तो मीच आहे ..... !

"साहेब मी गुन्हा कबूल करायला आलो आहे! असे बघताय काय माझ्याकडे मी कामिनी पटवर्धनांचा खून केलाय, डोक्यात फ्लॉवरपॉट मारून. ", तो अगदी ठामपणे सांगत होता.

सावंतांनी एकवार त्याच्यावर आपादमस्तक नजर फिरवली आणि मग शांतपणे हवालदाराला म्हणाले, " २२४४, घ्या यांचाही जबाब नोंदवून घ्या. आणखी एक जण कामिनीबाईंच्या खुनाची जबाबदारी स्वीकारणार! "

"अरे काय चाललेय काय, पोलिसांना काय समजताहेत काय हे लोक! ", अचानक सावंतांचा तोल सुटलाच.

"ओ साहेब, ओरडायला कशाला? मी माझा गुन्हा कबूल करतोय, तुमचे श्रम वाचवतोय. यू शुड से थॅंक्स! उलट तुम्ही भडकताय काय? "

"३१४० या @#$ला टायरमध्ये घाल रे, $#@ मला शाणपण शिकवतोय. साल्याला थर्ड डिग्री दाखवा म्हणजे कळेल. खून करताहेत @#$%&! बाय द वे, काय नाव काय म्हणालास तुझं? आणि तुला माहितीय?.... तू तिसरा आहेस, हा खून मी केलाय म्हणून सांगणारा! दोघा जणांनी आधीच क्लेम लावलाय. च्यायला कामिनी पटवर्धन म्हणजे काय विमा पॉलिसी वाटलीय की काय तुम्हा लोकांना! "

"काय? कसं शक्य आहे हे? खून मीच केलाय साहेब. तुम्ही त्यांच्या ऑफिसातल्या लोकांना विचारा.. कामिनीला शेवटचा भेटणारा माणूस मीच होतो. "

"काय, अच्छा म्हणजे तूच तो राजन गावंड काय? कुठे फरारी झाला होतास? " आता चमकायची पाळी सावंतांची होती.

"मी घाबरलो होतो साहेब, तिला मारताना काही वाटले नाही. पण ती मेली आहे हे लक्षात आल्यावर तंतरली माझी साहेब म्हणून पळून गेलो. चार दिवस लपून होतो साहेब! पण आता हजर झालोय साहेब! मला अटक करा. मी सगळं सांगतो तुम्हाला. ती साली मरायच्याच लायकीची होती. साली कुणा-कुणा बरोबर फिरायची, मी विचारलं तर डोळे दाखवायला लागली. म्हणे तू पटवर्धनांचा पगारी नोकर, आपली पातळी ओळखून राहा. साली माझी लायकी काढते. उचलला फ्लॉवरपॉट आणी घातला डोक्यात....! "

"कदम, घ्या याला पण आत घ्या! "

सावंतांच्या हातात कामिनी पटवर्धन केसची फाइल होती. ही केस विलक्षण वळणावर आली होती. फाइल चाळता चाळता सावंत भूतकाळात शिरले......

चार दिवसापूर्वी पटवर्धन ग्रुपच्या मॅनेजींग डायरेक्टर कामिनी पटवर्धनांची त्यांच्या ऑफिसमधील, त्यांच्याच केबिनमध्येच भर दुपारी हत्या करण्यात आली होती. कोणीतरी डोक्यात काहीतरी जड वस्तू (नंतर कळले की तो एक पितळी फ्लॉवरपॉट होता) मारली होती. आणि आता चार दिवसात आजचा राजन गावंड धरून तीन जण सांगत होते.......

तो मीच आहे....!!
......
.........
..............

"प्रांजल बंगला" आज सकाळपासूनच गजबजला होता. दादासाहेब सारखे घड्याळाकडे बघत आतबाहेर करत होते. नोकरांवर ओरडत होते...

"रखमा, भरल्या वांग्याची भाजी तु चाखून बघीतलीस ना? अजयला मीठ कमी लागतं माहीत आहे ना तुला? "

रखमाकाकी गालातल्या गालात हसायला लागल्या, हसणार नाही तर काय?

अजय, दादासाहेब पटवर्धनांचा एकुलता एक मुलगा. पटवर्धन गृपचा भावी एम. डी.! दादासाहेबांच्या पत्नी करुणाबाई गेल्यापासून रखमाकाकींनीच अजयला लहानाचा मोठा केला होता. त्याच्या आवडी निवडी त्यांना माहीती नसतील तर कुणाला? रखमाबाई करूणाबाईंच्या माहेराहून आलेल्या, खुप वर्षापासून या घरातली काम करत होत्या.. अजयच्या लहानपणीच साध्या दम्याचे निमित्त होवून करुणाबाई देवाघरी गेल्या, तेव्हा अंत्यसमयी करुणाबाईंनी अजयला त्यांच्या हाती सोपवला. आणि त्यांनीही आईच्या मायेने त्याला वाढवलं होतं. त्यांना स्वत:चं अपत्य नव्हतंच. त्यामुळे अजयलाच त्यांनी आपल्या सख्ख्या मुलासारखे वाढवले होते. त्यांची माया, अजयवरचं त्यांचं प्रेम दादासाहेब ओळखून होते. म्हणुनच ते रखमाला नोकर न मानता घराची एक सदस्यच मानत होते.

दोन वर्षापुर्वी पुढे शिकण्यासाठी अमेरिकेत जातो म्हणाला, म्हणून जाण्यापुर्वी दादासाहेबांनी त्याचं लग्न आटपून घेतलं. "आता सुनबाईला घेवून जा बरोबर म्हणजे इकडे मी निर्धास्त राहू शकेन. "

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेला अजय जवळ जवळ दोन वर्षांनी परत येत होता घरी! वर्षभर कामिनी आणि अजय अमेरिकेत होते. दररोज फोनवर बोलणे असायचेच. पण अचानक दादासाहेबांना हृदय विकाराचा झटका आल्याने दोघेही भारतात परत आले. दादासाहेबांना थोडे बरे वाटायला लागल्यावर जेव्हा अजयने परत जायचा विषय काढला, तेव्हा कामिनीने दादासाहेबांना अशा अवस्थेत सोडून जायला ठाम नकार दिला. त्यांच्या देखभालीसाठी म्हणून भारतातच राहण्याचा तिने निर्णय घेतला. त्यामुळे अजयही निश्चिंतपणे अमेरिकेला गेला. पण यामुळे कामिनी मात्र दादासाहेबांची लाडकी बनली होती. आज अजय परत येणार होता. त्यामुळे दादासाहेब फारच अधीर झाले होते.

रखमा अगं कामिनी कुठेय? त्या लेकराकडे बघ गं जरा.. दोन वर्षानी नवऱ्याला भेटतेय पोर. मोठी धीराची आहे माझी पोर....!

सकाळपासून कामिनीची लगबग चालुच होती. अजय येणार, किती दिसांनी भेट होणार होती. तसं व्हिडीओ चॅटींग असायचं रोज. फोन तर सारखेच... पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद..... काही वेगळाच असतो. तो कसा दिसत असेल आता? बारिक झाला असेल का? की जाड झाला असेल?
हजार शंका.. खरेतर गेल्या महिन्यातच अजयने स्वत:चीच एक सीडी शुट करून पाठवली होती तिला. पण मानवी मन.... कुणाला कळलंय...!!! तिची सारखी आत बाहेर चालुच होती.

पण हा अजून कसा नाही आला? फ्लाइटची वेळ गृहित धरून आत्तापर्यंत यायला हवा होता तो.
"काकी, लिमयेकाकांना फोन लावून विचारा ना काय झालेय ते? अजयला आणायला विमानतळावर तेच गेले आहेत ना? शेवटी तिला राहवलं नाहीच.

