त्या दिवशी आम्ही ब्रेकफास्टसाठी मेसकडे चाललो असता प्रत्येकाचे चेहरे निराळेच दिसत होते. कुजबुज चालली होती. वातावरण रहस्यमय भासत होते. प्रत्येकाचे बुशकोटचे खिशात निनावी संदेश कोठून तरी गुपचिप येऊन पडले होते... स्ट्राइक !
वायुसेनेच्या सर्व तुकड्यांत (स्क्वॉड्रन्स) त्याच दिवशी एकसमयावच्छेदेकरून 'टूल्स डाऊन' स्ट्राइक सुरू झाला होता.... तुमच्यासह ! हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या.. कोठेही असले तरी... सर्व पथकांना हाच संदेश, आदेश मिळाला होता ! कोणाकडून ? केव्हां ? Talk not, obey ! That's all.
आमच्या कॅम्पची रचना मोठी छान होती. मध्ये मोठी रुंद सडक, पलीकडे टेकएरिया, हवाई अड्डा. सगळे सेक्शन्स टेकएरियातच. ऑफिसे, विमाने, त्यापलिकडे गोऱ्यांसाठी बरॅकी. सडके अलीकडे आमच्या बरॅकी, ऍड्मिन् ऑफिस, आमची मेस, वॉटर टँक, खेळांची मैदाने, परेड ग्राउंड आणि आरमरी-शस्त्रागार.
ब्रेकफास्ट नंतर प्रत्येक जण घुटमळू लागला... काय करावे...
इतक्यात हूटर झाला, म्हणजे हुकुमात्मक सूचना - " ताबडतोब टेक एरियात हजर व्हा ! " घाईघाई दर्शवित पण अगदी सावकाश सर्वजण टेकएरियाकडे निघाले.
टेक्नीशियनना सूचना : सर्व विमाने सज्ज करा. इमर्जन्सी पोझ नं वन ! पुढील सूचनेसाठी थांबा ! नंतर, ' सर्व्हिसेबल विमाने रेडी तू स्ट्राइक ' पोझ.
आर्मरर्स : " टु लोड गन्स.. स्ट्राइकींग पोझ. लोड 250 Lbs. G P Bombs to strike ! "
पंधरा मिनिटांत सर्व तंत्रज्ञ टेकएरियाबाहेर पडले. हवाई अड्ड्यावर फक्त ऑफिसर्स आणि सिनियर नॉन्कमिशन्ड ऑफिसर्स म्हणजे SNCO उरले. त्यांचे चेहरे भितीग्रस्त. त्यांचे व्यतिरिक्त सारे मेसमध्ये हजर. कार्पोरल प्रसाद म्हणाले - सर्वांनी आर्मरीत जावे - त्यांनीच आदेश दिला आम्हाला - आधी येतील त्यांना बॅनेटसह रायफल पंचवीस राउंड्स; त्यानंतर येणाऱ्यांना स्टेशनगन्स पन्नास राउंड्स; त्यानंतर फक्त आर्मरर्सना रिव्हाल्वर्स पन्नास राउंड्स. निवडक ते सांगतील त्यांनाच फक्त मशिनगन्स द्या. प्रत्येकाचा नंबर , नाव, व्हेपन नं, राउंड्स संख्या रजिस्टर मध्ये नोंदी करून इश्यू करणे ! सटासट सर्वांना शस्त्रे वाटली. १०-१० जणांची टोळी, एक नायक ! मोक्याच्या जागा पकडल्या गेल्या.
विरुद्ध बाजूने बार झाल्याशिवाय फायर न करणे, कोणी विचारल्यास न बोलणे. हे अलिखित् नियम. डोमेस्टिक कँप सोडून न जाणे !
एकाएकी धुमधाम उडाली ! गोऱ्यांनी डोमेस्टिक कँप वेढला. चारीबाजूंनी नाकेबंदी केली. तेही शस्त्रधारीच. गोरा आर्ममेंट ऑफिसर आला. आम्हांला विचारले, " कोणाचे हुकुमावरून हत्यारे इश्यू केलीत.. विदाउट ऑथॉरिटी ? " चकार शब्दच नाही. इतर धमक्या वगैरे न देता तणतणत घाईनेच गेला. थोड्या वेळाने लाऊडस्पीकर वरून स्टेशन कमांडर, ग्रूप कॅप्टन बोलले, " ऑर्डर न मानता, न विचारता (परमिशन) कामाची जागा सोडून जाणे हा भयंकर अपराध आहे. कोर्टमार्शल ऑफेन्स ! पर्मिशनविना शस्त्रे वाटणे, लढणे हा त्यापे़क्षाही मोठा गुन्हा आहे. मी समज देत आहे. अर्ध्या तासात शस्त्रे डिपॉजिट करून हजर व्हा ! रेडीनेस ऑर्डर कँसल ! कँसल बाय हायर ऑथॉरिटीज ! "
" ही ऑर्डर न पाळल्यास परिणामांची जबाबदारी तुमचेवर राहील. ट्राय टु फॉलो मी ! फॉर गुड ! वैयक्तिक गाऱ्हाणी कंप्लेन्टस्, सूचना वेलफेअर ऑफिसरकडे द्या, किंवा सेक्शन ऑफिसरला भेटा.. तसे केल्यास कोणाबद्दलही विरुद्ध कारवाई होणार नाही. तुमच्या अडचणींकडे सहानुभूतिपूर्वक पाहून विचार होईल ! " ही दुसरी घोषणा वेलफेअर ऑफिसरकडून झाली.
वेढा उठला !
