कामथे काका (भाग चौथा)

काका बिल्डिंगच्या बाहेर पडले. बाहेर आल्या आल्या त्यांना बराच बदल झालेला जाणवला. जी दुकानं आणि वर्कशॉप्स पूर्वी पाहिली होती ती आता दिसत नव्हती. ज्याअर्थी सुलेमान टेलर्स आणि रघुमल किराणा वाला नवीन बिल्डिंगमध्ये आले होते त्याअर्थी एकतर ओळखीची दुकानं आता दुसरीकडे सोडून गेली असावीत असं त्यांना वाटलं. परंतु रघुमल आणि सुलेमान समोरच्या चाळीत असूनही त्यांच्या बिल्डिंगमध्ये होते. या व्यापाऱ्यांचं बरं असतं, पैसा गब्बर असल्याने ते पटकन कोठेही जाऊ शकतात. तसं, ही दोन्ही दुकानं समोरच्या चाळीत होती. जास्त विचार करण्यात अर्थ नसल्याने ते भराभर गल्लीच्या रुंद तोंडाजवळ आले. मेन रोडला येऊन त्यांनी शिवडीला जाणारी बस पकडली. बसमध्येही विशेष गर्दी नव्हती. ते पुढे जाऊन खिडकीजवळ बसले. पुन्हा ते विचारात गढले. त्यांच्या मनात आलं, या कामासाठी त्यांनी जायलाच हवं का? रमेश म्हणाला आणि आपण एकदम कसं मान्य केलं? आपल्याला स्वतःची काही आवड निवड आहे की नाही? आपण एवढे टाकाऊ नक्कीच नाही. मग त्यांना स्वतःचाच राग आला. पोटात भूक उसळत होती. त्यांना जरा ढवळल्यासारखं झालं. रात्रीच्या जेवणानंतर सकाळचे अकरा वाजेपर्यंत पोटात काहीच नाही. रोहिणी असती तर तिनी आपल्याला जाऊच दिलं नसतं. पण आपण त्यावेळी तरी कुठे केलेला नाश्ता भरपेट खाऊन जात होतो. मग आत्त्ताच एवढं वाईट कशाला वाटायला पाह्यजे? वेळेचा नसला तरी भावनांचा फरक होता. आपण नीताला का सांगितलं नाही, की काहीतरी खायला कर, म्हणून. आपण तिला घाबरतो हेच खरं. खरं म्हणजे आपलं माणूस असलं म्हणजे उपाशी पोटी गेलं तरी फरक पडत नाही. कारण आपण केव्हाही त्याला काहीही करायला सांगू शकतो. आणि त्या हक्काच्या कल्पनेत आपल्याला तहान भुकेची जाणीव होत नसावी. इथे मुळी कोणतंच नातं नसल्यासारखं ही दोघं आपल्याशी वागतात. सुटून आल्यावर जे मन मोकळं व्हायला हवं होतं ते करायला माणूसच घरी नव्हतं, त्याला काय करणार. आणि आपण लाचार आहोत ही भावना आपणच आपल्या तोंडावर दाखवतो, म्हणूनही असेल. त्यांना या विचारांच्या रेंगाळण्याचा अतिशय कंटाळा आला. पण इच्छा नसतानाही ते विचार येतच राह्यले. मग त्यांनी खिडकीबाहेर पाह्यलं. आता कुठे त्यांनी खरोखरीच खिडकी बाहेर पाह्यलं. हळूहळू गर्दी वाढू लागली. त्यांच्या शेजारी एक तरुणी येऊन बसली. काळसर रंगाची असली तरी ती बऱ्यापैकी रेखीव होती. तिने बसल्याबसल्या पर्स मधून पावडर केक काढला व पर्समधल्या आरशात बघत तोंडावरची पावडर सारखी केली. तिच्या पावडरीचा वास काकांच्या नाकात नकळत शिरला. धावत धावत बस पकडल्याने तिच्या उरोजांची होणारी हालचाल ते चोरून निरखू लागले. एवढ्यात कंडक्टर शिवडी स्टेशनच्या नावाने ओरडताना दिसला. ते गडबडीने उठले, धडपडत उतरले. मनातली बडबड आता थांबली होती. त्यांची आता भूक चांगलीच पेटली. ते समोरच्याच इराण्याच्या हॉटेल मध्ये शिरले. त्यांनी एक बनमस्का आणि पानी कम चाय अशी ऑर्डर दिली. इराण्याचा पोरगा हातातल्या कळकट फडक्याने टेबलं पुशी त होता. ऑर्डर आल्यावर त्यांनी अधाश्यासारखं खाल्लं. बरेच दिवसांनी त्यांना बरं वाटलं. गरमागरम चहाने त्यांना तरतरी आली. रात्रीच्या न झालेल्या झोपेची लकेर निघून गेली. पैसे देऊन ते बाहेर पडले. रस्याला नेहमीसारखीच गर्दी होती. पावसाळा असला तरी मुंबईत ऊन असं पडतं की उन्हाळाच आहे की काय, असं वाटावं..........