लिमये काका म्हणजे दादासाहेब पटवर्धनांचे फॅमिली डॉक्टर कम जिवलग मित्र! अजयला आणायला विमानतळावर तेच गेले होते. कामिनीला विचारलं होतं दादासाहेबांनी, जातेस का म्हणून? पण अजयच्या स्वागताची तयारी करण्यासाठी म्हणून कामिनी घरीच राहिली होती.

ट्रिंग.. ट्रिंग......... ट्रिंग.. ट्रिंग....
सगळेच फोनकडे धावले.
" हॅलो, कामिनी पटवर्धन बोलतेय........! "

" बच्चू, मी अरुकाका बोलतोय", फोनवर लिमयेकाकाच होते. बच्चू, दादाला घेवून सिटी हॉस्पिटलला ये लगोलग. अजयच्या गाडीला अपघात झालाय.

कामिनीच्या हातातून हँडसेट निसटलाच, ती मटदिशी खालीच बसली.

"काय झालं बच्चू? ", अनिष्टाची शंका येवून दादासाहेब, रखमाकाकी दोघेही तिच्याकडे झेपावले.

"दादा, यांच्या गाडीला अपघात झालाय, काकांनी त्यांना सिटी हॉस्पिटलला नेलंय आपल्याला तिथेच बोलवलेय. दादासाहेबांना जणू सगळा बंगलाच आपल्याभोवती फिरत असल्याचा भास झाला. कसेबसे त्यांनी स्वत:ला सावरले आणि.....

सिटी हॉस्पिटल...

"अरू, कुठेय माझा अज्जू, त्याला फार लागलं तर नाहिये ना? आणि तु होतास ना बरोबर, कसा काय झाला अपघात? दादा कमालीचे भेदरले होते. त्यांना काही म्हणता काही सुचत नव्हते.

"दादा, तु शांत हो आधी, मी सगळे सांगतो. अज्जुने ऐनवेळी आपले तिकिट रद्द करून आधीची फ्लाइट बुक केली होती. थेट घरी पोहोचून आपल्याला आश्चर्यचकित करण्याचा त्याचा इरादा होता बहुतेक. इथे उतरल्यावर त्याने एक खाजगी टॅक्सी ठरवली आणि घरी यायला निघाला. पण मध्येच अंधेरीपाशी एका भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्याच्या टॅक्सीला धडक दिली. लोकांनीच त्याला इथे हॉस्पिटलमध्ये आणून पोचवले. नेमका मी त्याला फोन केला होता. सुदैवाने त्याचा मोबाईल सुस्थितीत असल्याने जवळच असलेल्या कुणीतरी घेतला आणि मला ही घटना कळाली. मी मग तुला कळवण्यासाठी म्हणून घरी फोन केला तर तो नेमका बच्चुनेच घेतला.

चल आधी डॉक्टरला भेटू. डॉ. साठे माझे चांगले मित्र आहेत. ते बघ साठे इकडेच येताहेत.. चल........

डॉ. साठेंचा चेहरा कमालीचा गंभीर होता., " माफ कर, अरुण, अजय इज नो मोअर! डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. आम्हाला काही करायची संधीच मिळाली नाही!

दादासाहेब कोसळले... हाता तोंडाशी आलेला गुणी मुलगा काळाने ओढून नेला होता.

"अरुण, हे सदगृहस्थ......! "

"संदीप, हे दादासाहेब पटवर्धन, अजयचे वडील. पटवर्धन गृप ऑफ इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा. सद्ध्या फक्त एक असहाय बाप! ", डॉ. साठे अरुकाकांकडे पाहातच राहिले.

या घटनेनंतर दादासाहेब ढासळुनच गेले. तशातच त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. काल परवा पर्यंत हसरं खेळतं असणारं घर.... आज त्याला स्मशान कळा आली होती. कामिनीने तर अजय गेल्यापासून स्वत:ला आपल्या रुममध्ये कोंडुनच घेतलं होतं जणू. कुणाशी बोलणं नाही, कुठे जाणं नाही. तिचे आई वडील तिला न्यायला आले तेव्हा मात्र तिने त्यांच्याबरोबर जायला स्पष्ट नकार दिला.

"नाही आई, इथे दादांना माझी गरज आहे. त्यांना अशा अवस्थेत सोडून जाणे मला नाही जमणार. काकींचं पण वय झालंय, हे घर आता मलाच जपावं, सांभाळावं लागणार आहे"

"सावित्रीबाईसाहेब, पटवर्धनांचं नशीब मोठं, म्हणून अशी सून लाभली हो त्यांना. स्वत:वर आकाश कोसळलंय, पण ते दु:ख बाजुला ठेवून सगळं घर सांभाळायला निघालंय लेकरू. " रखमाकाकींचे डोळे आणि उर भरून आले होते.

कामिनीच्या आई वडीलांना आपल्या लेकीचा खुप अभिमान वाटला. ते भरल्या अंत:करणाने परत गेले.

त्यानंतर काही दिवसातच दादासाहेबांनी कंपनीच्या कामातून लक्ष काढून घेतलं आणि जबाबदारी कामिनीच्या खांद्यावर सोपवली. आणि कामिनीने काम बघायला सुरुवात करून अवघे सहा महिनेही झाले नव्हते. आणि काळाने दुसरा आणि मोठा धक्का दिला होता.

कोणीतरी भर दिवसा ऑफीसमध्येच कामिनीची हत्या केली होती आणि गंमत म्हणजे पोलीसांकडे आत्तापर्यंत तीन जणांनी खुनाची कबुली दिली होती. तिघेही जण छातीवर हात ठेवून, मुद्देसुदपणे सांगत होते की..

" तो मीच आहे...............! "

सावंतांच्या डोक्यावरचे उरलेसुरले केस पण उडणार होते बहुतेक ही केस संपेपर्यंत.

कदम, आण रे एकेकाला! राउंडला घे, बघू काय म्हणतात ते पुन्हा एकदा! "

पहीला भीत भीतच त्यांच्या ’स्पेशल खोली’त शिरला. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशी एक स्पेशल खोली असतेच. ही खोली गुन्हेगारांचा कबुलीजबाब घेण्यासाठीच वापरली जाते. गुन्हेगाराकडून त्याचा गुन्हा वदवून घेण्यासाठी विविध प्रकारची कायदेशीर (आणि बेकायदेशीर सुद्धा) साधने तिथे असतात.

तो भिंतीवर लटकवलेल्या एकेक गोष्टी पाहात घाबरतच आत आला. वेगवेगळ्या प्रकारचे लोखंडी हुक, टायर्स, छताला बांधलेली रस्सी, पाच पाच फुट लांबीचे बांबू. वेताच्या छड्या. खरेतर सावंतांनी आजपर्यंत या साधनांचा कधीच वापर केला नव्हता. मुळात गुन्हेगार हा ही एक माणुस असतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सायकालॉजी घेवून एम. ए. झालेले इन्स्पे. अनिरुद्ध सावंत म्हणजे एक अजब रसायन होते. गुन्हेगारापेक्षा गुन्हेगारी संपवण्यावर त्यांचा भर होता. कुठल्याही गुन्हेगारावर ते आपल्या पद्धतीने उपचार करत. हो... त्यांच्या मते गुन्हेगार म्हणजे एक आजारी पेशंटच असतो. त्याची गुन्हेगारी वृत्ती म्हणजे एक विकार, त्याच्यावरच घाव घातला की काम जास्त सोपे होते, असे त्यांचे साधे सरळ तत्वज्ञान होते.

तर स्वत:ला कामिनीचा खुनी म्हणवणारा पहिला माणुस.. आत शिरला.

"या, नाव काय सांगितलं होतस बरं तु, म्हणत सावंतांनी पुन्हा एकदा केस फाईल हातात घेतली.