सर्वांनी शांतपणे शस्त्रे आर्मरीत डिपॉझिट केली. आणि अगदी शिस्तीत सेक्शनचा मार्ग धरला. सेक्शनमध्ये ऑफिसर्स नव्हतेच. इतर सार्जण्टनी सर्वांना बॅरॅकीत जाण्याची अनुमती दिली. सायंकाळी 'सेशन' ऑफ जाहीर झाला. दुसऱ्या दिवसापासून येरे माझ्या मागल्या. रुटीन चालू झाले.
नंतर कळले. हिंदी शाही वायुदलाच्या सर्वच लढाऊ पथकांत (स्क्वॉड्रन्स) सर्वत्र अशीच स्थिती उत्पन्न झाली होती. त्या काळी वायुसेनेत नऊ लढाऊ आणि दोन ट्रान्सपोर्ट पथके होती. सर्व ठप्प होती !
आमच्याच हिंदी नौसेनेवर बाँबहल्ला होणार होता. एकमेकांचे मारेकरी आम्हीच ठरलो !
हे सर्व कोणामुळे टळले ? सूत्रधार कोण ? आम्हाला कळलेही नाही. कशी का असेना एकच भावना सर्वत्र प्रज्वलित झाली होती. हे घडणी सोपे नव्हते. मिलिटरीत तर अघटितच. पण संकट टळले ! कसे ? कशामुळे ? कोणामुळे ? सांगता येत नाही. कदाचित गोऱ्यांमुळेच असेल - गोऱ्यांची धूर्त राजकीय मुत्सेद्देगिरीच कारण असणार ! तरीपण जिवावरचा धोका पत्करण्यात वायुसैनिकांनीही फार मोठे मनोधैर्यच दाखविले नव्हते का ? कदाचित् त्या दिवशी सर्वनाश होऊ शकला नसता का ?
या सर्व धैर्यधारकांचाच धसका गोऱ्यांनी घेतला असावा ! गाशा गुंडाळून लवकर जाण्यास भाग पाडण्यास हाच जबरदस्त धक्का नव्हता का ?
पण हा जबरदस्त - परिणामकारक धक्का देणाऱ्या, असंख्य महान - परंतु लौकिक दृष्ट्या अतिलहान - सामान्य, नगण्य म्हणाना - देशभक्तांकडे सहानुभूती ने कौतुकाने पाहिले का ? छे ! उलट उपेक्षाच नशिबी आली. नौसैनिक पुढाऱ्यांना रिंगलीडर्स ठरविले गेले ! गुन्हेगार !
आपसातील रक्तपात धुळधाण टळावी म्हणून, सरकारतर्फे नौसैनिकांना सांगण्यात आले, " तुमचे प्रश्न आम्ही तुमच्याच राष्ट्रीय नेत्याकडे सोपवितो, त्याचे निर्णय तरी ऐकाल का नाही. " यात कुटिलनीति होती. रक्तपात टळावा आणि रँन्टिंग्जना परस्पर धडा मिळावा हाच हेतू होता. कारण आपल्या राष्ट्रीय नेत्यांचे लष्करी अज्ञान आणि अहिंसादी उदार तत्त्वे, धोरणातील धरसोड वृत्तीची कुवत ! धरणीवर पावले स्थिर राखून खंबीर देशहितात्मक निर्णय घेण्याऐवजी इंटरनॅशनल विचारधारा ... अति उच्च विचारसरणीने प्रेरित... त्याचे अद्वितीय अव्यवहार्य पद्धतीचा गोऱ्यांना - सरकारला अनुभव होताच. त्याचाच लाभ त्यांनी घेतला.
आणि नेत्यांनी नित्याप्रमाणेच वैचारिक घोळ घातलाच. घोळ पाडून नौसैनिकांना शेवटी मातीत घातलेच अशी सैनिकांची शेवटी समजूत झाली.
नौसैनिकांच्या उठावाची ही फलश्रुती.... दुःखांतिकाच.
स्क्वॉड्रन नंबर ४ चे कमांडिंग ऑफिसर, अचानक आजारी पडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असल्याचे कळले. आमच्यापैकी ज्यांनी जपानमध्ये न पाठविण्याबद्दल अर्ज दिले होते, त्यांपैकी बहुतेकांच्या बदल्या दुसऱ्या युनिटमध्ये करण्यात आल्या. मलाही तूर्त (टेम्पररी) म्हणून नंबर ४ स्क्वॉड्रन मधून स्टेशन स्टाफ मध्ये बदली मिळाली... काही दिवसांसाठीच.
नंबर ४ स्क्वॉड्रन यथावकाश जपानला रवाना झाले !
एका खळबळजनक घटनेवर पडदा पडला ! आणि ,
यथावकाश सारी घटना विस्मृतीत विलीन झाली ! ...
[ पुस्तक प्रकाशित करण्याच्या सुमारास मूळ लेखनात बरेच बदल करण्यात आले, काही नावांचे उल्लेख वगळण्यात आले. तसेच हिरव्या रंगाने दर्शविलेले शब्द घालण्यात आले. हितचिंतकांनी सांगितले, वीस वर्षांच्या निवृत्तिनंतर कशाला पेंशनवर गदा आणून घ्यायची. ]
___________________________________________
काही मनोगतींनी " गरुडांचे सहवासात " ह्या पुस्तकाबद्दल उत्सुकता दाखवून विचारणा केली होती. श्री. राज जैन यांच्या सहकाऱ्याने हे पुस्तक साधारण ४-५ दिवसांत www.anamika.co.in वर ग्रंथालयात पहायला मिळेल.