त्याचे असे झाले... भाग ३

तो दूरध्वनी घ्यायला गेलो आणि सगळे जागरण नेमके त्या क्षणीच अगदी अगदी अंगावर आले. कडाडून जांभई देतच मी दूरध्वनी उचलला. जांभई पूर्ण होण्याची वाट का पाहिली नाही? प्राक्तन बरे हे, प्राक्तन.

"हॅलो, मी बोलत्येय....... मी, (इथे माझी जांभई संपली) तुझी बायको.... लग्न झालंय तुझं... आठवतं का?" अत्यंत हळू, समजावणीचा स्वर. तुम्हाला जर पाच वर्षांच्या कोणाला रेषीय बीजगणीत (linear algebra) शिकवायची वेळ आली तर तुमचा काय स्वर आणि बोलण्याचा वेग असेल तसा अगदी. फक्त त्यात 'आंबटपणा' चेपून भरलेला.

पहिल्यापहिल्यांदा हा स्वर ऐकला की माझे डोकेच फिरायचे. मग हळूहळू माझ्या लक्षात आले की अनेक मार हे तोंड दाबूनच खायचे असतात. जसे, माहिती तंत्रज्ञानात काम करतो यावरून मिळणारे खवचट टोमणे - समाजात अनैतिकता बोकाळली आहे? त्या 'आयटी'वाल्यांच्या मुळे. जागांचे भाव वाढले आहेत? त्या 'आयटी'वाल्यांच्या मुळे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे? त्या 'आयटी'वाल्यांच्या मुळे. हे जसे स्थितप्रज्ञासारखे पचवावे लागते तसेच आपले लग्न झाले आहे ही गोष्टही.

"अगं मालू, मी तुला..."

"फोन करणारच होतो असेच ना? ते कळलेच. माझा आवाज ऐकल्याऐकल्या जी जांभई आली ना, त्यावरूनच कळले किती 'ओढ' लागलेली बायकोची ती." (जांभई आधीच आली होती हे सिद्ध करणे अवघड होतेच. आणि ते 'सिद्ध' करूनही फरक पडला नसता हे लग्न झालेले जाणतातच.) "काय झालं का कामाच्या बायकांशी बोलून?"

कुठल्या बायका? हा विचार मनात उभा रहातो न रहातो तोच...

"आणी किती ढोसलीस काल रात्री? एरवी माझ्या डॅडींनी विचारलं की 'बिअर घेणार का' तर किती नखरे... मला कामच आहे, सकाळी उठायचंच आहे... एक बिअर घेतली की काय झिंगून पडतं की काय कोणी? आणि जणू काही रोजच लौकर उठतोस... एक दिवस उठायचं आणि वर्षभर सांगायचं"

सकाळी आंघोळ करताना थंड पाण्याचा झोत अंगावर पडल्यावर जी अवस्था झाली होती त्याची पुनरावृत्ती झाली. त्या वेळेला मला गळा तरी काढता आला होता, इथे तेही शक्य नव्हते. वाढणारा रक्तदाब काबूत ठेवण्याचा निकराचा प्रयत्न करीत मी म्हटले, "मी रोज लौकर उठतो असे मी म्हणत नाहीय..."

"विषय बदलू नकोस! (इथे कंसात काही लिहायची गरज आहे का?) काल रात्री किती ढोसलीस ते सांग. आणि कुणाला घेऊन आला होतास बरोबर? मद्यगृहात सापडला वाटते नमुना. कायपण बरळत होता. पण तो होता म्हणून मला तुझ्या लीला तरी कळल्या. ऑस्ट्रेलियातला ग्राहक म्हणे. ग्राहक की ग्राहकीण?" 'ग्राहक' या शब्दाचे स्त्रीरूप 'ग्राहकीण' होत नसावे असे वाटले, पण उगाच परत "विषय बदलू नकोस" हा संवाद आला असता.

"बोल ना, (म्हणजे मी इथे बोलणे अपेक्षित होते तर; चारच वर्षं झालीत मिलॉर्ड, रुळेल कैदी हळूहळू) आता का दातखीळ बसली? मला सगळं कळलं म्हणून? कोण ही मेगी? भारतीय वाटते, 'तू छुपी है कहां' काय?" आणि मालूने साग्रसंगीत गळा काढला.