"जी सायेब, अभंगराव...! "

"अं, हा बरोबर अभंगराव मोडतोड आपलं तडमोड, सोलापुरचा का बे तु? कामधंदा काय करतोस? "

जी सायेब, आपला बिजिनेश हाये. आमी बटनं बनवतो. "

"बटनं, म्हणजे शर्टाची...! "

"व्हय सायेब, समद्याच कपड्यांला लावता येतील अशी बटनं बनतात सायेब आपल्या फॅक्टरीमदे! "

"आयला, तुझी पण फॅक्टरी आहे.. सावंतांनी त्याच्याकडे वरून खालपर्यंत पाहिलं. हा माणुस फॅक्टरीच काय, एखाद्या पान टपरीचा मालक देखील वाटत नव्हता. जेमतेम सवा पाच फुट उंची, पाउण फुट रुंदी, काळ्या चेहऱ्यावर कमालीचे तेलकट भाव.

"सायेब, मोहनदास चाळीत खोली नं. ३ मध्ये बारकं युनीट हाये बगा आपलं बटनं बनवायचं. काये सायेब, फॅक्टरी म्हणलं की कसं येकदम वजनदार वाटतं" त्याच्या चेहेऱ्यावरची ओशाळवाणी लाचारी त्याची लायकी सांगत होती.

"असो, बोल बाबा काय झालं त्या दिवशी" सावंत अगदी शांतपणे एकेक प्रश्न विचारीत होते.
मांजर कसं झुरळाला पंजांनी खेळवून खेळवून मारतं ना तसं.

"सायेब, पटवर्धन फेब्रिक्सला आमी बटनं सप्लाय करतो बगा. चार महिना झाली बगा, त्यांनी माझं पेमेंट केलं नव्हतं की! त्या दिवशी त्यासाठीच बाईंना भेटायला गेलतो ना. आमी जाम समजावून पायलं बगा, लई इनंत्या केल्या की वो पण बाई ऐकाया तयारच न्ह्याय. आमी पैशाची मांग तशीच रेटली तर म्हणाल्या गुमान चालता हो, न्हायतर गार्डांना बोलवून धक्का मारून भायेर काढीन. आपलं पण डोकं सरकलं बगा आन तीची पाठ फिरली की रागाच्या भरात तिथलंच येक पितळ्याचं फुलदाणी उचललं आन घाटलं कि वो डोक्यात. बाईला वरडाय पण नाय आलं बगा. तसाच तितून गपचुप बाहेर आलो. "

"मग इतके दिवस कुठे गायब झाला होतात. "

"’घाबरलो की वो सायेब, पन मग दोसलोग म्हनलं कीं आपुनहून गुन्हा कबुल केला तर शिक्षेत सुट मिळतय म्हणं. आमी रागाच्या भरात मारलं की वो तिला. आमी गरीब मानुस हाये सायेब, तुमच्याच हातात असतंय बगा सगळं, सोडवा की यातून. काय नाय तर, सजा तरी कमी होतय का बगा ना जरा! "

"ठिक आहे तु जा आता! ", हवालदार कदम.. दुसऱ्याला पाठव आत.

"दुसरा माणुस आत आला. सावंत त्याच्याकडे बघतच राहीले. साधारण पन्नाशीचं वय. साडे पाच ते पावणे सहा फुट उंची, चेहेऱ्यावर कमालीचे सात्विक भाव. अतिशय साधा, गरिब वाटणारा हा माणुस.. अं.. जयंत साठे बरोबर. साठेंनी आत येताच त्या खोलीकडे एकदा पाहिलं, स्वत:शीच हसले.

"खोली छान सजवलीये साहेब, नमस्कार. पण माझा जबाब मी आधीच दिलेला आहे. आता नव्याने काय हवंय माझ्याकडून तुम्हाला. "

सावंत चमकले. त्यांनी ही खोली खास बनवून घेतली होती. तिच्या दर्शनानेच गुन्हेगार अर्धा होत असे. आणि हा माणुस तर सराईत गुन्हेगारही वाटत नव्हता.

"साठे, तुम्ही पटवर्धनांच्या ऑफीसात स्टोअर किपर म्हणून काम करता. "

"गेली तीस वर्षे! पटवर्धन फार्मासुटिकल्स मध्ये. कधी इकडची काडी तिकडं नाही झाली साहेब तीस वर्षात. पण कामिनी बाईंनी गृपचा चार्ज घेतल्यानंतर एके दिवशी म्हणजे मागच्या महिन्यात ४ जानेवारीला, बाईंनी स्टोअरच्या चाव्या माझ्याकडून मागून घेतल्या आणि मला त्या रात्री माझी ड्युटी असताना देखील सुटी घ्यायला सांगितली. मला संशय आला म्हणून मी गुपचुप रात्री तिथं गेलो तर पाहिलं की स्टोअरमधून रात्रीच्या अंधारात औषधांची चोरी चालली होती. मी आरडाओरड केली तसे आजुबाजुला लोक जमा झाले आणि ते लोक पळून गेले. पण मी कामिनीबाईंकडे दिलेल्या स्टोअरच्या चाव्या तिथे कुलुपात लटकत होत्या. म्हणून मग मी याचा उलगडा करून घेण्यासाठी बाईंकडे गेलो. तर त्यांनी माझ्यावरच खोटे नाटे आरोप केले. साहेब गेली तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केलेली. तो आरोप नाही सहन झाला मला. रागाच्या भरात तिथलाच पितळी फ्लॉवरपॉट उचलला आणि कमिनीबाईंच्या डोक्यात घातला. तिला ओरडायला पण झालं नाही. पण लगेचच आपल्या हातून काय घडलय याची जाणीव झाली. मग तेथून बाहेर पडलो. बाईंची केबीन थोडी एका बाजुला आहे. त्यामुळे सहसा काय चाललंय ते बाहेरच्यांना कळत नाही आणि केबिनमध्ये जाणारा माणुससुद्धा लक्ष ठेवून बसल्याशिवाय दिसत नाही. मला त्यादिवशी केबिनमध्ये शिरताना कुणीही पाहिले नव्हते. त्यामुळे मी गुपचुप बाजुच्या दरवाजाने बाहेर पडलो. घरी गेलो. घरुनच रजेचा अर्ज दिला. बायको मुलांसमवेत एक दिवस मजेत काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना काय घडले आहे याची कल्पना दिली. आणि त्यांची समजुत काढून मग स्वत:ला तुमच्या स्वाधीन केले. "

ह्म्म्म! इंटरेस्टींग!! खरं सांगू, साठे का कोण जाणे पण मला अजुनही वाटतंय की तुम्ही खोटं बोलताय. कदाचित... कदाचित.....! असो, तुमच्याशी नंतर बोलुच पुन्हा. तुम्ही या, कदम त्या हिरोला घेवून ये. हो तोच राजन गावंड.

राजन गावंड, हा माणुस अतिशय देखणा, साधारण ६. १ फुट उंची, गोरा पान रंग, सुशिक्षित वाटणारा एकंदर प्रथमदर्शनी प्रभाव पाडणारा असा होता. कामिनीच्या खुनानंतर घेतलेल्या ऑफीसच्य स्टाफच्या जबाबातून सावंतांना समजले होते की हा माणुस कामिनीकडे नेहेमी येत असे. ज्या दिवशी कामिनीचा खून झाला त्या दिवशी देखील कामिनीला भेटणारा शेवटचा माणुस राजनच होता. म्हणुनच त्याचे नाव कळताच सावंत दचकले होते आधी. त्यांना त्याच्यावर संशय आला होता.
पण आता तो स्वत:च सांगत होता की "तो मीच आहे! "

"बोल हिरो, का मारलंस कामिनीला! "

ही केस म्हणजे सावंतांना गंमतच वाटायला लागली होती. एक खून होतो आणि तिघे जण येतात काय, मीच खून केलाय म्हणून हट्ट धरून बसतात काय! सगळंच अजब!!