त्यांनी एका किराणा दुकानदाराला विचारलं, " शमीम बिल्डिंग कुठे आहे? " काकानं घाम पुसत त्याच्या कडे पाह्यलं. सकाळपासून गिऱ्हाईकाची वाट पाहत बसलेल्या त्याने, अनिच्छेनेच समोरच्या एका जुनाट बिल्डिंगकडे बोट दाखवीत म्हटले, " अरे, वो क्या सामने है ना, रास्तेके उस पार..... " काका रस्ता ओलांडून तिकडे गेले. त्या बिल्डिंगचा एंट्रंन्स ते पाहू लागले. ती एक चार मजली चाळवजा इमारत होती. तळमजल्यावर असलेल्या एक दोन मुस्लिम हॉटेलांमधून भसाड्या आवाजातली गाणी ऐकू येत होती. हॉटेलांच्या एकूण रूपाकडे पाहून कोणालाही मळमळ सुटली असती. त्यांनी आलेली किळस बाजूला सारीत विचारलं, " ये नरेश गडा वकील का ऑफिस किधर है? " काकांनी कार्ड नीट पाह्यलं असतं तर ऑफिस तिसऱ्या मजल्यावर आहे, हे कळलं असतं. पण नुसती नजर फिरवली तरी आपल्या लक्षात कोणत्याही लिखाणाचे बरेचसे तपशील येतात, असा त्यांचा दावा असायचा. तो काही प्रमाणात खराही होता. आणि असली गूढ क्षमता शंभर टक्के कोणालाही नसते हे त्यांनाही माहीत होतं. तरीही ते असला धोका कामावरही पत्करीत. आताही त्यांनी फक्त बिल्डिंगचं नाव वाचलं होतं. चुलीवर भाजायला टाकलेले कबाब उलटे करीत कळकट मुसलमान थोबाडातल्या थोबाडात म्हणाला, " तीसरा माला. " त्याला काकांसारख्या साधारण माणसांची चीड असावी. काकांच्या तोंडावरचा भाव त्याला आवडला नसावा.....

मग काका दोन दगडी पायऱ्या चढून कचरा आणि जुनाट पुराण्या सामानाने भरलेल्या प्रवेशदारातून आत शिरले. लाकडी जिना मात्र ताठ उभा होता. एखाद्या हट्टी म्हाताऱ्या सारखा. जिन्याखाली काही बिनकामाचे लोक झोपलेले होते. काही चहा पीत होते. बिल्डिंगला लिफ्ट होती. जुन्या जमान्यातली. पण न चालणारी. म्हणून तिच्यात कोणीतरी स्वतःचे घर सजवले होते. काका जिन्यावरून भराभर चढत तिसऱ्या मजल्यापाशी पोचले. त्यांना चांगलाच दम लागला होता. मग मात्र त्यांनी खिशातलं कार्ड पाह्यलं. रूम नं. ३४ होता. बारा वाजत असल्याने बाहेरच्या लांबलचक कॉमन गॅलरीमध्ये फार गर्दी नव्हती. काही बायका मुलं नुसतीच इकडून तिकडे करीत होत्या. चौतीस नंबरची रूम शोधणं कठीण जात होतं. कोणत्याच दारावर खोली नं नव्हते. बायका मुलं त्यांच्या कडे संशयाने पाहत होती. नंतर त्यांनी कोणालाही न विचारता एका, अर्धवट नेमप्लेट असलेल्या दारावरच्या बेलवर हात ठेवला. दारावर ".. रेश... डा... वकील " असं लिहिलेलं दिसत होतं. का कोण जाणे पण काकांना ह्या कामासाठी आपण जाऊ नये असं वाटून ते मागे वळले. बेलवरचा हात त्यांनी काढला. ह्या कामासाठी गेलो तर आपलं स्वातंत्र्य नाहीसं होईल, असं त्यांना प्रकर्षानं वाटलं. ते चालत जिन्याकडे पोचले. मग त्यांच्या मनात आलं, आपण जर असं करायला लागलो, तर आपल्याला काम तरी कोण देणार आहे? आणि ते मनाशी म्हणाले, " चला, कामथे काका, मुकाट्यानं बेल वाजवा. " ते पुन्हा मागे आले. घाई घाईने त्यांनी बेल वाजवली. उगाच विचार बदलायला नको...... झालं काकांच्या आयुष्याचा नवा आणि वेगळा अध्याय चालू झाला. गॅलरीत उभ्या असलेल्या गुजराथी बाईला त्यांचा हा ग्यानबा तुकाराम (म्हणजे जिन्याकडून मागे फिरणं) झेपला नाही. तिने विचारण्यासाठी आणलेले शब्द गिळले असावेत. कारण तेवढ्यात दरवाजा उघडला गेला. आत एक काकांपेक्षा म्हातारा माणूस प्रश्नार्थक मुद्रा करून त्यांच्याकडे पाहू लागला......

(क्र म शः)