डोळे बांधून मला कुणी मंगोलियातल्या छोट्यात छोट्या खेड्यात जरी सोडले तरी मी त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकेन. पण इथे मला 'मी कोण' असले मुलभूत प्रश्न पडू लागले. च्यायला या सुधाकराच्या. नुसत्या पाण्यावर ठेवला पाहिजे पंधरा रात्री. काय काय सांगितलन त्यानं? काल बहुतेक विनय पाठकच्या शिकवणीला जाऊन आला असावा. इथे मालू सारिकाला शिकवणी देण्याच्या तयारीत होती.

"मालू, मालू, एक मिनिट, एक मिनिट...."

"का, ती मेगी का फेगी दुसऱ्या फोनवर आहे वाटतं?" गळा काढलेला असताना एवढे अख्खे नऊ शब्द विखार काठोकाठ भरून फेकणे आणि श्वासही न दवडता परत सूर धरणे...अतर्क्य तरीही खरे

"मालुडी.ऽऽ... (आता हे मी तिला कध्धीकध्धी तिसऱ्या कुणाच्याही समोर म्हणत नाही, त्यामुळे या संबोधनात थोडासा दम टिकून आहे. ही गोष्ट सांगण्याच्या नादात तुम्हाला सांगून बसलोय खरा, पण आता हे तिला सांगू नका. नाहीतर मला अशा गोष्टी लिहितच घटस्फोटित जीवन जगावे लागेल)...बेबी, ऐक ना पुरूचं"

सूर जरा मवाळ पडू लागला. पण मला अचानक रंगमंचावर नवख्या नटाचं होतं ते झालं - पुढे काय बोलावे हे उमगेना. मग कोंडलेली मांजर जशी जीव खाऊन उडी घेते, शेंडी तुटो वा पारंबी या तयारीने, तसे मी पहिली उडी त्या (हरामखोर) सुधाकररावावर मारली.

"मालुडी, तुला माहीत आहे का तुझ्याशी सकाळी फोनवर कोण बोललं? अग, आपल्या वरच्या मजल्यावर रहाणारे ते बोंबलवाडकर आहेत ना... तेच ते सुका बोंबील भाजून मालूला त्रास देणारे (हे कृत्य खरे तर दुसऱ्याच इमारतीतल्या परबांचे, पण जीव वाचवायला खोटं बोललं तर ते अडचणीत सापडलेल्या नवऱ्यांना माफ असतं)"

हा संवाद अगदीच मर्मस्थानी भिडला. भाजलेल्या बोंबलाचा वास हा तो खाणाऱ्यांनाही (त्यात मीही आलो) अवघड जाणारा प्रकार. मग संपूर्ण शाकाहारी मालूला तर त्या वासाच्या आठवणीनेही उलट्या सुरू होत यात नवल ते काय? सूर एकदम शांत. ८००-१२०० वरून माझा रक्तदाब हळूहळू ८०-१२० वर येण्याचे चिन्हे येऊ लागल्याचे जाणवू लागले. पण आता बोलत रहाणे गरजेचे होते, नाहीतर ही संमोहनावस्था विस्कटली असती.

मी त्या (हलकट) सुधाकररावाने कसा दंगा केला, त्याला पोलिस आमच्या इमारतीखालून कसे पकडून नेत होते, (मी तिथे काय करत होतो? मालूने विचारले नाही, तुमचे काय जाते?) मी माणुसकी आणि ओळख दाखवल्यामुळे माझ्याकडे बघून, माझ्या शब्दाखातर ("तुमच्यासारक्या जंटलमन मान्साकडे बगून सोडतो ह्याला, चल नीग रे बेवड्या" या संवादासकट, आणि त्या बेवड्याच्या पृष्ठभागावर झालेल्या लत्ताप्रहारासकट) कसा त्याला सोडला, या सहकारी गृहरचना संस्थेत कसे आपल्या ओळखीचे कोणी नाहीत (आम्ही तिथे साडेतीनच महिन्यांपूर्वी रहायला आलो होतो), मी चांगला वागून कसे मालूला गरज पडली तर हाक मारायला शेजारी असावेत याची तजवीज करून ठेवत होतो, ... जिवाच्या आकांताने मी किल्ला लढवत होतो. मुरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू या मंडळींनी मला सल्लागार म्हणून ठेवायला हरकत नव्हती.