"आणि हे बघ, आता खरं बोल, आधीच्या दोघांनीही बऱ्याच थापा मारल्यात. आता तु अजून पकवू नकोस. "

"मला सुपारी मिळाली होती कामिनीच्या खुनाची. सुपारी म्हणण्यापेक्षा एकप्रकारे माझा नाईलाज होता. मी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून होतो. पैसा दिसला आणि मोह आवरला नाही... मारला हात. पण दुर्दैवाने पकडला गेलो. पोलीसांपासून मला वाचवण्याचे आमिष दाखवून कामिनीच्या खुनाची भानगड माझ्या गळ्यात मारली त्याने. आणि गंमत बघा, आता मी स्वतःच स्वतःला पोलीसांच्या स्वाधीन केलय. तेही खुनी म्हणून.
असो, खुप सभ्य वाटायची पण एक नंबरची पाताळयंत्री बाई होती साहेब. मी माझ्या दिसण्याचा फायदा घेवून कामिनीची ओळख करून घेतली. कंपनीचा कर्मचारीच असल्याने ते फारसे कठीण गेले नाही. तिला भेटून भेटून तिचा विश्वास संपादन केला. आणि एक दिवस संधी मिळताच ठरल्याप्रमाणे मी तिला मारली. काय करणार. मान अडकली होती ना. पण त्याने दगा दिला सायेब, सगळ्या लफड्यातून सोडवणे तर दुरच, गेल्या दोन दिवसात त्याने मलाच ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. दोनदा मरता मरता वाचलो. तेव्हा ठरवलं की बास. आपल्याला दगा देणाऱ्याला सोडायचं नाही. बाहेर राहून मरण्यापेक्षा माफीचा साक्षीदार होवून कोर्टापुढे कबुली दिली तर सजा तरी कमी होइल. निदान जीव तरी वाचेल! "

आता सावंत सावरून बसले. राजनबद्दल त्यांनी बरीच माहिती काढली होती. त्याच्या अनेक उद्योगां (? ) बद्दल त्यांना माहिती मिळाली होती. पटवर्धन गृपच्याच एका लहानशा कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणारा हा माणुस अनेक कारणांसाठी बदनाम होता.

"बोल राजन, कोणी सुपारी दिली होती तुला कामिनीला मारण्याची? "

"मी सांगतो साहेब, पण मला वाचवाल ना? "

"मी प्रयत्न करेन पण शब्द देत नाही, शिक्षा तर होणारच.. फक्त ती कमी करता येइल का एवढे मी पाहीन. "

"साहेब, राजनने एकदा इकडे तिकडे पाहिले.. जणू काय भिंतींना पन कान नाहीत ना ते चेक करून घेत होता. मग पुढे सरकून हळुच म्हणाला. " साहेब त्या माणसाचे नाव आहे "दादासाहेब पटवर्धन! "

सावंत उडालेच.

भें............., तुला माहिती तु कुणावर आरोप करतोयस ते? दादासाहेबांचं स्वत:च्या मुलापेक्षाही जास्त प्रेम होतं कामिनीवर. म्हणुनतर त्यांनी आपल्या कंपनीची सगळी जबाबदारी कामिनीच्या खांद्यावर सोपवली होती. सावंतांनी सरळ राजनच्या मानगुटीलाच हात घातला. दादासाहेबांसारख्या देवमाणसावर थेट आरोप म्हणजे. सावंत स्वत: वैयक्तिकरित्या दादासाहेबांना ओळखत होते. खरेतर म्हणुनच ही साधी खुनाची केस असुनसुद्धा त्यांनी डिपार्टमेंटकडून मागून घेतली होती. अर्थात सुरुवातीला साध्या वाटलेल्या केसने आता एकदम वेगळेच वळण घेतले होते ही गोष्ट अलाहिदा.

साहेब, खरं तेच सांगतोय. मला माहीती होतं तुमचा काय कोणाचाच विश्वास नाही बसणार या गोष्टीवर. पण हेच सत्य आहे..... सावंतांच्या आक्रमक पवित्र्याने राजनची पाचावर धारण बसली होती. पण तो आपल्या जबानीवर ठाम होता.

३१४०, याला टाक कोठडीत आणि पोस्टमार्टेम रिपोर्टची कॉपी दे बरं मला. पुन्हा एकदा पाहू दे तो.

हवालदाराने पोस्टमार्टेम रिपोर्टची फाईल आणून सावंतांच्या हातात दिली. सावंतांनी पुन्हा एकदा रिपोर्ट चाळायला सुरुवात केली. आणि हळुहळू त्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलायला लागलं.

ह्म्म! अस्सं आहे तर! पण मग नक्की कोण? आनी दादासाहेबांचं नाव घेण्याचा राजनचा उद्देश्य काय?
की दादासाहेब खरोखरच? सावंत स्वत:शीच बडबडत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा रिपोर्ट वाचून काढला. आणि....

३१४०, २२४४ चला थोडं पटवर्धन गृपच्या ऑफीसला भेट देवून येवू. थोडीफार लिंक लागतेय मला. कदाचित आज आपल्याला या केसचा सुत्रधार सापडेल.

"च्यायला, इचित्रच हाय हे बेनं, धड तंबाकुबी खाऊ देत न्हाय. ३१४० हे करा, ३१४० ते करा, याला आत घ्या, त्याला टायरमध्ये घाला! आता काय, तर कामिनी पटवर्धनच्या हापिसात चला. परवाच तीन तास उबवली की तितंच, आता नवं काय सापडणार हाय तितं सायबाला देव जाणे? "

३१४० म्हणजे हवालदार कदम चांगलेच वैतागले होते. एकतर घटना एकदम इतक्या वेगाने घडल्या होत्या की चार दिवसात नीट बायकोशी निवांत बोलायची सुद्धा फुरसत मिळाली नव्हती. ३१४० म्हणजे हवालदार कदम आणि २२४४ म्हणजे हवालदार जाधव म्हणजे अगदी नंबरी जोडी होती. कुठल्याही केसमध्ये ३१४० असला की २२४४ असलाच पाहीजे. विशेष मध्ये दोघांचे एकमेकाशी अजीबात जमायचे नाही, कायम दोघे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचे.... पण एकमेकाशिवायही दोघांचे जमायचे नाही. त्यांच्या एकमेकावर कुरघोडी करायच्या नादात बऱ्याच वेळा गोंधळ व्हायचा पण बऱ्याच वेळा त्यातुनच काहीना काही नवीन दुवा सापडून जायचा. इन्स्पे. सावंतांचे तर त्या दोघांशिवाय पानही हलत नसे. याचे एकमेव कारण म्हणजे दोघांचा प्रामाणिकपणा, मनापासून कंटाळा न करता काम करायची वृत्ती. साहजिकच ही केस सावंतांनी आपल्या हातात घेतली तेव्हा कमिशनर साहेबांकडून त्यांनी या दोघांनाही मागून घेतले होते. सावंत साहेबांचे जय - विजयच होते म्हणा ना दोघे.

या दोघांनाही घेवून सावंत पुन्हा एकदा पटवर्धन ग्रूपच्या ऑफीसमध्ये येवून धडकले.

त्या दोघांनाही सावंतांनी कामिनीच्या केबीनमध्ये सोडले आणि स्वत: इतर स्टाफकडे वळले.

"घालू द्या दोघांना काय गोंधळ घालायचाय तो, तोपर्यंत आपण गप्पा मारू. "

समोर एखाद्या आज्ञाधारक पाल्यासारखे उभ्या असलेल्या मॅनेजर देशपांड्याकडे पाहत प्रसन्नपणे सावंत म्हणाले आणि देशपांडेंच्या पोटात गोळाच आला.

चार दिवसापुर्वीही असेच सावंत त्यांना गप्पा मारू म्हणाले आणि त्यानंतर ज्या गप्पा सावंतांनी मारल्या त्यामुळे गेले चार दिवस देशपांडेंची झोपच उडाली होती. एक पोलीस अधिकारी बोलून कुठल्या विषयावर बोलणार. आपल्या नेहेमीच्या स्टाईलने सावंतांनी त्याना एका सिरिअल किलरचा किस्सा सांगितला होता आणि भेदरून गेलेल्या देशपांड्यांकडून आपल्याला हवी ती माहीती काढून घातली होती. त्यामुळे आत्ता सावंतांनी गप्पा मारायचे नाव काढले की देशपांड्यांना ठसकाच लागला. त्यांची स्थिती पाहुनच सावंतांनी हसू आले. ते पुढे काही बोलणार तेवढ्यात.....

