ते राक्षसाचे पिलू दिसायला खूपच गोंडस होते.
सावळा वर्ण, बघताक्षणी गालगुच्चा घ्यावासा वाटणारे गोबरे गाल, डोक्यावर झुळझुळणारे कुरळे केस, हनुवटीला मध्येच थेंबभर खळगा, तपकिरी डोळे, चेहर्यावर कायम एक प्रश्नात्मक खो़ड्याळपणा.....
पण साध्या डोळ्यांना न दिसणारी अजून एक गोष्ट होती त्याच्याकडे, तिसरा डोळा! त्याच्या कपाळावर मधोमध तो तिसरा डोळा आहे-नाही ची लपाछपी खेळत असे. म्हणजे तो कायम असे असे काही नव्हते. पण चमकणार्या विजेप्रमाणे तो मधूनच उमटून सगळे लख्ख करून जाई.
त्याला पहिल्यांदा त्या तिसर्या डोळ्याचा चटका बसला तेव्हा तो जेमतेम चार वर्षांचा होता. त्याला उचलून हवेत फेकून झेलत बसलेला त्याच्या वडिलांच्या कार्यालयातील भुजंगा शिपाई अचानक त्याच्याकडे लालसेने पाहू लागला. रात्रीच्या व्यसनाची सोय करण्यासाठी "साहेबांच्या या एकुलत्या मुलाला पळवून नेले तर?" असा विचार भुजंगाच्या मनात चमकू लागला.
त्याचा तिसरा डोळा उघडला आणि लागलेली धाप आवरत भुजंगा खाली बसला. डॉ़क्टरांनी दमा, पंडुरोग आणि मधुमेह असे तिप्पट निदान करून भुजंगाच्या स्वास्थ्यावर काळी फुली मारली.
तो मजेत जगत राहिला.
मग एकदा शाळेत परत गडबड झाली. त्याला वक्तृत्वस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते, आणि समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एक नामवंत शिक्षणमहर्षी आले होते. पण त्यांनी मुकाट बक्षीस देऊन मोकळे होण्याऐवजी 'आजच्या पिढीने काय केले पाहिजे, भारतीय संस्कृतीची थोरवी, जगात सुखसमाधान नांदावे' असे चरबट बोलणे सुरू केल्यावर त्याचा तिसरा डोळा उघडला. या शिक्षणमहर्षींनी स्वतःच्या संस्थेत चालवलेली अरेरावी, वेगवेगळी कारणे दाखवून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उकळलेले पैसे, त्यांच्या महिला प्राध्यापिकांसाठी वेगळा नेमलेला 'गर्भपात विशेषज्ञ' डॉक्टर....अचानक शिक्षणमहर्षींची उजवी बाजू लुळी पडली. नंतरचे पूर्ण आयुष्य स्त्री नर्सकडून स्पंजिंग करून घेणे एवढ्याच स्त्री-स्पर्शावर त्यांना निभावावे लागले.
यथावकाश वेगवेगळ्या परीक्षा पार करत तो आयुर्वेदपारंगत बनला. बहुविकलांगता हा 'असाध्य' आजार म्हणजे फार काही नसून वातप्रकृती वाढल्याचेच द्योतक आहे, तो केवळ पथ्ये पाळून आणि निमित्तापुरती औषधे देऊन बरा करता येतो हे त्याने शांतपणे प्रयोग करीत सिद्ध केले. त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यासाठी संगणकापासून आयुर्वेद-योग-संस्कृत इथपर्यंत नाव कमावलेल्या एका 'तज्ञां'ना पाचारण करण्यात आले होते. माफक हसत त्यांनी आभाळाकडे नजर लावली, आणि पार वेदांमध्ये अग्निबाणाचे उल्लेख कसे आहेत इथपासून प्रवचन सुरू केले. त्याचे दोन डोळे मिटू मिटू व्ह्यायला लागले आणि तिसरा डोळा उघडला. विद्यापीठात त्या तज्ञांच्या हाताखाली संशोधन करणार्या एका तरुणीने कशी 'आत्महत्या' केली, तिचे संशोधन कसे अभूतपूर्व होते, ती कागदपत्रे कशी गुपचूप त्या तज्ञांच्या हाती आली, त्यांनी कसे त्याचे पाच तुकडे करून पाचजणांच्या पी एच डी ची सोय केली, त्या पाचजणांनी कसे लाचारीने आपले पुढचे सगळे काम त्या तज्ञांना 'समर्पित' केले..... चित्र फारच स्पष्ट उमटू लागले होते.... हृदयविकाराचा झटका येऊन तज्ञ निश्चेष्ट कोसळले.
हताशपणे मान हलवत तो बाहेर पडला.
वयोमानाप्रमाणे त्याचे लग्न करण्याचे घाटू लागले. त्याच्या आईवडिलांनी रीतीप्रमाणे गोरीपान, चाफेकळी नाक, शेलाटा बांधा अश्या सगळ्या लक्षणांची यादीच केली आणि त्यात बसतीलशा मापाच्या मुली बघत ते मुलूख पालथा घालू लागले. अखेर सगळ्या अटींत बसणारी जुई नावाची एक मुलगी त्यांनी त्याच्या समोर हजर केली. प्रपंचाने डोके भिरभिरून कडेलोट झालेल्या गृहिणीने उतू चाललेल्या दुधाकडे निर्विकार नजरेने पहावे तशा लख्ख निरिच्छेने तो या सगळ्याकडे बघत होता.
