संपली एकदाची युनिट टेस्ट! खरंच शेवटचा पेपर म्हटलं की किती हायसं वाटतं ना? मग तो अगदी युनिट टेस्टचा का असेना.तसंच मलाही आज वाटलं.त्याचाच आनंद मानत कॉलेजच्या बाहेर पडले आणि बस स्टॉपवर आले.
नेहमीप्रमाणे बसची वाट बघण्यास सज्ज झाले. आता सज्ज झाले वगैरे हे असं ,का असा प्रश्न पडला असेल ना? कारण बसची वाट बघण्यातच अर्धा जीव जातो इथं. बस यायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल असं गृहीत धरून मी बेस्ट वाल्यांना ४ शिव्याही घालून घेतल्या. मग टाईमपास व्हावा यासाठी एफ.एम लावायचा विचार करतेय तोच कधी नव्हे ती माझी बस चक्क ५ मिनिटांत आली.पुन्हा पुन्हा पाहिलं तर खरंच २२४- शांतीआश्रम हीच बस होती.
नेहमीप्रमाणे गर्दी होतीच बसमध्ये चढताना. कशीतरी धडपडत बस मध्ये चढले.बसायला जागाही मिळाली. आता जवळपास १ तास फुरसत होती घरी पोचायला. एफ.एम लावला खरा पण विंडो सीट नसल्यामुळे गाणी नीट ऐकू येत नव्हती म्हणून एम्पी३ लावून संदीप खरेचं अग्गोबाई ढग्गोबाई नॉन स्टॉप १०-१५ वेळा ऐकलं.थोड्याच वेळात विंडो सीट मिळाली.
एफ एम लावला आणि कुठल्यातरी स्टेशनवर चांगलं गाणं लागेल हे शोधत होते तोच ९८.३-रेडिओ मिरची वर राहत फतेह अली खानने गायलेलं "लागी तुमसे मन की लगन....लगन लागी तुमसे मन की लगन" हे वन ऑफ माय फेवरिट्स गाणं लागलं. पूर्णतः मग्न होऊन ते गाणं ऐकलं. तोवर मी म्हणजेच बसने अर्धा रस्ता पार केला होता. एक एक भाव अनुभवला गाण्यातला. गाणं संपल्यावर स्टेशन चेंज केलं तोच रेडिओ सिटी वरही तेच गाणं. ह्या एफ एम वाल्यांच हे नेहमी अनुभवलंय मी. एका स्टेशन वर एखादं गाणं वाजलं ना की थोड्या वेळाने तेच गाणं दुसऱ्या कुठल्यातरी स्टेशनवर वाजतच....असो.
हा असा गाण्यांचा सिलसिला सुरू होता त्यात "मै टल्ली हो गयी" सारखी गाणीही वाजलीच.
पण आज सगळी स्लो रिदम असलेली गाणी ऐकायचा मूड होता. याला कारणही तसंच व्हॅलिड होतं. आज "त्याची" म्हणजेच "सख्याची" खूप आठवण येत होती. अभ्यासाच्या टेन्शनमुळे गेले काही दिवस त्याच्याशी नीट बोलताच आलं नव्हत म्हणूनच असेल कदाचित !गाणी ऐकण्याच्या आणि त्याला आठवण्याच्या सिलसिल्यात एक तास इतक्यात निघून गेला.
आज कानाला एफ एम लावूनच बस मधून उतरायचं अस ठरवलं. मोबाईल ठेवला पर्समध्ये आणि हेडसेट तसाच कानाला ठेवून उतरले खाली. का कोण जाणे, पण आज मूड होता तसाच. मध्येच खरखर आली सिग्नल नसल्यामुळे. पण उतरल्यावर मात्र आवाज अगदी क्लिअर.....
बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला तेवढ्यात. माझ्याकडे नेहमीप्रमाणे छत्री तर नव्हतीच. आणि का ठेवावी छत्री? पाऊस गेले काही दिवस कुठंतरी दडी मारून बसलेला असा अचानक येईल हे थोडीच माहीत होतं मला? आणि असंही मला छत्री न्यायचा नेहमीच कंटाळा येतो आणि बरंच झालं पाऊस येत होता. भिजायचा मूड होताच माझा.
त्या रिमझिम पावसात चालत होते आणि तेवढ्यात गाणं लागलं.....
"रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम
भिगी भिगी ऋत मे
हम-तुम हम-तुम चलते है...चलते है.... "
गाणं ऐकताना वाटलं काय सिचुएशनला लागलंय गाणं. आणि मी चक्क गाण्यात. हरवले तेही अशी की आजूबाजूला सगळीकडे शांतता आणि पावसात चालणारे "मी" आणि "सखा"(तो) असं इमॅजिन केलं. पण नंतर स्वतःलाच खुळं ठरवत स्वप्नातून बाहेर आले कारण इथं पाऊस होता. रिमझिम-रुमझुम ऋतू पण भिजलेला होता. त्यात चालणारी "हम" म्हणजेच "मी" तर .होते पण माझ्याबरोबर असायला हवा असणारा "तुम" म्हणजेच "सखा" नव्हताच मुळी आता सोबतीला. तो तिथं सातासमुद्रापार, गाढ नाही म्हणता येणार पण साखर झोपेत होता. कारण तेव्हा माझ्याकडे संध्याकाळचे ४.३० आणि त्याच्याकडे सकाळचे ७ वाजले होते.
त्याच्या विचारात घर केव्हा आलं कळलं नाही आणि तोवर गाणंही संपलं होतं. पण दिवसभराचा असलेला थकवा माझ्या चेहऱ्यावर आता मात्र नव्हता तर स्वतःच्याच वेडेपणावरचं छोटंसं हसू मात्र होत.
पण आवडलं असतं खरंच मला खूप त्याच्याबरोबर पावसात फिरायला. म्हणजे कसं माहीतेय, त्या गाण्याप्रमाणेच एखादी बाग... शांत आणि नीरव. तिथंच मी आणि तो, रिमझिम पडणाऱ्या पावसात भिजणारे,खूप मज्जा करणारे आणि मनसोक्त भिजून झाल्यावर एखाद्या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा घेणारे.
पण कसलं काय? असली नुसती स्वप्नच बघायची आम्ही.तो येईल आता पुढल्या उन्हाळ्यात आणि लगेच १५ दिवसांनी जाईलही. त्यामुळे असा योग कधी येईल कोण जाणे? त्यामुळे मला सध्यातरी या स्वप्नावरच धन्यता मानावी लागणार आहे.....
"कधी रे असं होईल?
येणाऱ्या पावसात
ओलेत्या दिवसात
आपली भेट होईल... ".
.......सई(सुप्रिया पाटील)