साहेब, साहेब करत ही जोडगोळी बाहेर आली.

"थांब रे ३१४० मी सांगतो काय झाले ते", इति २२४४.

"चल बे २२४४, मी सिनिअर आहे, मी सांगणार काय सापडलय मला ते! ", ३१४० ने दादागिरी गाजवली.

"तुला नाय, आपल्याला! ", २२४४ ने पुन्हा आपलं घोडं पुढे दामटलं.

"२२४४, ३१४० चं म्हणणं बरोबर आहे, तो सिनिअर आहे ना, त्याला सांगू दे आधी", सावंतांनी २२४४ ला डिवचलं.

तसा ३१४० ने विजयी चेहेऱ्याने २२४४ कडे पाहीलं आणि सुरुवात केली.....

साहेब, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही केबिनचा दरवाजा उघडला आणि हे इकडून असे केबीनमध्ये शिरलो.......

"च च च, अरे येड्या चुकलास बघ, साहेब आम्ही असे नाही शिरलो आत"..... संधी साधून २२४४ ने मुसंडी मारली.

"मग कसे शिरलो? ", ३१४० ने मारक्या म्हशीसारखे विचारले.

"तर साहेब आम्ही दरवाजा उघडला आणि तिकडून तसे आत शिरलो.... २२४४ ने गंभीरपणे सांगितले तसे सावंतांना हसू आवरेना. आता मात्र ३१४० ही जोरजोरात हसायला लागला. बघता बघता सगळेच खदखदून हसायला लागले.

"साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळीकडे शोध घेतला, आणि शोध घेताना......! ", सुहास शिरवळकरांच्या अमर विश्वासचा फॅन असलेल्या २२४४ ने खास अमरच्या स्टाईलमध्ये एक पॉज घेतला.....

आणि तीच संधी साधून ३१४० मध्ये घुसला..., पुढचे मी सांगतो साहेब.

"साहेब, टेबलापाशी काय तरी आहे, जरा आत येताय का? " २२४४ ला संधी न देता ३१४० ने थेट मुद्दा संपवुनच टाकला.

"येस, मी याचीच वाट पाहत होतो मित्रांनो, म्हणुनच तुम्हाला दोघांनाच आत सोडलं होतं".

"हात तुज्या मारी, सगळी मजाच घालवून टाकलीस", २२४४ करवादला.

सावंत लगबगीने आत गेले. त्या दोघांनी जे काही त्यांना दाखवले ते बघून तर त्यांनी मस्तपैकी जोरजोरात शिळच घालायला सुरुवात केली.

"दोस्त कंपनी, आणखी एक दोन प्रश्न मनात आहेत, त्यांची उत्तरे मिळाली की ही केस संपलीच म्हणून समजा! " सावंत भलतेच खुशीत आले होते. "चलो थोडा मॅनेजर साबके साथ थोड्या गप्पा मारेंगे. " खुशीत असले की सावंत असलं धेडगुजरी हिंदी बोलत. त्यांचं बोलणं ऐकलं आणि बाहेर उभे असलेले देशपांडे लगेच टॉयलेटकडे पळाले.

अरे देशपांडे साहेब कुठे गेले?

कुणीतरी टॉयलेटकडे बोट केले आणि सावंत खदखदून हसले आणि दुसऱ्या एका कर्मचाऱ्याकडे वळले.

"कामिनीबाईंच्या केबिनमध्ये आणखी एक दरवाजा आहे तो, कुठे उघडतो? "

"साहेब, तो दरवाजा शेजारच्या मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये उघडतो. म्हणजे त्याचं असं झालं साहेब, मोठ्या साहेबांनी शेजारी शेजारी दोन केबीन बनवून घेतल्या होत्या. एक त्यांच्यासाठी आणि शेजारची दुसरी अजयसाहेबांसाठी. पण अजयसाहेबांचा अकाली अपघाती मृत्यू झाला आणि त्यांची केबीन कामिनी मॅडमच्या वाट्याला आली मात्र तेव्हापासून मोठ्या साहेबांची केबीन बंदच आहे. " कुणीतरी उत्साहाने माहिती पुरवली.

तसे सावंतांनी त्यालाच पकडले, " म्हणजे जर कोणी दादासाहेबांच्या केबिनमध्ये लपून राहीले असेल, आणि संधी साधून त्यानेच जर कामिनीचा खून केला असेल तर, ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही, नाही? "

तसा तो हिरो गारठला, " साहेब मी काय सांगणार त्याबद्दल, तुम्ही शोध घेताच आहात. "

"मला अजून एक सांगा, जयंत साठे यांना तुम्ही ओळखता का? "

"हो साहेब, पटवर्धन फार्मास्युटिकल्स मध्ये स्टोअरकिपर म्हणून होते. मोठा हसतमुख आणि प्रसन्न माणुस. खुप इमानदार आणि जुना माणुस. दादासाहेबांचा व्यक्तिश: आवडता म्हणलात तरी हरकत नाही. पण त्यांचा काय संबंध? "

"कुछ नही! " विसरून जा.

सावंतांनी ३१४० आणि २२४४ ला जवळ बोलावलं आणि काहीतरी त्यांच्या कानात सांगितलं, तसे मान हलवून दोघे बाहेर निघून गेले.

"चला मीही निघतो, गरज पडली तर येइनच गप्पा मारायला! " शेवटचे शब्द सावंतांनी मुद्दामच मोठ्याने, टॉयलेटमधल्या देशपांड्यांना ऐकू जातील असे उच्चारले आणि तिथेही देशपांड्यांना ठसका लागला. तसे सावंत स्वत:शीच हसत बाहेर पडले आणि त्यांनी आपला मोहरा "प्रांजल" बंगल्याकडे वळवला.

सावंत जेव्हा बंगल्यावर पोचले तेव्हा डॉ. लिमये दादासाहेबांचं रुटीन चेक-अप करत होते. सावंतांना बघीतले आणि दादासाहेबांनी मनापासून त्यांचे स्वागत केले.

"ये रे अनिरुद्ध, खरे तर मीच तुला फोन करणार होतो. म्हणलं तुला विचारावं तपास कुठपर्यंत आला ते आणि एक गोष्ट तुला सांगायची राहून गेली होती तीही सांगायची होती. "

"आधी अरुला भेट, हा डॉ. अरुण लिमये, माझा जवळचा मित्र अगदी तुझ्यासारखाच आणि अर्थातच कट्टर शत्रुही! सारखा माझ्या खाण्या पिण्यावर नजर ठेवून असतो. आणि अरू हा अनिरुद्ध सावंत, गेली २० वर्षे झाली, अजून इन्स्पेक्टरच आहे. तत्वनिष्ठेचे असेही फायदे असतात बघ. "

आणि मग तिघेही खळखळून हसले.

"दादा, केस खुपच विचित्र होत चाललीय! गंमत वाटेल तुला पण माझ्याकडे एकुण तीन जण आलेत, मीच कामिनीचा खून केलाय असे सांगत. गंमत अशीय की तिघेही अगदी जेन्युईन वाटताहेत. पण तरीदेखील काहीतरी मिसिंग आहे. काय ते शोधायलाच तुझ्याकडे आलोय! " सावंतांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले.

"तेच सांगतोय मी तुला अनी, शक्य असेल तर सद्ध्या तरी हे तुझ्यापाशीच ठेव. पटवर्धनांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे हा. "

दादासाहेब फार गंभीर झाले होते.

"दादा, एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, कायद्याच्या कक्षेत राहून शक्य ती सर्व मदत करेन मी. कायदा मोडणाऱ्याला मी कधीही माफ करत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे. " सावंत अतिशय गंभीरपणे बोलले.

