनावर टोपी, जाकीट वगैरे टाकत स्वतः: खिडकी ताब्यात घेतली. डोळ्यावर भगभगीत प्रकाश नको वाटत असला तरी खिडकीच्या झापा काही वेळ तरी उघड्या ठेवणे अनिवार्य होते. साधारण अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर विमान आकाशात झेपावले. थोड्या वेळाने सेवक वर्ग न्याहरी घेऊन आला. पलीकडील एका षौकिनाने ’फक्त खायलाच’ का? अशी उघड विचारणा केली तेव्हा सेवकाने हॅ हॅ करीत साळसूदपणे सांगितले की आजकाल लोक फार पितात आणि मग इतर प्रवासींना त्याचा उपद्रव होतो त्यापेक्षा आम्ही अपेयपानाला थाराच देत नाही! सकाळी सकाळी कुणी पीत नसावे असा माझा समज मागे एकदा दुबई हून पहाटे साडेचारच्या उड्डाणात दूर झाला होता. उड्डाणानंतर पाउणेकतासात सेविका ढकल गाडी घेऊन अवतरताच अनेक भाविकांनी पहाटे पाच सव्वा पाचाला काकड आरती केलेली पाहून मी थक्क झालो होतो. इथे पिण्याच्या आनंदापेक्षा ’फुकट आहे तर का सोडा’ हा भाव अधिक प्रबळ असावा.
उड्डाण बव्हंशी आखाती देशांवरून जात होत; कधी भूभाग तर कधी समुद्र. मी कॅमेरा काढला आणि मांडीवर घेऊन बसलो. काही बरे दिसले तर टिपू असे म्हणत असतानाच खाली निळ्याशार पाण्याच्या कडेने पांढऱ्या वाळूच्या भूमीवर वसलेले कुठलंसं शहर दिसलं.
मग बराच वेळ खाली निळं पाणी आणि वर निळशार आकाश, मध्येच कुठेतरी पोह्यांवर नारळ भुरभुरल्यागत विखुरलेले पांढरे तुरळक ढग असे दृश्य दिसत होते. काही वेळातच एक मजेशीर चाळा मिळाला. खाली सागरात निळे पाणी आणि लाटा यांवर तरंगत एक मालवाहू जहाज आपला मार्ग आक्रमीत होते. लवकरच आम्ही त्याला ओलांडले. आता ते जहाज अगदी बरोबर खाली होते. पुढे निळे पाणी आणि त्याला भेदत जाणारे जहाज व त्याच्या मागे फेसाचा शुभ्र पिसारा असे सुरेख दृश्य दिसत होते. आणि बघता बघता आमचे विमान वाळवंटी भूभागाकडे वळले तर ते जहाज उजव्या अंगाने निघून गेले. आता नजर पोचेल तिथे फक्त वर आकाश आणि खाली वाळू होती. वाळूच्या टेकड्या म्हणताच आपल्या डोळ्यापुढे एक विशिष्ट दृश्य उभे राहते. मात्र इथे जवळपास ३५ हजार फूट उंचीवरून सरळ रेषेत खाली बघताना मात्र वेगळेच रूप दिसत होते.
आणि अचानक वाळवंटतातील तिरकस सरपटणाऱ्या सापासारखा एक काळाशार रस्ता खालून उलगडत गेला. रस्ता दुभाजकावर जमलेल्या वाळूच्या कणांमुळे दुतर्फा पसरलेला तो रस्ता खरोखरच पाठीवर सोनेरी रेघ असलेल्या सर्पासारखा भासत होता. तो देखणा रस्ता नजर खिळवून ठेवणारा होता.
मात्र पुढच्याच क्षणी मनात विचार आला, की आपण अशा रस्त्याने जात असताना मोटारीतले इंधन संपले वा यंत्रात बिघाड झाला तर???? अंगावर काटा आला.
वाळवंटात हिरवळ हा शब्दप्रयोग ऐकला होता, पण खाली अक्षरशः: ओसाड वाळवंटात वर्तुळाकार वा अर्धवर्तुळाकार हिरवळी पाहून मी थक्कच झालो. नक्कीच या हिरवळी गोलाकार भागात खास निर्माण केलेल्या असाव्यात आणि त्यांना विशिष्ट आकार दिलेला होता. घड्याळात वेळ दाखविणारे काटे सरकताना सरकलेल्या भागात जर तबकडीचा रंग वेगळा झाला तर कसे दिसेल तद्वत चतकोर, सव्वा चतकोरांसारखे अनेक वर्तुळाकार सलग दिसत होते. सध्या जोमाने जाहिरात करत असलेल्या टाटा डोकोमो ला आपली अक्षर रचना या हिरवळीकडे पाहून सुचली असावी का असा एक मजेशीर विचार मनात येऊन गेला. हा काय प्रकार असावा हे कुतूहल अद्यापही मनात आहे. कुण्या आखातस्थाने यावर माहिती द्यावी ही नम्र विनंती. अशा हिरवळी अनेक ठिकाणी दिसल्या, माझ्या निरीक्षणानुसार त्या हिरवळी साधारण मोठ्या रस्त्याच्या आसपास होत्या.