ती मेगी का फेगी (प्रत्यक्षातली पेगी) इथे घोडा अडला. तोपर्यंत प्रेक्षावर्ग कच्चा फणस सोलून त्याची भाजी आणि ओले काजू सोलून त्याची उसळ एकदम एकावेळेला करून देईल इतका मऊ पडला होता. आता मागे फिरण्यात अर्थ नव्हता. मी घोड्याची एकदम घोडी करून टाकली (खरेतर उलटे).

"आणी मालू, तुला माहीत आहे ती पेगी कोण ते?"

वातावरणात जरा तणाव आल्याचे जाणवले, पण पूर्वीच्या तणावाच्या मानाने हा म्हणजे हिरव्या मिरचीची वाटून घातलेल्या आल्या-कांद्याच्या रसापुढे शहाळ्याचे पाणी. मी घाईघाईत बोलणे चालू ठेवले.

"अगं वेडाबाई, ती पेगी नव्हे, तो पेगा. (जरा तोल सुटल्यासारखा वाटला, पण आता रेटून नेण्यावाचून गत्यंतर नव्हते) अगं आमच्या ऑस्ट्रेलियातल्या ग्राहकाचं नाव आहे 'पेगासस' (हे नाव मला त्यावेळी कुठून सुचले हे नाही सांगता येणार. पण 'पेग' याच अक्षरांनी सुरू होणारे दुसरे पुरुषी वाटणारे नाव मात्र सुचले नाही हे खरे. बाकी पुरुषाचे नाव पेगासस ठेवतात की नाही कोण जाणे), पेगासस स्मिथ (आडनाव तरी खरे सांगावे). त्याच्याबरोबर बैठक होती. आणि या डुकरामुळे (लाडात असली की मालूला असल्या शिव्या खुदुखुदु हसायला प्रवृत्त करतात) मला ती बैठक स्वैपाकघरात बसून करावी लागली"

सुधाकररावाना वापरलेल्या संबोधनाने खुसुखुसु सुरू झाले होते. थोडक्यात, कड्याच्या टोकापर्यंत मारामारी करून मी चित्रपट-नायकाप्रमाणे सहीसलामत परतलो होतो. हुश्श. जरा खोल श्वास घेतला आणि पाचवा गियर टाकला. "आज काय बेत आहे मालविका म्याडमचा?"

आत्तापर्यंत सांगितले नाही (आतापर्यंतच्या भिरभिऱ्यातून वेळ होईल तर ना), मालविका वास्तुरचनाकार (architect) आहे. लोकांची घरे, बागा, पोहणतळी आदी गोष्टींची रचना करून देणे हे काम ती जमेल तेव्हा (म्हणजे ग्राहकांना तिच्यापर्यंत यायला जमेल तेव्हा) करीत असे. तिचे स्वतःचे असे कार्यालय होते, ज्यातला संतोष नावाचा तिचा 'पुरुष शुक्रवार' तिला मालविका म्याडम म्हणत असे. त्याच्या जिभेचे वळण बदलण्याचे अनेक प्रयत्न करून झाले होते. त्याला एका शब्दोच्चारवर्गातसुद्धा घालून झाले. तिथे लेकाचा 'शेड्यूल'च्या ऐवजी 'स्केड्यूल' म्हणायलाही शिकला. पण मालविका 'म्याडम'च राहिली. त्यावरून नेहमीच मी मालूची थट्टा करत असे.