"मला माहीत आहे रे ते, तुझा विश्वास आहे ना या दादावर? असो, तर ऐक काही दिवसांपुर्वी मी आणि अरू आम्ही दोघे जसलोकला गेलो होतो. काही चेक-अप करून घ्यायचा होता त्या साठी. नंतर तिथून तसेच पुढे थोडा वेळ पी. डी. पी. ला गेलो आणि तिथे मी कामिनीला पाहीलं, अनी, अरे तिच्याबरोबर कुणीतरी होतं आणि अतिशय विचित्र परिस्थितीत होते ते दोघे. म्हणजे एखादे नवथर जोडपे असावे तसे चाळे चालू होते. मला क्षणभर प्रचंड राग आला. मी रागा रागाने पुढे जाणारच होतो पण अरुने थांबवले. आपण पुर्ण माहिती काढू आणि मग तिच्याशी बोलू असे त्याचे मत पडले.

घरी आल्यावर मी थोडा विचार केला आणि वाटलं त्यात गैर तरी काय आहे, तिनं अजुच्या आठवणीत रडत बसणं मलाही आवडलं नसतं, पण तरीही तिने निदान वर्षभर तरी थांबायला हवं होतं रे. पण ठिक आहे तिला कोणी योग्य जोडीदार भेटला असेल तर त्यांच्या वाटेत यायचं नाही असा मी निर्णय घेतला. पण आम्ही त्यानंतर एक खबरदारी म्हणून त्याची माहीती काढायची ठरवली.

अनी, खुप मोठा धक्का होता रे माझ्यासाठी, ती दोघे एकमेकांना अजय आणि कामिनीच्या लग्नाआधीपासुनच ओळखत होती. स्पष्टच सांगायचं तर कामिनीने हे लग्नच अजयच्या इस्टेटीसाठी केलं होतं. पण मग अजय अमेरिकेला परत गेल्यावर सख्खी मुलगी घेणार नाही एवढी काळजी घेतली रे तिने माझी. तशात एक दिवस मी नेमलेल्या खाजगी गुप्तहेराने बातमी आणली की अजयचा मृत्युही नैसर्गिक नव्हता. त्यात हस्ते परहस्ते कामिनी आणि तिच्या त्या प्रियकराचा हात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिचा तो प्रियकर माझ्याच एका कंपनीत नोकरी करतोय.

दुर्दैवाने अजून पुरावे नाहीत आमच्याकडे, म्हणून ही माहिती पोलीसात कळवली नाही. आम्ही ठरवलं की कामिनी व तिच्या मित्रावर नीट नजर ठेवायची आणि जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे. त्या दिवशी मी ऑफीसला गेलो होतो अरू बरोबर. तिथे कामिनीचा संभावितपणा बघून मस्तकात तिडिकच गेली रे. बोलता बोलता अरुला म्हणालो मी की या चांडाळणीला कुणी संपवलं तर त्याला मी वाटेल तेवढा पैसा देइन. मला वाटतं ते कुणीतरी ऐकलं असावं कारण त्याच रात्री मला एक अज्ञात फोन आला. फोनकर्त्याने विचारलं की मी खरोखरच त्याला हवे तेवढे पैसे देइन काय म्हणून? मी विचाराच्या तंद्रीत होतो, त्याच नादात त्याला हो म्हणून गेलो. नंतर लक्षात आलं आपण केवढी मोठी चुक केली होती ते. कारण त्यानंतर तिसऱ्या दिवशी कामिनीचा खून झाला. पण विश्वास ठेव अनी, तिला मारण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. कसेही असले तरी तिने मुलीसारखी सेवा केली होती रे माझी.

"दादा, एक सांग, तो आवाज तुला आठवतोय, म्हणजे यापुर्वी कधी ऐकल्यासारखा वगैरे! "

दादांच्या डोळ्यासमोर पुन्हा ते फोनवरील संभाषण उभे राहीले.

संध्याकाळी सात च्या दरम्यान तो फोन आला होता. बहुदा कुठल्यातरी पब्लिक बुथ वरून केला असावा कारण वाहनांचे, रहदारीचे आवाज पार्श्वभुमीवर जाणवत होते.

"सायेब, दोपारच्याला तुमी बोलत व्हता त्या डाक्टरबरुबर त्ये खरं हाये का, जर आमी तुमच्या सुनेला मारली तर किती रुपया देल तुमी. आन जर आमाले पोलीसानी पकडला तर आमच्या फॅमिलीला तो पैसे देल काय तुमी?

"कोण बोलताय तुम्ही? आणि कशाबद्दल बोलताय? " इति दादासाहेब

"तुम्हाला म्हायते सायेब आमी कशाबद्दल बोलून राह्यला ते! फकस्त येवडा सांगा हो की नाय! "

"ठिक आहे! पण तुम्ही कोण?

ते कळलच ना सायेब तुम्हाला. मॅडम गेली की आमी येतोच ना पैसा नेयाला, नायतर आमची फेमीली येल. "

आणि फोन कट झाला.

"दादा, शब्दश: विचार करायचा झाला तर बोलण्याची ही पद्धत मी यापुर्वी कुठेतरी ऐकलीय, पाहिलीय! आता आठवत नाहीये पण आठवेल लवकरच. "

चल मी निघतो, बरीच कामे बाकी आहेत अजून. जाता जाता सावंतांचे लक्ष खोलीतल्या फ्रिजकडे गेले आणि त्यांना लक्षात आले की आपल्याला तहान लागलीय. तसे ते फ्रिज कडे वळले त्यांनी फ्रिजमधली पाण्याची बाटली काढली,

"अरे बापरे, ही भलतीच थंड आहे रे दादा, बहुदा खुप दिवसाची दिसतेय. "

"अरे हो, आठवडा झाला त्या फ्रिजच्या पाण्याचा वापरच नाही झाला. रखमा, अनिरुद्धला पाणी आणून दे गं थोडं. "

रखमाकाकी पाणी घेवून आल्या, तोवर सावंतांनी बाटली तोंडाला लावली होती. थंडगार पाणी तोंडात गेले आणि त्यांनी तोंड वाकडे केले.

"भलतेच गार आहे रे! ही बाटली घेवून जातो मी बरोबर चौकीवर पोचेपर्यंत मध्ये तहान लागलीच तर उपयोगी येइल. "

"अरे रखमाकाकी, तरुण दिसू लागलीस की तु? केसाला मेंदी वगैरे... "

"कसलं वो सायेब, कामिनीच मागं लागून लावायची मेंदी माझ्या केसाला. न्हायतर आजकाल लै गळतात बघा. मी कसली लावते मेंदी. " रखमाकाकी उगीचच लाजल्या.

"बरोबर आहे, बरोबर आहे म्हातारपण आलं की केस गळणार, बरं आहे म्हणा नाहीतर हेच केस आपला गळा कापायला कमी करत नाहीत. " सावंत आपल्याच तंद्रीत म्हणाले आणि दरवाजाकडे निघाले.

तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला.

".................................

"हं बोल ३१४०, काय झालं, मी सांगितलेलं काम झालं की नाही?

"..................................................................................................

"गुड आणि २२४४ ला पण मी काही सांगितलं होतं.......! "

"....................................................................................................

"एक्सलंट,............! तुम्ही दोघे एक काम करा, त्या तिघांनीही घेवून आज संध्याकाळी सहा वाजता "प्रांजल" बंगल्यावर पोचा. हो हो.. दादासाहेबांचाच बंगला. आज संध्याकाळी खुनी आपल्या हातात असेल.! "

सावंत अतिशय खुशीत परत दादासाहेबांकडे वळले.

