वार्षिक परीक्षा आटोपली. महिनाभर आधीच मी व माझा भाऊ आजी-आजोबांकडे जाऊन काय काय मज्जा करायची त्याचे मनोरे रचत होतो. त्यामुळे आईची बोलणीही खात होतो. आधी अभ्यास करा धडपणे, नाहीतर यावर्षी मूळीच नेणार नाही. असे आणि बरेच काही. आम्हीही घाबरून पुन्हा पुस्तकात डोके घालत असू. शेवटी आमचा अंत पाहून तो दिवस आला. रेल्वेत बसलों आणि दरमजल करीत आमच्या गावी येऊन पोहोचलो. आजीचे घर म्हणजे मोठा बंगला. मागे पुढे प्रचंड अंगण. फुले,फळे, शोभेची झाडे, पाहातच राहावे. खेळणें, खाणें आणि मस्त लोळणे. आजीकडे गडीमाणसे खूप होती. प्रत्येक कामाला माणूस होते. मला फार मजा वाटे. काहिही म्हणायचा अवकाश लागलीच कोणीतरी लगबगीने येई आणि करी. मुंबईच्या लहानश्या तिन खोल्या, खालून पाणी भरणे, सारे काही आपणच करणे ह्या पार्श्वभूमीवर ही चैन आम्हाला आवडत असे. सगळ्यांना आम्ही नातवंडांनी लळा लावला होताच त्यामुळे तेही आनंदाने सारे काही करीत.
आम्ही पोहोचेतो राञ झाली. त्यामुळे गेल्या गेल्या गरम गरम साधंच पण रूचकर जेवण जेवून मी आजीच्या कुशीत झोपीही गेले. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी उजाडले त्यावेळी सकाळचे दहा वाजून गेले होते. स्वयंपाकघरातून छान छान वास येत होते. पटकन तोंड धुवून मी ओट्यापाशी गेले आणि लक्षात आलें की नेहमीच्या स्वयंपाकिणबाई नाहीत ह्या. मग आजीला विचारल्यावर कळाले, अक्कांना आताशा होत नाही त्यामुळे ह्यांना नेमले आहे. त्यांचे नांव शालीनी होते. सगळे त्यांना शालूताई म्हणत. गोऱ्या, घाऱ्या डोळ्यांच्या, शेलाटा बांधा. स्वभावाने गरीब होत्या. पोरांचे पोट भरण्यासाठी हा मार्ग पत्करावा लागलाय हेही कळाले.एके काळी स्वतःच्या घरी नोकरचाकर असणाऱ्या शालूताईंना हे दिवस पहावे लागत होते. पण त्या स्वाभिमानी होत्या, दिराकडे न जाता स्वतःच हिमंतीने प्रयत्न करीत होत्या.का कोण जाणे त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटू लागली. आमची हळूहळू चांगली गट्टी जमली.त्यामुळे कधीमधी आजीचा ओरडाही खावा लागू लागला. "खेळायचे सोडून कशाला सारखे स्वयंपाकघरात लुडबूडत असतेस ग?" असेच दोन-तिन आठवडे गेले. आम्ही पोरे उंडारत होतो. पानमळ्यातले जेवण,अंगणातील भेळ,पॉटमधले किंचित खारट आईस्क्रीम, उसाचा रस.... .मज्जाच मज्जा.
सकाळी सकाळी घरात गोंधळ-गडबड ऐकू आला म्हणून डोळे चोळत चोळतच गेले, तर दररोज पूजा करायला येणारा नारायण रडवेला होऊन आजीला सांगत होता," देवाशपथ नैवेद्याची वाटी काल इथेच ठेवली होती, पण आज ती दिसत नाहीये." आमची आजी खूप प्रेमळ, दयाळू होती पण चोरी म्हटंले की मग माञ ती एकदम रूद्रावतार धारण करीत असे. नारायण आमच्याकडे खूप वर्षे काम करीत असल्यामुळे आजीला त्याचा संशय नव्हताच. इतरही सारेजण जुनेच होते, फक्त शालूताई नवीन. त्यात दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आजीकडे दोनशे रूपये मागितले होते. मग काय आजीने त्यांना सगळ्यांसमोर विचारले, " खरे खरे सांगा, घेतलीत का तुम्ही?" ह्या साऱ्या प्रकारामुळे त्या खूपच भेदरून गेल्या होत्या.त्यात आजीने चोरीचा आळ घातलेला पाहून त्या कोलमडूनच पडल्या. त्यांनी परोपरीने आजीला विनवले पण आमच्या आजीला काही पटले नाही. अचानक घडलेल्या ह्या घटनेने घरात सगळेजण दु:खी झाले. माझी मनोमन खाञी होतीच, शालूताईं असे काहीही करणे शक्यच नाही. दुसऱ्याच दिवशी आई आणि काकू ह्यांचे बोलणे कानावर पडले, शालूताईंनी खडीसाखरेचे सोळा सोमवार धरल्याचे. मला काहीच उमगले नाही म्हणून आईला विचारले तर प्रथम एक धपाटा मिळाला, "कारटे, मोट्या माणसांची बोलणी ऐकायला हवीत." त्याकडे दूर्लक्ष करून मी पुन्हा विचारल्यावर कळाले की ती हरवलेली वाटी मिळून आपल्यावरील आळ जावा म्हणून शालूताई सोमवारी दिवसभर उपवास करणार होत्या आणि राञी फक्त एक खडिसाखरेचा दाणा आणि एक भांडे पाणी पिणार होत्या. हे एकल्यावर मला तिथे राहावेसेच वाटेना. गरीबाच्या अपमानाची देवाघरी मांडलेली फिर्यादच होती ती.
पाहता पाहता सुट्ट्या संपत आल्या. शाळांचे वेध आम्हा मुलांना लागले. निघताना मी शालूताईंच्याही पाया पडले, तशी डोळे पुशीत मला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, " दिवाळीला येशिल ना?" आम्ही निघालो, पुन्हा चक्र सुरू झाले, नविन मैञिणी, परीक्षा ह्या साऱ्यात शालूताई मागे पडल्या. एकेदिवशी शाळेतून घरी आले तर आई रडत होती. मी घाबरून गेले, आता काय झाले? आईने शालूताईंचे पञ वाचायला दिले. त्यांनी लिहीले होते, नैवेद्याची वाटी त्यांचे सोमवार पुरे झाल्यावर चार-पाच दिवसातच सापडली. आमचा देव्हारा मोठा होता, देवाचे टाक ठेवण्याकरिता ऊतरत्या पायऱ्या होत्या. त्याखाली गेली होती. पुढे असेही लिहिले होते, तुम्ही मायलेकींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे. आमच्या आजीने त्यांच्यावर आळ घातल्याबद्दल त्यांची माफीही मागितली होती. त्यावर एवढे होऊनही तुम्ही मला कामावरून काढून न टाकल्यामुळे माज्या पोराबाळांचे हाल झाले नाहीत, ह्याचेच उपकार मी विसरू शकत नाही असे म्हणून त्यांनी आजीचे आभारच मानले होते.
चला शेवट गोड तर सारेच गोड. माञ माझ्या जीवाला त्यांचे ते सोळा सोमवार जिव्हारी लागलेत. शालूताईंचा विदिर्ण चेहरा डोळ्यासमोर येतो आणि परिस्थितीचे चटके जीवनात काय काय दाखवतात ह्याची जाणीव होते.
भानस.