दुसरा अध्याय

[३]


संजय म्हणाला


असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित ।
करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥


श्री भगवान् म्हणाले


कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज ।
असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥


निर्वीर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी  तुज ।
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा ॥ ३ ॥


अर्जुन म्हणाला


कसा रणांगणी झुंजू भीष्म-द्रोणांविरुद्ध मी ।
ह्यांस बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की ॥ ४ ॥


न मारिता थोर गुरूंस येथे ।
भिक्षा हि मागूनि भले जगावे ॥
हितेच्छु हे ह्यांस वधून भोग ।
भोगू कसे भंगुर रक्त-मिश्र ॥ ५ ॥


ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की ।
कशात कल्याण असे न जाणो ॥
मारूनि ज्यांते जगणे न इच्छू ।
झुंजावया ते चि उभे समोर ॥ ६ ॥


दैन्याने ती मारिली वृत्ति माझी ।
धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे ॥
कैसे माझे श्रेय होईल सांगा ।
पायांपाशी पातलो शिष्य-भावे ॥ ७ ॥


मिळेल निष्कंटक राज्य येथे ।
लाभेल इंद्रासन देव-लोकी ॥
शमेल त्याने न तथापि शोक ।
जो इंद्रियांते सुकवीत माझ्या ॥ ८ ॥


संजय म्हणाला


असे अर्जुन तो वीर हृषीकेशास बोलुनी ।
शेवटी मी न झुंजे चि ह्या शब्दे स्तब्ध राहिला ॥ ९ ॥


मग त्यास हृषीकेश जणू हसत बोलिला ।
करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा ॥ १०॥


[४]


श्री भगवान् म्हणाले


करिसी भलता शोक वरी ज्ञान हि सांगसी ।
मेल्या-जित्यावीषी शोक ज्ञानवंत न जाणती ॥ ११ ॥


मी तू आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी ।
तसे चि सगळे आम्ही न पुढे हि नसू कधी ॥ १२ ॥


ह्या देही बाल्य तारूण्य जरा वा लाभते जशी ।
तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ॥ १३ ॥


शीतोष्ण विषय-स्पर्श सुख-दुःखात घालिती ।
करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ॥ १४ ॥


ह्यांची मात्रा न चाले चि ज्या धीर पुरूषा वरी ।
सम देखे सुखे दुःखे मोक्ष-लाभास योग्य तो ॥ १५ ॥


नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि ।
निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी ॥ १६ ॥


ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू ।
नाश त्या नित्य-तत्त्वाचा कोणी हि न करू शके ॥ १७ ॥


विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत ।
नित्य निःस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ॥ १८ ॥


जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे ।
दोघे न जाणती काही न मारी न मरे चि हा ॥ १९ ॥


न जन्म पावे न कदापि मृत्यु ।
होऊनी मागे न पुढे न होय ॥
आला न गेला स्थिर हा पुराण ।
मारोत देहास परी मरे ना ॥ २० ॥


निर्विकार चि हा नित्य जन्म-मृत्यूहुनी पर ।
जाणे हे तत्त्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ॥ २१ ॥


सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे ।
मनुष्य घेतो दुसरी नवीन ॥
तशी चि टाकूनि जुनी शरीरे ।
आत्मा हि घेतो दुसरी निराळी ॥ २२ ॥


शस्त्रे न चिरिती ह्यास ह्यास अग्नि न जाळितो ॥
पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी ॥ २३ ॥


चिरवे जाळवे ना हा भिजवे वाळवे हि ना ॥
स्थिर निश्चळ हा नित्य सर्व-व्यापी सनातन ॥ २४ ॥


न देखू ये न चिंतू ये बोलिला निर्विकार हा ॥
जाणूनि ह्यापरी आत्मा शोक योग्य नसे तुज ॥ २५ ॥


अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रति-क्षणी ॥
तरी तुज कुठे येथे नसे शोकास कारण ॥ २६ ॥


जन्मता निश्चये मृत्यु मरता जन्म निश्चये ॥
म्हणूनि न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको ॥ २७ ॥


भूतांचे मूळ अव्यक्ती मध्य तो व्यक्त भासतो ॥
पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामधे शोक कायसा ॥ २८ ॥


आश्चर्य जो साच चि ह्यास देखे ।
आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ॥
आश्चर्य जो  वर्णन ते हि ऐके ।
ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ॥ २९ ॥


वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा ।
म्हणूनि भूत-मात्री तू नको शोक करू कधी ॥ ३० ॥


[५]