"माफ कर दादा, मला कामिनीचा खुनी सापडलाय, पण त्याला मी संध्याकाळी सहा वाजता तुमच्या समोर आणेन. त्याआधी काही छोटी छोटी कामे आहेत तेवढी आटपून घेतो. माफी एवढ्यासाठी की तुला न विचारता तुझ्या बंगल्याचा या कामासाठी वापर करायचा असं मी ठरवलय. तुझी परवानगी असेलच असे गृहीत धरून. आणि प्लिज, त्यावेळी तुम्ही तिघेही मला हवे आहात. तु, डॉ. लिमये आणि रखमाकाकी तुम्हीसुद्धा. जाण्यापुर्वी तुला सांगतो मी इथे का आलो होतो ते, तुझ्या कामिनीच्या त्या प्रियकराने स्वत:ला तिचा खुनी म्हणून पोलीसात कबुल केलय आणि त्याने आरोप केलाय की कामिनीच्या खुनाची सुपारी तु त्याला दिली होतीस. पण आता सत्य माझ्यासमोर हात जोडून उभं आहे, सहा वाजता भेटुच. "

संध्याकाळी बरोबर सहा वाजता.....

स्थळ : प्रांजल बंगल्याचा मध्यवर्ती हॉल

उपस्थित : इन्स्पे. सावंत, ३१४०, २२४४, दादासाहेब, अरुकाका, रखमाकाकी, अभंगराव तडमोड, जयंत साठे आणि राजन गावंड.

सगळ्या वातावरणात एक विलक्षण तणाव होता. सगळ्यांचेच चेहरे विलक्षण तणावाखाली दिसत होते. फक्त ३१४० आणि २२४४ मात्र एखाद्या लग्नाला आल्यासारखे वावरत होते.

मंडळी.... सावंतांनी उगीचच खर्जातला आवाज लावला होता.

कामिनी पटवर्धन यांचा त्यांच्या ऑफीसात खून झाला आणि आत्तापर्यंत तिघा जणांनी आपणच खून केला असल्याचा दावा केलाय.
अभंगराव तडमोड, राजन गावंड आणि जयंत साठे.

शेवटचं नाव ऐकलं आणि दादासाहेबांसकट रखमाकाकींनाही धक्का बसला.

"जयंता, हे काय ऐकतोय मी? " दादा एकदम उसळले.

साठे मात्र शांत होते. " ते सत्यच आहे, दादासाहेब, कामिनीला मीच मारलंय! "

तशा रखमाकाकी अतिशय अस्वस्थ झाल्या, " जयंतदा तुम्ही!.... "

"रखमाकाकी, तिकडे आपण लवकरच येवू, इथे तीन संशयित आहेत त्यातला एकच खुनी आहे आणि तो अजून सिद्ध व्हायचाय. "

"तर अभंगराव तडमोड, तुम्ही कामिनीचा खून केलात. "

"व्हय की सायेब, आमी तर मारली ना तिले, आमचा पैसा देयाला तयार न्हवती...... आमी सगळा सांगितला ना तुमाला. "

"हाच तो अनी, याच माणसाने मला फोन केला होता. " दादा एकदम उत्तेजीत झाले.

"मला माहीत आहे, दादा म्हणून तर याला इथे आणलय. तर अभंगराव तुम्ही खून केलात. खरं काय ते सांग.. नायतर माझ्याशी गाठ आहे. टाटा हॉस्पिटलच्या तुझ्या रिपोर्टची कॉपी आहे माझ्याकडे

हा वार मात्र वर्मी लागला आणि अभंगराव जोरजोरात रडायलाच लागला. सावंतांनी पुढे होवून त्यांच्या डोक्यावरून प्रेमळपणे हात फिरवला. आणि इतरांकडे वळून म्हणाले...

"याला ब्लड कॅन्सर आहे दादा, शेवटच्या स्टेजला आहे बिचारा. त्या दिवशी तुमचं बोलण ऐकून याच्या डोक्यात कल्पना आली आणि त्याने तुला फोन केला. कामिनीचा खून करण्याच्या बदल्यात तुझ्याकडून मिळणारा पैसा त्याच्यामागे त्याच्या कुटुंबाची काळजी घेवू शकत होता. कारण आजकाल त्याचा धंदाही बुडीतच गेला होता. पण कुणीतरी दुसऱ्याच कुणीतरी कामिनीला संपवले आणि याच्या सगळ्या आकांक्षावर पाणी पडले. म्हणून याने खोटेच कारण रचून स्वत:ला पोलीसांच्या स्वाधीन केले. जेणेकरून त्याला शिक्षा होईल आणि त्याचे कुटुंबीय तुझ्याकडून पैसे मिळवू शकतील. तुझ्याशी बोलताना आपल्या कुटुंबियांचा उल्लेख त्याने यासाठीच केला होता. पण दुर्दैवाने आणखी दोघे खुनी हजर झाले आणि याच्या योजनेवर पाणी फिरले. माफ कर अभंगराव, मला तुझ्याबद्दल खुप सहानुभुती आहे पण...... कायदा कायदा आहे आणि मी कायद्याचा रक्षक! "

आता दुसरे महाशय, श्री. राजन गावंड.....

दादा, हा माणुस गुन्हेगार आहे पण या केसमध्ये नाही. कामिनीच्या मस्तकावर मागच्या बाजुला जी जखम होती ती पितळी फुलदाणीने केलेली. पण ती जखम जवळपास मानेवर, थोडीशी वरच्या दिशेने. म्हणजे बघा मेंदुच्या खालच्या बाजुस साधारण. कामिनीची उंची साधारण साडे पाच फुट, राजनची उंची सहाच्या वर तेव्हा त्याने जर वार केला असता तर तो डोक्याच्या वर, शिरोभागी असला असता. सहा फुट उंचीचा माणुस आपल्या पेक्षा बुटक्या माणसावर फुलदाणीने हल्ला करेल तेव्हा फुलदाणीचा फटका त्या व्यक्तीच्या डोक्यावर मध्यभागी बसेल. तो जर त्याच्या मानेवर बसायला हवा असेल तर फटका मारणारी व्यक्ती थोडी बुटकी साधारण पाच फुट उंचीची हवी, म्हणजे बघ आपल्या रखमाकाकीएवढी.

सगळ्यांच्या नजरा चमकून रखमाकाकींकडे वळल्या. त्या खाली मान घालून शांतपणे बसल्या होत्या.

दादा दुर्दैवाने तुझे आणि डॉ. लिमयेंचे बोलणे राजनने देखील ऐकले होते. त्यावेळी त्याने विचार नाही केला, पण जेव्हा कामिनीचा मृत्यू झाला तेव्हा मात्र तो पिसाळला आणि कामिनी व तिची इस्टेट दोन्ही तुझ्यामुळे हातून निसटलीय असा त्याने ग्रह करून घेतला. दुर्दैवाने तुझ्या संपत्तीचा मोह असला तरी ती त्याला कामिनीसहीत मिळाली तरच हवी होती. कारण या माणसाने कामिनीवर मनापासून प्रेम केलेय. माफ कर दादा, पण हा सगळा प्लॅन कामिनीचाच होता, म्हणजे अजयशी लग्न, मग त्याचा मृत्यू आणि मग तुझी पाळी. आणि दादा, तुझ्या सेवेचं देखील एक नाटकच होतं. तुझ्या सेवेच्या नावाखाली तुला रोज स्लो पॉयझनिंग करण्यात येत होतं. या दोघांनीही अफलातून मार्ग शोधून काढला होता त्यासाठी.

दादा तुला नुकताच हृदयविकाराचा झटका येवून गेलेला. त्याचा त्यांनी फायदा घेतला. आठवतं दुपारी मी तुझ्या फ्रिजमधली पाण्याची बाटली घेवून गेलो होतो? त्या पाण्याचा रंग, त्याची चव थोडी वेगळी वाटली. म्हणून मी ते पाणी आमच्या लॅबमध्ये नेवून टेस्ट केलं.