लग्नाआधीच्या भेटी-गाठी ही त्याला बुचकळ्यात टाकणारीच गोष्ट ठरली. तो कुठेही वेळेच्या जरासे आधीच पोचत असे म्हणून त्या भेटीगाठी होत तरी. कारण वेळेवर येताना जुई त्याच्याकडे पहायच्या ऐवजी घड्याळाकडेच पाहत पाहत येई. एकदा वाहतुकीत अडकून त्याला दीड मिनिटे उशीर झाला तर ती भुर्रकन उडूनही गेली होती.
लग्नानंतर रिवाजाप्रमाणे ते मधुचंद्राला गेले. पहिल्याच रात्री तिने फणकारून त्याला सुनावले, "आपली काही ओळखदेख नाही अजून, एकदम भसकन अंगावर येऊ नकोस.... मला मोकळे वाटायला वेळ लागेल". 'त्या'ने "हूं" म्हणून पाठ वळवली आणि डोळे मिटले. पण तिसरा डोळा उघडला. तिच्या मनाच्या पडद्यावर उमटलेली अविनाश नावाच्या 'मित्रा'ची प्रतिमा, लग्न झाल्यावरही बायकोला अंधारात ठेवून तिच्यामागे गोंडा घोळत फिरणारा अविनाश, त्याने चोरून तिच्याकडून हिसकावलेले एकांतातील देहभोग....
मधुचंद्राहून परतताच तिला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. वडाराच्या दगड वाहणार्या गाढवाप्रमाणे तो खाली मान घालून तिची सेवा करीत राहिला, आयुर्वेदात त्यावर कायकाय इलाज आहेत याचे संशोधन करीत राहिला.
त्याचा तिसरा डोळा उघडण्याचे प्रमाण वाढतच गेले. आणि एक दिवस त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला. सर्व सर्व भिरकावून देऊन त्याने चालायला सुरुवात केली.
समुद्रकिनार्यावरच्या त्या छोट्याशा गावात तो पोचला तेव्हा आपण किती काळ चालत आहोत याची 'त्या'ची जाणीव विरून गेली होती.
गाव टुमदार होते. किनार्यावर महादेवाचे देऊळ. पण त्यात पिंड नव्हती. मागचा सगळा डोंगर म्हणजेच पिंड अशी सर्वांची श्रद्धा होती. बाहेरच्या वाहत्या कुंडात हातपाय धुऊन तो आतल्या ओवरीत पद्मासन घालून स्वस्थ बसून राहिला.
सकाळी कार्तिकातल्या धुक्याच्या जाड दुलईतून सूर्य कसाबसा बाहेर डोकावला. त्याने परत त्या खळाळणार्या पाण्यात हातपाय धुतले, आणि पाच ओंजळी पाणी पिऊन थेट डोंगरावर चाल केली.
शरीरकष्टांची सवय राहिली नसली तरी त्याची तब्येत प्रमाणात होती. त्यामुळे खडा चढ चढूनही त्याला तशी धाप लागली नाही.
वर करवंदांच्या जाळ्या आणि काजूची झाडे यांचे रान माजले होते. अनोळखी गावात अट्टल मद्यप्याने संध्याकाळी अधीर मनाने गुत्ता शोधत हिंडावे तसा तो त्या रानात भिरीरी फिरत राहिला.
एका काजूच्या झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून बसलेला तो म्हातारा त्याला दिसला आणि तिरिमिरीने तो थेट त्या म्हातार्यासमोर जाऊन उभा ठाकला. म्हातार्याला झकास टक्कल होते आणि दाढीमिशी बोडलेला त्याचा रापका चेहरा नारिंगी बटाट्यासारखा दिसत होता.
"हे असं सगळं का? हा तिसरा डोळा मलाच का? तो असा मधूनच का उफाळून येतो? तो माझा अवयव असेल, तर माझे त्यावर नियंत्रण का नाही? आणि तो माझा अवयव नसेल तर तो माझ्या देहावर का डाग बनून उमटला आहे?
"त्या तिसर्या डोळ्याला फक्त काही जणांचेच काळे भाग कसे दिसतात? जगातली उरलेली माणसे काय दुधात न्हात असतात का रात्रंदिवस? आणि ज्या लोकांचे काळे भाग दिसतात, त्यांना असली अघोरी शिक्षा द्यायची विकृती कोणाची?
"मानवजन्म जर मिळाला आहे तर त्या जन्मातील बरीवाईट सगळी वळणे, भावनिक गुंतवणुकी आणि त्यात खाल्लेल्या ठोकरा, आपल्याला 'बक्षीस' मिळाल्याचा लहान मुलाचा निरागस आनंद, लग्न नामक गाठीने सुरू झालेला एक धूसर रानातला अंगावर शिरशिरी आणणारा प्रवास, 'आपल्या' माणसासाठी खस्ता खाण्याचा आनंद, सगळे सगळे का नाही माझ्या वाट्याला? फक्त हा देह माणसाचा आणि करणी राक्षसाची असे का?
