भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले
मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले
आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?
मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले?
हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले
शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्याने मोजले!
अनिरुद्ध अभ्यंकर