पाथेय

शोषणाच्या वेदनेची ओल ज्यांनी जाणिली अन्
तिमिर डोही एक पणती लाविली, त्यांना सलाम !


तो वसा जाणुनी ज्यांनी राउळे मांडिली, अन्
मार्गदर्शी दीप स्तंभी मांडिले, त्यांना सलाम !


त्या चिऱ्यांवर नांव अपुले कोरिले, अन्
बावटे अपुलेचि मिरवुन नाचले, त्यांना सलाम


मूलमंत्रांच्या ऋचा कर्मकाण्डी गाडिल्या, अन्
वल्गनांचे घोष ज्यांनी कंठाळले, त्यांना सलाम !


शोषितांच्या प्रेषितांचे ढोंग ज्यांनी वठविले, अन्
तृप्त उदरी तोषुनी सुस्तावले, सलाम !


खोगिरांची भरती जी, मातली मस्तावली, अन्
देवटाके तुडविले बुद्ध्याचि, त्यांनाही सलाम !


तें तिथें घडले, कां न ठावे, ना जणिले परि, अन्
लाविली चूड अपुल्याचि सदना, त्यांना तर सलामच सलाम !


ठिणगीने त्या जळली राणी दख्खनची अन्
मख्ख बसले सह्यकडे धास्तावलेले, त्यांनाही सलाम !

कवि- अरुण वडुलेकर