शिक्षण काय फक्त पोट भरण्यासाठीच?

आज दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकालाच्या निमित्ताने आजकालचे शिक्षण रोजगार मिळण्याच्या दृष्टीने कसे निरुपयोगी आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी प्रसार माध्यमांतील रकाने च्या रकाने खर्च होतील. जणू काही शिक्षणाचा एकमेव हेतु माणसाला पोट भरता यावे हाच आहे.

खरे तर शालेय शिक्षणाचा हेतु माणसाला जगाची माहिती करून देणे तसेच त्याला नवीन माहिती मिळवण्यासाठी सक्षम बनवणे हाच असायला हवा. त्याची रोजगाराशी सांगड घालणे चूक आहे. शिक्षणाने सक्षम झालेला माणूस स्वत:च्या रोजगाराचा प्रश्न स्वत:च सोडवू शकेल. शिक्षणसंस्था या उत्पादनक्षेत्राच्या गरजेप्रमाणे यंत्रमानव पुरवणारे कारखाने होऊ नयेत. तसे झाले तर नवनिर्मिति थांबेल. माणसाच्या गरजा पोट व त्याच्या आसमंतांतला प्रदेश यांच्यापुरत्याच मर्यादित नसतात. जगण्यासाठी त्याला स्वप्नांचीही गरज असते.

आणखी एक गोष्ट. रोजगार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यायचे म्हंटले तर मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे ते वडील माणसांना ठरवावे लागेल कारण मुलांना रोजगारांची परिस्थिति माहीत असण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे एकीकडे आपण मुलांचा कल पाहून शिक्षण द्यावे, वडील माणसांनी आपली मते त्यांच्यावर लादू नयेत असे म्हणतो तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाची दिशा ठरवण्याची जबाबदारी आपण वडील माणसांवरच टाकतो. अशा परिस्थितींत वडीलधाऱ्यांनी ठरवलेली शाखा मुलांना आवडली नाही तर ती शिक्षण अर्धवट सोडण्याची व त्यांची काही वर्षे फुकट जाण्याची शक्यता असते. शिवाय शिक्षण पुरे होईपर्यंत रोजगाराची परिस्थिति बदललेली असण्याची शक्यता असते.

यावर उपाय म्हणजे मुलांना त्यांच्या आवडीच्या शाखेंत शिक्षण घेऊ द्यावे व ते पुरे झाल्यावर रोजगार उपलब्धतेनुसार त्यांनी पुढील प्रशिक्षण घ्यावे.

एकूण काय, फक्त रोजगाराचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण देण्याची कल्पना फारशी शहाणपणाची नाही.

आपणांस काय वाटते?