दादा... हे नेहेमी आपण पितो ते पाणी नाहीये. याला शास्त्रीय परिभाषेत "हेवी वॉटर" असे म्हणतात. हे पाणी मोस्टली बाँबनिर्मितीसाठी वापरलं जातं. या पाण्याचं वैशिष्ठ्य असं आहे की आपल्या नेहेमीच्या पाण्याप्रमाणे हे रक्तात मिसळत नाही. तर तसंच वेगळं राहतं. आणि त्यामुळे अर्थातच ब्लड प्रेशर वाढत राहतं आणि मग एखादा मोठा मानसिक धक्का आणि सगळं खल्लास.

खरे तर अजय गेला तेव्हाच तुझी पण पाळी होती. पण सुदैवाने अरुणजींसारखा निष्णात डॉक्टर तुझ्यावर उपचार करत असल्याने तुझं ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहीलं आणि तु वाचलास.

पण जेव्हा कामिनीचा खून झाला तेव्हा राजनच्या मनाने घेतलं की तुच सुपारी देवून तिचा मृत्यू घडवून आणलास. तसेही तिच्यानंतर राजनला जगण्यात स्वारस्य राहीले नव्हतेच. पण मरता मरता त्याने कामिनीच्या खुनाचा सुड घेण्याचे ठरवले आणि स्वत:लाच खुनी म्हणून पोलीसांच्या स्वाधीन करून तुझे नाव घेतले. यात अगदी तुला शिक्षा नाही झाली तरी बदनामी आणि मनस्ताप होणार होताच.

पण एक गोष्ट मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की ज्या ट्रकने अजयला उडवले तो ट्रक राजनच चालवत होता. त्याला घटनास्थळी ट्रकसहीत पाहिलेले प्रत्यक्ष साक्षीदार आहेत माझ्याकडे. अजय इकडे येण्याच्या दोन दिवस आधी कामिनीने अजयला फोन केला होता. तिने अजयला सांगितले की तु गुपचुप फ्लाईट बदल आपण दादांना सरप्राईज देवू. अजयने आनंदाने त्याचा फ्लाईटप्लान बदलला, त्याला बिचाऱ्याला कुठे माहीत होते की तो त्याच्या आयुष्याचा मार्गच बंद करतोय. असो............! कामिनी आणि राजनने मात्र आपला डाव साधला.

तसे दादासाहेब उसळले पण अरुकाकांनी त्यांना आवरले. दादासाहेबांच्या आणि रखमाकाकींच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.

सावंत पुढे आले. मंडळी दोघेजण तर या केसमध्ये निर्दोष ठरलेत आता राहीले फक्त श्रीयुत जयंत साठे.

"नाही, हा खून मी केलाय, जयंतदा फक्त मला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत........................

आवाज रखमाकाकींचा होता. सगळेच त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

रखमाकाकी रडत रडत दादांच्या समोर उभ्या राहील्या......

"हो दादासाहेब, मीच मारलं त्या चांडाळणीला. अज्जुच्या मृत्युनंतर एके दिवशी रात्री पाणी प्यायला म्हणून उठले आणि कोणीतरी कुजबुजत्या आवाजात फोनवर बोलत असल्याचा भास झाला. जवळ जावून बघितलं तर ती कामिनी होती. तिच्या या याराशी बोलत होती बहुतेक. तिच्या बोलण्यातून मला एवढंच कळलं की त्यांनीच अज्जुला मारण्याचा कट केला होता आणि त्यांची पुढची शिकार तुम्ही होता.

"देवाने पोटी लेकरू नाही दिलं मला दादा, पण अज्जुनं ते सगळं सुख दिलं होतं. तो मला आई म्हणुनच हाक मारायचा. माझ्या लेकराचा जीव घेतला होता त्या सटवीने. तेव्हाच मी ठरवलं की तिला जाब विचारायचा आणि जमलं तर.....! "

तीला मारलं त्याच्या आदल्या रात्रीपासून तुमच्या केबीनमध्ये लपून होते मी. कामिनी आल्यावर तिच्या समोर जावून उभी राहीले आणि तिला जाब विचारला. म्हटलं, "बयो, कुठल्या जन्मीचं वैर साधलंस, तुला काय दिलं नाही या घराने. प्रेम, माया, वात्सल्य, समृद्धी. तुला अशी दुर्बुद्धी का आठवली? "

तर माजोरीपणे मलाच म्हणते कशी,

" हो मी मारलं अजयला आणि आता त्या म्हाताऱ्याला पण मारणार! त्याचा माझ्यावर इतका विश्वास आहे की तु त्याला काही सांगितलस तरी त्याचा विश्वास नाही बसणार. गेली दोन वर्षे राबलेय मी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी. जा गपचुप घरी जा आणि शहाणी असशील तर शक्य तितक्या लवकर हे गाव सोडून निघून जा. नाहीतर म्हाताऱ्याच्या आधी तुझा नंबर लागेल. "

संताप संताप झाला होता, मस्तकात स्फोट होत होते.

ती त्या बेसावध मस्तीतच मागे वळली आणि तीच संधी साधून मी तिथलीच फुलदाणी उचलून तिच्या डोक्यात मारली. माझ्या अंगात कुठली ताकद आली होती कोण जाणे पण एका फटक्यातच ती खलास झाली. नेमके तेव्हाच जयंतदा तिथे आले, त्यांनी मला त्या अवस्थेत पाहीलं आणि काय ते समजून गेले. त्यांनी माझ्या हातून फुलदाणी कादून घेतली आणि मला म्हणाले ताई, तुम्ही जा मी पाहतो काय करायचे ते. मला काय माहीत, कधी तरी बांधलेल्या एका राखीखातीर ते माझा गुन्हा आपल्या डोक्यावर घेतील म्हणून.

"नाही सावंतसाहेब, कामिनीचा वध केलाय मी, हो खून नाही म्हणणार मी त्याला, वधच होता तो. आणि वेळ पडली तर पुन्हा पुन्हा करेन. "

सावंतसाहेबांनी एक निश्वास टाकला..........

दॅटस ऑल, फ्रेंडस.

खरेतर हे मला दुपारीच कळाले होते. आधी पोस्ट मार्टेम रिपोर्टवरून जखमेची माहीती वाचताना काही शंका मनात उभ्या राहील्या. त्यानंतर केबीनची तपासणी करताना तिथे टेबलाच्या कडेत अडकलेला एक केस मला सापडला, मेंदीने रंगवलेला. खरेतर त्यासाठीच मी दुपारी बंगल्यावर आलो होतो. रखमाकाकींशी बोलता बोलता मी त्यांचा एक केस ढापला. कसा ते विचारू नकोस.

पण केवळ एक केस हा पुरावा होवू शकत नव्हता. कारण साठेंनी फुलदाणीवरचे सगळे ठसे पुसून फक्त आपले ठसे उमटवले होते. तेव्हा फक्त रखमाकाकींच्या सदसदविवेक बुद्धीला साद घालणे हा एकच मार्ग होता, तो मी स्विकारला आणि त्यात यशस्वी ठरलो.

अर्थात ३१४० आणि २२४४ या दोघांचीही फार मदत झाली त्यांनी जर राजन आणि अभंगरावची पाळे-मुळे उपसून काढली नसती तर मात्र इथपर्यंत पोचणे कठीण होते.

"बघ शेवटी, माझ्या मार्गदर्शनाचा फायदा झाला की नाही तुला? " ३१४० ने पुन्हा एकदा २२४४ ला डिवचले.

"माफ करा जयंतराव, तुमच्यासारखा भाउ प्रत्येक बहिणीला मिळो, पण माझा नाईलाज आहे...... मला रखमाकाकींना अटक करावीच लागेल. कारण कायदा शेवटी कायदा आहे आणि मी कायद्याचा रक्षक.

समाप्त.

डिस्क्लेमर : हि कथा साधारण आठ महिन्यांपुर्वी इतरत्र प्रकाशित केली होती. जर संपादकांना योग्य वाटली तर इथेही प्रकाशित करण्यात यावी हि विनंती.

विशाल कुलकर्णी