बापू म्हणजे माझा बालमित्र.त्यामुळे त्याच्याकडे जाऊन गप्पाष्टकात चांगला वेळ जातो. त्याच्यामते तो अगदी शांत स्वभावाचा माणूस आहे. मात्र त्याचा शांतपणा हा फक्त आपण त्याच्या होला हो म्हणत असतो तोपर्यंतच टिकतो.त्याच्या मते तो फार शिकलेला नसला तरी त्याची अभिरुची उच्च आहे." हे बघ मी फारसा शिकलो नाही तरी चांगले काय आणि काय वाईट आहे हे मला समजते " या बाबतीत मीही त्याच्याशी सहमत असतो कारण वहिनींच्या खाद्यपदार्थात अगदी बारीकशीही चूक झाली तर तो लगेच तिचा पंचनामा आमच्यासारख्या दोस्तांच्या देखतच करायला मागे पुढे बघत नाही आणि त्याही निमूटपणे ऐकून घेतात. त्याबद्दल मला त्याचा हेवाही वाटतो कारण असे धाडस करण्याचा अविचार कधी माझ्याकडून झाला असता तर पुढील जन्मभर माझ्यावर शिव्या हा एकच पदार्थ खाण्याची पाळी आली असती.मुख्य म्हणजे तो स्वयंपाकही उत्तम करतो त्यामुळे त्यातील चुका काढण्याचा त्याला हक्कच आहे.आणि त्याला एकादी गोष्ट जमत नसेल तरीही त्यातील चुका काढण्याचा त्याचा हक्क अबाधित आहे कारण त्याच्या मते "आम्लेट कसे झाले हे समजायला अंडे घालावे लागत नाही."
टी.व्ही.बघण्याच्या बाबतीत त्याच्यात आणि वहिनींच्यात फक्त मारामारीच काय ती होत नाही.कारण त्याच्या मते त्या मालिकांमध्ये असतेच काय पहाण्यासारखे असते ?त्याच्या मते मालिका म्हणजे त्याच त्याच चावून चघळायच्या कथा,त्याच सासवा,सुना.कधी सासू कारस्थान करते तर कधी सून. तसे त्याच्या या निरीक्षणात व त्यावरून तयार केलेल्या मतात अगदीच तथ्य नसते असे नाही,पण वहिनींचा दृष्टीकोण वेगळाच! त्या म्हणतात " हे बघा आमचा वेळ चांगला जातो.तुम्हाला पहायच्या नाहीत ना तर तुम्ही पाहू नका पण मला का तुमचा सासुरवास आणि या बाबतीत मात्र त्याला वहिनींच्या समोर पडते घ्यावेच लागते.
त्याच्या मते लोकांनी चांगले तेच दाखवावे आणि चांगले तेच पहावे.लिहिण्याच्या बाबतीतही त्याचे मत असेच त्याने बोलून दाखवले "उगीचच कागद आणि शाई आहे म्हणून लोकांनी लिहिलेच पाहिजे असे थोडेच आहे ? काहीतरी चांगले उत्कृष्ट लिहायचे असेल तरच त्या लिहिण्यात अर्थ.आता हा दिवाळी अंकच पहाना ---" एक अंक माझ्यापुढे धरून फडफडवत " सहज चाळला तर एका पानात पन्नास चुका.आता या संपादकाला काय कोणी सांगितले आहे का की मुकाट्याने काढ दिवाळी अंक नाहीतर तुला फाशीची शिक्षा मिळेल" इतके सगळे ऐकल्यावर मला गप्प रहावेना,मी म्हणालो " अरे बापू,खुद्द ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवले आहे"
आता ज्ञानेश्वरांचे नाव ऐकल्यावर मात्र त्याच्या तोंडाचा पट्टा एकदम थांबला कारण याही बाबतीत त्याचा एक दृष्टीकोण आहे तो म्हणजे " बरका बंडू,आपण काय सांगितले आहे याच बरोबर ते कोणी सांगितले आहे याकडेही लक्ष द्यायला हवे. " त्यामुळे काही व्यक्तींच्या बाबतीत त्यानी जे काही सांगितलेले असले ते योग्यच असते असा त्याचा ठाम विश्वास आहे.अशा व्याक्तींमध्ये त्याच्या यादीत तुकाराम,ज्ञानेश्वर,विवेकानंद ही मंडळी आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरांचे नाव घेताच तो माझ्याकडे प्रश्नार्थक चेहरा करून बघू लागला.या बेसावध क्षणाचा फायदा घेऊन मी माझा मुद्दा पुढे रेटण्याची संधी घेतली..
" हे बघ बापू,अठराव्या अध्यायात ज्ञानेश्वर काय म्हणतात
राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शहाणे । आणिक काय कोणे । चालावेचिना ॥१८.१७१३॥
ज्ञानेश्वरांनी हे अगदी स्वत:विषयीच सांगून ठेवले आहे. अर्थात हा त्यांचा नम्रपणाच आहे.पण ज्ञानेश्वरांनाही तुझ्यासारखे वाटत नाही.आपण गीतेसारख्या महान ग्रंथावर टीका वा भाष्य करतोय हा मोठा अपराधच करतोय असे एकीकडे वाटत असतानाच ते आपले समर्थनही करतात की राजहंसाच्यासारखे चालणे प्रत्येकालाच थोडेच जमणार आहे पण म्हणून बाकी इतरांनी काय चालूच नये काय ?थोडक्यात तुझे म्हणणे जे फक्त चांगले लिहिता येणाऱ्यानीच लिहावे नाहीतर उगीच कागद शाई यांची नासाडी करू नये याबाबतीत ज्ञानदेवानीच इतरानीही यथाशक्ती आपल्याला जमेल ते आणि जमेल तसे आपल्या आवडीचे काम करावे असाच संदेश दिला नाही का?"
अर्थात या माझ्या विधानाला आक्षेप घेण्याऐवजी गप्प रहाणेच बापूने पसंत केले.
ज्ञानेश्वरांचा हा वारसा सर्व मनोगती मात्र अगदी मनोभावे जपताना दिसतात.