पाऊलवाट सारी रात्री भिजून गेली
बिलगून गेल्या वडाला नाजूक जाईच्या वेली
मी थांबून तिथेच आहे युगे निघून गेली
पाऊलवाट सारी रात्री भिजून गेली
जाणवली का कधी रे, अस्वस्थता ही शिगेची?
अंगणात तुझ्या सख्या ही, पणती तेवत राहीली.
आससून जगत राहिले मी, वळला नाहीस कधीही
मरणे कित्येक माझी, मी या डोळ्यांनी पाहीली
वेगळ्याच असतात वाटा रे, अन वाटसरू ही वेगळे
उरतो फक्त म्रुदगंध अन ती नजरा नजर पहीली
उन्मळला वड एकदा, अन कोमेजून गेल्या वेली
पाहवला का ते तुजला, तू दे मला कबूली
संपून यातना साऱ्या थंड व्हावी रे ही काहीली
पाऊलवाट सारी रात्री भिजून गेली
बरसतील पुन्हा जलधारा मोहरण्या उदास वेली
नवजीवन देण्याकरिता स्रुष्टी, धारा अवतरली
थांबून राहतील युगे, भेट घडवाया आपुली
मोहरतील क्षण रे सारे अन वेळही होईल ओली.
पाऊलवाट सारी रात्री भिजून गेली.
..............बागेश्री प्र. देशमुख