"आणि तुम्ही देव म्हणजे आमचे शत्रू ना? मग मला इथपर्यंत पोचूच कसे दिले तुम्ही? आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असतील तर दीनवाणेपणे तुमची करुणा भाकत बसायचे सोडून मी राक्षस कसा?
"आता या प्रश्नांची उत्तरे तरी देणार आहात का तुम्ही 'देव'? की 'श्रद्धा', 'संयम', 'तप', 'साधना', 'मोक्ष' असले वाभरट बडबडून माणसांना भुलवता तसे मला करणार?"
म्हातार्याने सूर्यकिरणांपासून बुब्बुळे वाचवण्यासाठी डोळे किलकिले करून 'त्या'च्याकडे पाहिले.
"तू राक्षस आणि मी देव हे खरे" म्हातार्याचा आवाज वयोमानाप्रमाणे खरखरीत झाला होता. त्यात त्याला कफाची भावना वाढलेली जाणवली.
"पण म्हणून तू एवढे सगळे प्रश्न मला विचारावे असे कुठे ठरलेय? तुला प्रश्न आहेत, आणि मी काय फक्त उत्तरे घेऊन बसलोय साठेबाज व्यापार्यासारखा? माझेही प्रश्न आहेत. फक्त ते तुला विचारू नयेत एवढे मला कळते.
"देव आणि दानव ही रथाची दोन चाके. पण रथ कुठे जाणार हे ना तुमच्या हातात ना आमच्या. तुम्ही काहीतरी भयाकारी करावे म्हणजे लोक घाबरून श्रद्धेच्या मार्गाला वळतील यासाठी तुमची योजना. आणि ते श्रद्धेच्या मार्गाला वळले की त्यांना पुढे रेटत नेण्यासाठी आमची योजना. आम्ही नसू तर तुमच्या अस्तित्त्वाला अर्थ राहणार नाही. भीती वाटते केव्हा? तर त्यापासून सुटका होईल याची खात्री असली तर. भयापासून सुटका नाही हे कळले तर भ्यायचे कशाला? आणि तुम्ही नसाल तर आमच्याही अस्तित्त्वाला अर्थ राहणार नाही. भयच नसले तर सुटका कशापासून?
"मला हे एवढे आणि एवढेच माहीत आहे. त्याचा उपयोग होईल की नाही ते ठरवण्याइतका तू विचारी आहेस असे वाटते. थोडक्यात, अजून प्रश्न विचारू नकोस, किमान आम्हांला तरी."
म्हातार्याने परत डोळे मिटले आणि झाडाला पाठ टेकून तो घोरू लागला.
तो हताश मनाने डोंगर उतरू लागला.
खाली गावात दीपमाळेजवळच्या मैदानात मांडव घातला होता. टेंबलाईच्या उत्सवातली महापूजा नुकतीच उरकली होती आणि प्रसाद वाटणे चालू होते. ह्या उत्सवाची बातमी पंचक्रोशीत पसरली होती. आणि भाविकांपासून भिकार्यांपर्यंत सगळ्यांची तिथे झुंबड उडाली होती.
त्याला अचानक भूक उफाळून आल्याचे जाणवले. असे आतापर्यंत कधीच झाले नव्हते. रोजचे जेवणे ही रोजच्या दाढी-आंघोळीइतकीच निरुपयोगी आणि नियमित करायची गोष्ट असते अशीच त्याची आत्तापर्यंत समजूत होती. पण आज काही वेगळेच झाले होते.
तो त्या मैदानावर झुंडीत घुसायला गेला, पण चार दांडग्या मुलांनी "हो़ हैया हो" करीत त्याची ढकलगाडी करून त्याला हुसकावून लावले. पडता पडता सावरून तो बाजूला झाला.
एक साताड वर्षांचा मुलगा पळत त्याच्याकडे आला. काळाभोर रंग, त्याच रंगाचे डोळे, अंगात चिंधके असा त्याचा अवतार होता. पण त्याच्या हातात अख्खी पत्रावळ भरून प्रसादाचा शिरा होता. याच्या नजरेतील हताश भूक वाचून त्या मुलाने त्याला अख्खी पत्रावळ देऊ केली.
त्याला काय करावे ते काहीच कळेना. दबकत दबकत त्याने हात पुढे केला. त्या मुलाने पत्रावळ निगुतीने याच्या हातात ठेवली आणि नाकातले प्रवाही द्रव्य सांभाळत तो दोन दात पडके निरागस हसू हसला.
त्याक्षणी त्याचा तिसरा डोळा चरचरून डाग देत निखळून गेला. सगळे आवाज ओसरून गेल्यासारखे त्याला सुन्न झाले. त्या काळ्या मुलाचे हसू कुठेतरी आत जाऊन भिडले आणि त्याला हुंदका दाटून आला.
राक्षस माणसांत आला होता.