मी आणि अपघात.

माझे बाबा एका नावाजलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आर्किटेक्ट होते. नोकरी फिरतीची. प्रत्येकवेळी आम्हाला घेऊन जाणे शक्य होत नसे. अशावेळी आई, मी व धाकटा भाऊ मुंबईतच राहात असू. बदलीचा कालावधी साधारणपणे दोन वर्षाचा असे. १९७२-७८ च्या सुमारास हाती लिहिलेले पत्र आणि आणिबाणी निर्माण झाल्यास तार ह्यावरच सारी भिस्त होती. आजच्या इतकी संदेशवहनाची प्रभावी साधने उपलब्ध नव्हती.घराघरात टेलिफोन्स खणखणत नव्हते. बाबांची बदली झाली की आमचे घर उदास होउन जाई.

अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा ती दुष्ट बातमी बाबांनी एकविली. ह्या वेळी बदली गोव्याला झाली होती आणि चक्क कंपनीतर्फे सदनिकाही मिळणार होत्या. दोन वर्षे तरी राहावेच लागेल हे स्पष्ट झाले होते. जानेवारी मध्ये बाबा गोव्याला गेले. एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा झाली की तुम्हालाही घेऊन जाईन, ह्या बाबांच्या शब्दांनी झालेला आनंद आम्हां तिघांना त्यांच्याशिवाय काढावे लागणाऱ्या दिवसांसाठीचा जीवनरस देऊन गेला. चार महिने भर्रकन् गेले. परीक्षा आटोपल्या. तिथे शाळेत नांव नोंदण्यासाठी दाखला घेणे, पुन्हा परत आल्यावर आमच्याच शाळेत प्रवेश मिळेल ह्याचे प्रॉमिस, रेशनकार्ड, गॅस, इत्यादी भानगडी निस्तरता निस्तरता आईला दिवस कमी पडू लागले. माझा भाऊ दुसरीत आणि मी चौथीत गेले होते. गोव्याला चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा. म्हणजे काय हे मला त्यावेळी कळाले नाही. पण स्कॉलरशिपला मी बसणार होतेच, बोर्डाच्या परिक्षेमुळेही मला स्कॉलरशिप मिळणार होती. इथल्या मैत्रिणिंना सोडून जायचे हेच एकमेव दु:ख होते. एप्रिलच्या मध्यात आम्ही बोटीने गोव्याला गेलो.त्यावेळी पूर्ण चोवीस तास लागत असत. बोटीने प्रवास करण्याची पहिलीच वेळ असल्याने खूपच मजा वाटली. बाबा आम्हांला घ्यायला आले होतेच. जमिनीला पाय टेकलेले आहेत हे शरीराने मान्य करायला चांगलाच वेळ घेतला. आमच्या छोट्याश्या ब्लॉकमध्ये येऊन पोहोचलो आणि आम्ही सगळे नविन ठिकाणी एकत्र राहणार ह्याची मला खात्री पटली.

हळूहळू नवीन परिसर, भोवतालची माणसे, शाळा ह्यात आम्ही रुळलो. शाळा चांगली होती. मैत्रिणिही लागलीच झाल्या. दिवस कसे आनंदाने चालले होते. आमच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक सरळ जाणारा आणि दुसरा शॉर्टकट्. श्री. अनंत फंदी यांचे," धोपट मार्गा सोडू नको......" कडे कानाडोळा करुन सगळी मुले त्याच रस्त्याने येत जात. आम्हीही त्याला अपवाद नव्हतोच. शॉर्टकट गॅरेजमधून जात असे. तिथे नेहमीच छोटे छोटे राखेचे ढिग असत.मुले त्या ढिगांना पायाने ठोकरीत. सगळीकडे मऊ राखेचा धुरळा उडत असे. दररोज मलाही मोह होत असे. शेवटी एके दिवशी घरी परत येताना एका छोट्या ढिगात मी उजवा पाय घातला मात्र.... दुसऱ्याच क्षणी चारीबाजूने अंगार उसळले. त्या जाणिवेतून बाहेर येउन पाय बाहेर काढेतो उशिर झाला होता. ज्या ढिगात मी पाय घातला होता ती राख धगधगत होती. वरुन दिसत नसले तरी आत गरम निखारे होते. त्यांनी त्यांचे काम चोख बजावले होते. माझा तळवा आणि घोट्यापर्यंतचा पाय जबरदस्त भाजला होता. टरटरुन फोड आले होते. पंधरा दिवस शाळेत जाता आले नाही. ते सगळे दिवस मी सारखी आईला विचारी, "आई, सगळेच जण दररोज जे करत होते तेच मी केले ग. मग मलाच का असे.....?" ह्याचे उत्तर आईकडे तरी कुठे होते.

आमच्या शाळेची सहल निघाली. मीही आनंदाने निघाले. बसेस पोहोचल्या. चटकमटक खाणे खाऊन सगळ्यांनि  आजुबाजूला काय काय करता येईल ह्याचा शोध घेतला. जवळच एक तळे होते. लहानसेच होते. गुलाबी,लाल व पांढरा ह्याचे मिश्रण होउन अतिशय आकर्षक कमळें फुललेली होती. मला पोहता येत नव्हते. त्यामुळे मला नेहमीच पाण्याची भीति वाटे. सगळेजण भराभर तळ्याकडे धावलें. थोड्याचवेळात प्रत्येकाने चार-पाच तरी कमळे खुडली होती. सगळे एकमेकाला दाखवत होते. मला एक तरी कमळ हवेच होते. शेवटी पुन्हा एकदा मोहोने मला भरीस पाडले. कमळांच्या खाली जाळे असते हे केव्हांतरी एकलेले आठवत होते. सांभाळून काठाकाठाने अगदी जवळच असणारे कमळ तोडायला मी झुकले मात्र...... पुढच्याच क्षणी जाणवले ते नाकातोंडात शिरणारे पाणी आणि शेवाळें. इतक्या मुलांमधून फक्त मीच पाण्यात पडले होते. पुढे बरेच दिवस मुले-मुली माझ्याकडे पहात एकमेकांना विचारीत," कमळे तळ्यात वर असतात का आत?" पुन्हा मी आईला विचारले," आई, मीच का ग त्या कमळांच्या जाळ्यात पडले?" ह्याचेही उत्तर आईकडे नव्हते.