जसजसे आम्ही आफ्रिकेकडे, खुद्द इजिप्तकडे जवळ सरकू लागलो, तसे खालचे वाळवंटही बदलले. वाळूच्या टेकड्या व पठारांची जागा आता मोठ्या खडकाळ पर्वतांनी घेतली होती. पर्वत म्हणजे जणू थिजलेला लव्हारस! एखाद्या मुशीतून साच्यात ओतून एकसंध पाडावे असे कडे पर्वत माथ्यांवर पसरलेले होते. एकूण पसरलेल्या पर्वतरांगा पाहताना आपल्या सह्याद्रीच्या पर्वतमाथ्यांवरील दुर्गांची आठवण न झाली तरच नवल. फरक इतकाच की कुठे हिरवळ वा मृदू जमिनीचा थांगपत्ताही नव्हता सगळा मामला दगडाचा. जणू खडक छिन्नीने फोडून हा पर्वत कोरला असावा. या पर्वतांवरून जलौघ वाहायचे दूरच, मात्र प्रवाही वाटांवरून वाळू वाहत होती. अशाच वाळूच्या झऱ्यांनी सजलेल्या एका पर्वताच्या पायथ्याशी सोसाट्याच्या वाऱ्याने धुरळा उडवायला सुरुवात केलेली दिसली. वाळूचे लोट आसमंतात पसरत टेकड्यांच्या माथ्यापलीकडे उधळताना दिसत होते.
मात्र एकाएकी या उदी तपकिरी निसर्गदृश्यात निळा रंग अवतरला! ते अविस्मरणीय मी कधीच विसरू शकत नाही. अलीकडे मऊसूत भासणाऱ्या वाळूचे गालिचे, पुढे जेरी माउसच्या चीजसारखे दिसणारे व वाळूचे प्रवाह अंगावर वागवणारे पर्वत व त्या पलीकडे निळेशार पाणी!
आता प्रवास संपत आला होता असे घड्याळ सांगत होते. सेवकवर्गाचीही आवरासावर सुरू झाली. विमानातील चित्रपटलावर कैरोचा मार्ग दिसत होता, ठिपका जवळ येत होता. अचानक विमान डावीकडे झुकले व एक झोकदार वळण घेत विमान पुढे निघाले. विमान आता उंची कमी करीत बऱ्यापैकी खाली आले होते. एव्हाना वाळवंट गायब होऊन तिची जागा देखण्या निळ्याशार सागराने घेतली होती. मंचकावर भरल्यापोटी पसरून विश्रांती घेणारे ते समुद्रदेवतेचे रूप मोठे विलोभनीय होते. निळ्या रंगाच्या अनेकानेक छटांनी नटलेले जणू ते निसर्गदृश्यच. संथ हलक्या लाटा, मध्येच नितळ पाण्यातून दिसणारा भूभाग तर किनाऱ्याला जमीन व पाण्याचा तरंग असलेला काठ यांच संगम असे ते दृश्य होते. विमान आणखी खाली झेपावले आणि तो क्षण अचूक साधत मी लाटांनी साय धरलेले जलपृष्ट व त्यावर परावर्तित होऊन चकाकणारे ऊन हे दृश्य टिपले.
आणि अचानक डोक्यात किडा वळवळला. नकाश्यांत कैरो सरळ पुढे दिसत असताना आमचे विमान मात्र डावीकडे वळले होते आणि बराच वेळ तसेच जात होते. आतातर उंचीही घटत होती. वाईट शंका सहसा खोट्या ठरत नाहीत. मी उठून काही विचारायच्या आतच उद्घोषणा झाली ’ खराब हवामानामुळे कैरो विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे विमान आता कैरो ऐवजी हुर्घाडा येथे उतरविण्यात येत आहे’ क्षणभर सन्नाटा आणि मग सर्वत्र एकच गलका उठला. ’आता काय? ’ या प्रश्नाने सर्वांना चिंतित केले होते. मुंबईहून निघालेल्या विमानात बहुसंख्य उतारू भारतीय होते, सगळेच पर्यटक होते. जर आज कैरोला पोहोचलोच नाही तर न्यायला आलेले सहल आयोजक कुठे भेटणार? आपले विमान आता येत नाही तर ते कधी येईल हे त्यांना कसे समजेल? प्रत्येकाचा मुक्काम एकेका ठिकाणी नेमका ठरलेला. जर पहिलाच दिवस बुडाला तर सगळेच ओंफस! बोंबला! जरा वातावरण निवळल्यावर कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की इजिप्तचे हवामान अत्यंत लहरी आहे. हवा कधी पालटेल काही नेम नाही. बरोबरच आहे, अगदी अर्धा तास आधी आम्हालातरी कुठे माहीत होते? मनात अनेक प्रश्न होते पण उत्तर नव्हते. जेजे होईल तेते पाहणे यापलीकडे हातात काहीच नव्हते. असो. आता जे आहे त्यांत बरे शोधा हे खरे. मी अर्चनाला म्हणजे माझ्या पत्नीला व चिरंजीवांना उसने अवसान आणीत म्हणालो, ’चला रे आपल्या रूपरेषेत हुर्घाडा नव्हते ते अनायासे फुकटात पाहायला मिळतंय तर बघून घ्या’. हुर्घाडा हे लाल समुद्राकाठचे ठिकाण, पर्यटनासाठी प्रसिद्ध. आता पुढची चिंता करण्यापेक्षा हुर्घाडाचे सौंदर्य दिसतेय तितके टिपून घ्यायला मी सज्ज झालो. विशाल सागरात मध्येच पसरलेली बेटं आणि पांढऱ्या-बदामीसर वाळूवर निळ्या रंगाच्या पाण्याने रंगवलेल्या छटा टिपताना मी रंगून गेलो.
कुठे किंचित माथा वर असून बाकी पाण्याखाली गेलेली बेटे तर कुठे वाळूचे बेट असा खेळ चालला होता. अखेर हुर्घाडा विमानतळ आला आणि किनाऱ्याची वस्ती दिसू लागली. ज्या वेळेस आम्ही कैरो गाठणार त्या वेळी आम्ही शेकडो मैल दूर हुर्घाडा येथे उतरून पडलो होतो.