स्वधर्म तो हि पाहूनि न योग्य डगणे तुज ।
धर्म-युद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले ॥ ३१ ॥


प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे ।
क्षत्रियास महा-भाग्ये लाभते युद्ध हे असे ॥ ३२ ॥


हे धर्म-युद्ध टाळूनि पापात पडशील तू ।
स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनिया स्वये ॥ ३३ ॥


अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगती तुझी ।
मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी ॥ ३४ ॥


भिऊनि टाळिले युद्ध मानितील महा-रथी ।
असूनि मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की ॥ ३५ ॥


बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु ।
निंदितील तुझे शौर्य काय त्याहूनि दुःखद ॥ ३६ ॥


मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही-तळ ।
म्हणूनि अर्जुना उठ युद्धास दृढ-निश्चये ॥ ३७ ॥


हानि लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम ।
मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज ॥ ३८ ॥


[६]


सांख्य-बुद्धि अशी जाण ऐक ती योग-बुद्धि तू ।
तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी ॥ ३९ ॥


न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत हि ।
जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ॥ ४० ॥


ह्यात निश्चय लाभूनि बुद्धि एकाग्र राहते ।
निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपती चि ना ॥ ४१ ॥


अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया ।
वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥ ४२ ॥


जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग-वैभव ।
भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्ग-कामुक ॥ ४३ ॥


त्यामुळे भुलली बुद्धि गुंतली भोग-वैभवी ।
ती निश्चय न लाभूनि समाधीत नव्हे स्थिर ॥ ४४ ॥


तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू ।
सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध ॥ ४५ ॥


सर्वत्र भरले पाणी तेंव्हा आडात अर्थ जो ।
विज्ञानी ब्रम्ह-वेत्त्यास सर्व वेदात अर्थ तो ॥ ४६ ॥


कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी ।
नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ॥ ४७ ॥


फळ लाभो न लाभो तू निःसंग सम होऊनी ।
योग-युक्त करी कर्मे योग-सार समत्व चि ॥ ४८ ॥


समत्व-बुद्धि ही थोर कर्म तिहूनि हीन चि ।
बुद्धीचा आसरा घे तू मागती फळा दीन ते ॥ ४९ ॥


येथे समत्व-बुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत ।
समत्व जोड ह्यासाठी ते चि कर्मात कौशल ॥ ५० ॥


ज्ञानी समत्व-बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी ।
जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥ ५१ ॥


लंघूनि बुद्धि जाईल जेंव्हा हा मोह-कर्दम ।
आले येईल जे कानी तेंव्हा जिरविशील तू ॥ ५२ ॥


श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय ।
स्थिरावेल समाधीत तेंव्हा भेटेल योग तो ॥ ५३ ॥


[७]


अर्जुन म्हणाला


स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे ।
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ॥ ५४ ॥


श्री भगवान् म्हणाले


कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये ।
आत्म्यात चि असे तुष्ट तो स्थित-प्रज्ञ बोलिला ॥ ५५ ॥


नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे ।
नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित-प्रज्ञ संयमी ॥ ५६ ॥


सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता ।
न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ५७ ॥


घेई ओढूनि संपूर्ण विषयातूनि इंद्रिये ।
जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली ॥ ५८ ॥


निराहार-बळे बाह्य सोडी विषय साधक ।
आंतील न सुटे गोडी ती जळे आत्म-दर्शने ॥ ५९ ॥


करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनास ही ।
नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगी चि की ॥ ६० ॥


त्यास रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।
इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६१ ॥


विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला ।
संगांतूनि फुटे काम क्रोध कामात ठेविला ॥ ६२ ॥


क्रोधातूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली ।
स्मृति लोपे बुद्धि-नाश म्हणजे आत्म-नाश चि ॥ ६३ ॥


राग-द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये ।
स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ॥ ६४ ॥


प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया ।
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥ ६५ ॥


अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे ।
म्हणूनि नमिळे शांति शांतीविण कसे सुख ॥ ६६ ॥


इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे ।
त्याने प्रज्ञा जशी नौका वार्‍याने खेचली जळी ॥ ६७ ॥


म्हणूनि इंद्रिये ज्याने विषयातूनि सर्वथा ।
ओढूनि घेतली आंत त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६८ ॥


सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे ।
सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ॥ ६९ ॥


न भंग पावे भरता हि नित्य ।
समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥
जाती तसे ज्यात जिरूनि भोग ।
तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ ७० ॥


सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह ।
अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥ ७१ ॥


अर्जुना स्थिति ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा ।
टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ ७२ ॥


दुसरा अध्याय संपूर्ण