म्हणणे वसंत फुलला ही धूळफेक आता ।
दिसतो ना सारीकडे दगडगोटा राडारोडा ॥
म्हणणे की पंचम कोकिळेचा जीव घेतो प्रेमिकांचा ।
कर्णी असे कोंबला लघुकर्णा भ्रमणध्वनीचा ॥
म्हणणे कुमुदिनी फुलल्या नि तीनपर्णी पेटला ।
जंगले वाचवा जे म्हणती त्यांनीच लावला वणवा ॥
गोजिरे रूप गांवांचे तो भूतकाळ आता ।
दीडविटी भिंतींना शिमिटचा पक्का गिलावा ॥
हुरडा लसूणचटणी वा रसरंगी डाळकैरी ।
खत्रुड खाद्य ते विसरा चायनीज आता प्यारी ॥
आजीच्या वाकळीतिल ऊब विकत मिळते कां?
त्यासाठी वसंत मनी नितची जागता हवा ॥
फसवी प्रलोभने परकी वेळीच नाकारणे निके ॥
निसर्ग सखा जिवाचा त्या आदरे जोपासणे ॥