नऊमाई परीक्षा जवळ आली होती. शाळेतून आम्ही पाच-सहा जण दररोज एकत्र घरी येत असू. त्या दिवशीही असेच आम्ही परत येत होतो. गोव्याचे रेतीचे डंपर हे एक मोठ्ठे प्रकरण होते. सगळा रस्ता फक्त आपल्यासाठीच आहे हीच त्यांची धारणा होती. आम्ही मुले रस्त्याच्या मधून चालत होतो. लाल रंगाचा डंपर जोरात येताना दिसताच पोरे दोहोबाजूला पांगली. म्हणजे मी एकटीच एका बाजूला आणि सगळे दुसऱ्या बाजूला. डंपर जवळ आला आणि अचानक मला भूत दिसावे तशी एक मोटरसायकल येताना दिसली. त्यालाही मी अचानक दिसल्यामुळे तोही गांगरुन गेला होता.डंपर माझ्याजवळून जातानाच मीही त्याच्या टपराच्या समांतर दिशेने उडत असल्याचे जाणवले. त्याही स्थितीत मला उडता येऊ लागल्याचा आनंद झाला. आणि दुसऱ्याच क्षणी रस्त्याने मला झेलले होते. मोटरसायकलवाला अतिशय घाबरला होता. माझ्याजवळ येऊन तो काहीतरी विचारीत असतानाच माझी शुद्ध हरपली. जाग आली तर मी आमच्या घरात होते. खूप मुका मार बसला होता. बरेच खरचटले होते. मोटरसायकलवाला डॉक्टरांना घेऊन आला. थोड्यावेळाने सगळे पांगले. पुन्हा मला तोच प्रश्न पडला. अर्थात उत्तर मिळाले नाही.

मडगावहून आम्ही फोंड्याला जायला निघालो. बसमध्ये छान खिडकीची जागा मिळाली. फोंड्याला पोहोचलो. खूप सारी माणसे उतरली. आई,बाबा व भाउही उतरले. मी उतरु लागले आणि कुठूनतरी सायकलला दूधाने भरलेले कॅन लावलेला एक भय्या जवळ येताना दिसला. त्याच्याकडे पाहता पाहता माझी नजर रस्त्यावरून हटली आणि पुढच्याच क्षणी माझा पाय रस्तादुरुस्तीवाल्यांनी घातलेल्या डांबराच्या उंचसखल नक्षीत मुरगळलला आणि मी कोसळले, माझ्यावर दूधाचे दोन्ही कॅन आणि सायकलही कोसळले. मला व रस्त्याला दूधाचा अभिषेक झाला. ह्यावेळी माझ्या नशिबाने मला दगा दिला. माझा पाय घोट्यात मोडला. तिन महिने प्लास्टर ठेवावे लागले. मात्र ह्यावेळी मला एकही प्रश्न पडला नाही. कारण अशावेळी त्या जागी फक्त मीच असू शकते ह्याची खात्री मला पटली होती.

मध्ये बराच काळ गेला. छोटेमोठे अपघात घडत होते. गृहित धरल्यासारखे मी ते कानामागे टाकत होते. २००० पासून आम्ही शिकागोजवळच्या गावी राहात आहोत. ३ ऑक्टोबर,२००५ उजाडला. मी दररोजसारखी जेवायला घरी आले. जेवून परत ऑफिसला निघाले. आमच्या घरापासून माझे ऑफिस हा सारा तिन मिनीटांचा प्रवास.दुपारचे टळटळीत एकचे उन. गडद निळ्या रंगाची माझी गाडी. डाव्या हाताला वळण्यासाठी मी थांबलेली. आणि एक मोठ्ठा आवाज आला. माझ्या बाजूने जाणाऱ्या गाडीला कोणीतरी ठोकलेले दिसतेय असे वाटून मी वळून पाहिले मात्र.....  माझ्याच गाडीला एका सेवन सीटर वॅनने ठोकले होते. गाडीचा बेल्ट माझ्या गळ्यात रुतून रक्ताची धार लागली होती.ब्रेकवरचा पाय जोरात बसलेल्या धक्क्याने गुडघ्यात मुडपला होता. पण ह्यावेळी माझ्या नशिबाने माझी साथ सोडली नव्हती. ४५ माईल्स च्या स्पीडने ठोकूनही माझी स्टेशनरी गाडी समोरुन अंगावर येणाऱ्या अप् कमिंग ट्राफिकच्या मध्ये ढकलली गेली नाही आणि मी वाचले. वॅन मधून एक बाई उतरली. माझ्याजवळ येऊन क्षमा मागून मला कितपत लागले आहे ह्याची चौकशी करुन ती म्हणाली, " अग, मला तुझी गाडी दिसलीच नाही." गडद निळ्या रंगाची गाडी दुपारच्या एकच्या उन्हात तिला दिसली नाही हयात तिचा काहीच दोष नाही, हे मला उमगले होते. मी मंदपणे हसून तिला म्हटंले, " असे होते कधी कधी, तू वाईट वाटून घेऊ नकोस."

भानस.