"बेत कसला बाबा... (अगदी अगदी नेहमीचा स्वर. कामगिरी फत्ते! हुर्यो) आज एक ग्राहक आहे, त्याच्याबरोबर त्याच्या शेतीघराकडे जायचंय. त्याला तिथे दोन तळी करायचीयत, एक त्याच्याकरता आणि एक माशांकरता. (झकास कल्पना. आणि ती दोन्ही एकमेकांना जोडली तर मज्जाच. पोटासाठी एरवी कायकाय करतो माणूस. इथे मात्र पोट भरायला आणि कमी करायला एकच उपाय - तळ्यात उतरणे. माझा कल्पनाविलास). असले खडूस असतात हे ग्राहक म्हणजे, तुला काय सांगू"

इथे मी गप्प राहिलो. वास्तविक तिच्या एखाद-दोन 'खडूस' ग्राहकांना मी भेटलो होतो. आम्हाला भेटणाऱ्या 'चांगल्या, आस्थापनेच्या दृष्टीने अत्यंत मूल्यवान' ग्राहकांच्या मानाने तिचे 'खडूस' ग्राहक ही त्यांच्या पायाचे तीर्थ घ्यावी अशी देवमाणसे होती. पण हे बोलून आत्ताच जमवलेला तह का मोडा? तरीही, काहीतरी बोलायल हवे.

"हो ना, उगाच काहीच्या काही तरी बरळत असतात. काम पूर्ण होत आले की बदल सुचवतात. यांना काय वाटतं, की पैसे मोजून काहीही करायला लोक मिळतात?" (प्रिय मालूच्या ग्राहकांनो, मला क्षमा करा. हे जरी सकृतदर्शनी तुमच्या दिशेने असले तरी मी खरे तर माझ्या ग्राहकांविषयी बोलतोय) मी अत्यंत तळमळीने दुजोरा दिला.

तळमळ पोचली. "जाऊ दे, चालायचंच... सकाळी काय खाल्लं राजाने? ('राजा' हेही संबोधन तिसऱ्या कुणासमोर... आलं ना लक्षात? तर हे आपल्यातुपल्यात ठेवा एवढेच) मी येऊन पोहे करून देऊ का?"

"अगं नको, नको, तुला लौकर बाहेर जायचंय ना? मी भरपूर खाल्लंय, अगदी ढेकर येईस्तोवर (पेगीला विचार). मला बऱ्याच इ-पत्रांना उत्तरे द्यायचीत अजून. आणि नवीन पेटलाय, काही वृत्तांत त्याला आत्ताच्या आत्ता हवेत म्हणून".

कुठल्याही नोकरी करणाऱ्या (विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात) बायकोला आपल्या नवऱ्याचा साहेब छळवादी आहे यावर पक्का विश्वास असतो. अर्थात याचे खरे कारण त्या साहेबाच्या नावावर बऱ्याच पावत्या फाडलेल्या असतात. मित्रांबरोबर रात्री दोनपर्यंत बियर ढोसली की, "साहेबाने अमेरिकेच्या ग्राहकाबरोबरच्या दूरध्वनीबैठकीसाठी थांबवून घेतले, त्यामुळे तू तीनदा केलेला भ्रमणध्वनीसुद्धा मला घेता आला नाही (एकदा स्वच्छतागृहात गेलो होतो, एकदा नवीन बियर उघडत होतो आणि एकदा सिगरेट पेटवत होतो; पण खरे का बोला?). आणि नंतर अजून चर्चा करायची आहे म्हणून बळजबरीने 'डिनर'ला घेऊन गेला आणि बिअर पाजली" वगैरे. अशी पावत्यांची सोय करणारे साहेबलोक आणि ग्राहक नसते तर माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खरेच एवढी गर्दी झाली असती का हा एक चर्चेचा विषय आहे (कुठल्यातरी वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रव्यवहारात पुडी सोडून दिली पाहिजे. त्यात काहीतरी करून 'उच्चवर्णीय, बहुजनसमाज, अल्पसंख्यांक' हे शब्द घुसवता आले तर छान पेटेल होळी. मग शिमगा करायला अनेक जण येतीलच पुढे)

