हे का असे की
रोज माझी कुठे न कुठे परीक्षा घेतली जाते
अन् निकाल मात्र कधीच लागत नाही..
रोज पाहून येतो आभाळाला चिकटवलेला निकालाचा कागद
ज्यात नसतेच माझे नाव!
की असे आहे?
ठरलेला आहे माझा निकाल
आणि माझ्या शंभर परीक्षा झाल्या की
येईल एक निर्णायक सुदर्शनचक्र
आणि काढेल माझा प्रश्न कायमचा निकाली!
असेलही.
पण आज माझ्या पुढ्यात आहे एक नवी प्रश्नपत्रिका
बहुतेक अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न असलेली!
मात्र इतक्या परीक्षा देऊन आता मी ही झालो आहे
एक पढतशहाणा!
यापुढे देत जाईन कोरीच उत्तरपत्रिका प्रत्येकवेळेस
आणि घालत जाईन भर एका नव्या शून्याची
माझ्या शून्यांच्या खजिन्यात.
बस्स!
आता येऊ दे काहीही
सुदर्शनचक्र किंवा नवी प्रश्नपत्रिका
माझे उत्तर तयार आहे!
----------------------------------------------------
जयन्ता५२