...............................................
स्वप्नामधली पडछाया तू...!
...............................................तुझी वेदना गहिरी होते
आठवणींच्या उदास प्रहरी
आणि मनाच्या डोहांमधुनी
लहरींमागे उठती लहरी !कधीच नव्हते पेलणार जे
असे कशाला स्वप्न पाहिले...?
स्वप्न शेवटी स्वप्नच होते...
स्वप्न शेवटी स्वप्न राहिले !भासलीस तू अशी...तशीही...
कधी शुभ्र पुनवेची माया
खरा चेहरा तुझा कोणता ?
कधी सावळी झिळमिळ छाया !स्वप्नामधल्या त्या छायेचा...
हात कशाला मीही धरला ?
स्वप्न संपले, पुनव लोपली...
काळोखाचा रस्ता उरला...!
पुन्हा चांदणे पडेलसुद्धा
अजूनही का असे वाटते ?
मावळते ती धूसर आशा
अन् अवसेची रात्र दाटते !* * *
एकाकीपण हे रात्रीचे
आता अगदी नकोनकोसे
रात्र भोगते माझी दुःखे
मी रात्रीला निमूट सोसे....!
गतस्मरणांच्या मागे मागे
धावधावुनी येई थकवा...
हाती उरते शून्यच केवळ...
...शून्यच केवळ ! आणिक चकवा !!
कधी आस तर कधी निराशा
खेळ खेळती दोन सावल्या
कठपुतळीसम मज नाचवती...
या छोट्याशा, क्षुद्र भावल्या !* * *
डोहामधले हिरवट पाणी
डोळ्यांमधुनी कधी तरळते...
`बघ पुनवेचे स्वप्नच आता...`
ही अवसेची रात्र बरळते... !जन्म वाहण्यासाठी नव्हता
अंधारातच जिणे साचले...
सुरुवातीला दोन-चार पण
किरण उगाचच इथे नाचले...!* * *
खुळाच मी... मज वाटत राही...
त्या किरणांचा खुळा भरवसा
अजूनही मी शोधत बसतो
काठावरती एक कवडसा !खेळ व्यर्थ हा... तरी कळेना -
- असे कसे अन् का करतो मी ?
स्वप्नामधली पडछाया तू...
तुझी अपेक्षा का धरतो मी ?प्रदीप कुलकर्णी
...............................................
रचनाकाल ः २० फेब्रुवारी १९९८
...............................................