असो. तर नवीनासुराचा बागुलबुवा दाखवून मालूला तर टाळले. आता त्या टाळण्याचे कारण सांगतो. तुम्हाला अजून आठवत असेल, तर मालूच्या दूरध्वनी संभाषणाची सुरुवात आणि माझ्या जांभईचा शेवट यात पाचेक सेकंद फरक होता. त्यामुळे तर आगीत तेल पडले होते. तीच झोप अजूनही आपला अंमल गाजवायला आतुर होती. मधल्या हातघाईच्या लढाईत ती जरा बाजूला झाली, पण खडुळलेला डोह शांत झाल्यावर तिने परत डोके वर काढले आणि मला आडवे करण्याचा चंग बांधला. आत्ताशी सव्वासात वाजत होते. आज मला 'घरून काम करण्याची' नवीनासुराने दिलेली परवानगीही तुम्हाला आठवत असेल. आणि माझे पुढचे काम हे नेहमीच्या वेळेवर येणाऱ्या (आणि जाणाऱ्या; केवळ नशीबवान) अशा एका प्रकल्प सल्लागाराबरोबर बैठक हे होते.

थोडक्यात अजून दीडेक तास चांगले आडवे होऊन झोपायला काहीच हरकत नव्हती. आणि मालूला तिच्या 'खडूस' (माफ करा दादा, एवढे समजून घ्या; लग्न झालेला आहे बिचारा) ग्राहकाबरोबर साडेआठला निघायचे होते. म्हणजे ती आत्ता इथे आली (शाब्दिक अर्थाने तिच्या सद्यस्थानापासून माझ्या सद्यस्थानापर्यंत प्रवासाला लागणारा संपूर्ण वेळ दहा मिनिटे; दोन्ही घरांत १३७० मीटरचे अंतर होते हेही आठवते ना?) तर अजून पंचवीस मिनिटे तिला यायला (सकाळी आणि आपल्याच घरी जायचे म्हणून काय झाले? रंगरंगोटीला पंधरा मिनिटे तरी नकोत?), मग नुकत्याच झालेल्या तहामुळे सकाळच्या 'पेगासस'बरोबरच्या बैठकीच्या खऱ्याखोट्या (खऱ्या कुठल्या, खोट्याच सगळ्या; म्हणजे परत कल्पनाशक्तीला ताण) गोष्टी, म्हणजे अजून अर्धा तास. छे, छे!

झोप अनावर झाली की अशी एक अवस्था येते की झोपाळू माणूस सर्वसंगपरित्याग केलेला निर्मोही आत्मा होतो. मग तो बायको मोजत नाही की बहीण. मी अखेर त्या अवस्थेला पोचलो होतो. त्यामुळे नवीनासुराच्या नावावर पावती फाडली.

ही पावती सहज फाडता आली याचे अजून एक कारण - मालूच्या मनात असलेला पंजाब्यांविषयीचा कमालीचा अविश्वास. मालूचा भाऊ एका पंजाबी तरुणीच्या प्रेमात पागल झाला आणि अख्रेर लग्न करून बसला. अशा प्रसंगी कुठल्याही स्त्रीच्या ज्या भावना असतात त्याच मालूच्या होत्या - तिच्या भावाला त्याच्या लायकीपेक्षा खूपच 'खालची' मुलगी मिळाली. एकटा असल्याने खरे बोलतो, मला असे अजिबात वाटत नव्हते. एकतर नचिकेत (मालूचा भाऊ) कमालीचा मेंगळट. मिल्कीने (तिचे कागदावरचे नाव काहीतरी जसविंदर कौर की काहीसे होते) त्याच्यात काय बघितले असा प्रश्न खरेतर विचारायला हवा. पण असो. मिल्कीबद्दल फार सहानुभूती दाखवण्यात अर्थ नाही. तुमच्यापैकी कुणी चहाडी केली तर मी फुकट दानाला जाईन.

थोडक्यात, अख्खी नव्वद मिनिटे मला निद्रादेवीच्या कुशीत घालवायला मिळणार होती. मी मालूला दुपारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आश्वासन दिले आणि ते संभाषण संपवले. मग दूरध्वनीच्या घंटिकेचा आवाज दाबून टाकला, भ्रमणध्वनी परत पलंगाखाली लोटला.

आणि ढाराढोरी घुर्घुरायते...