दमादमाने जातच आहे
कंप तरी श्वासातच आहे
रोज उगवतो सूर्य तरीही
जीवन अंधारातच आहे
दुर्दैवाला शह देतो पण,
मला मिळाली मातच आहे
गळा जाहला रुद्ध तरीही
सुरेल मन हे गातच आहे
रक्तदाब वाढला तरीही
समद्य्,सामिष खातच आहे
संधिवात परवडतो,कारण
वैद्याची फी वातच आहे
नास्तिकच तरीही शनवारी
लिंबू मम दारातच आहे
विसंबलो ज्यावरी तयाने
खास करावा घातच आहे
उघड करावे सदैव वाटे
भाव लपूनी आतच आहे
सर्व धर्म समभाव तरीही
जात नाहि ती जातच आहे.
ना वृत्ती दुसर्या कोणाची
दोषहि ''कैलासा''तच आहे.