नातं तुझं माझं..

तो आणि ती..
एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण त्याचबरोबर स्वतःच्या काही तत्वांना कायम चिकटून असतात..'शी बाई, एकत्र निवांत वेळच मिळत नाही' असं म्हणत असतात, पण निवांत वेळ मिळाला कि काहीतरी फालतू कारणावरुन प्रेमळ भांडणंही करतात. शेवटी म्हणतात 'काय आपण फालतू गोष्टीवरुन उगाच भांडत बसलो'. आणि एकमेकांच्या मिठीत गप्पा मारत बसतात.. तो कधी काळजीने म्हणतो, 'आपण एकमेकांवर इतके प्रेम करतो, मग का गं सारखे भांडतो?आता नाही हं भांडायचं..' ती म्हणते, 'अरे असं कसं, भांडणं तर होणारच थोडी, आपल्या दोघात तात्विक मतभेद आहेत टिळक आणि आगरकरांसारखे..पण आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो हेही तितकंच माहिती आहे दोघांना. पण तू म्हणतोस ते खरं. खूप मोठी भांडणं नाही करायची आता.'असं म्हणून पुढच्या भांडणापर्यंत ती दोघं प्रेमानं नांदतात.. परत काहीतरी छोट्या कारणावरुन भांडतात.. कारण......हे नातंच असं. मुरलेल्या लोणच्यासारखं.. जुनं झाल्यावर अधिकाधीक चविष्ट होणारं.


"नातं आपलं कप आणि बशीचं..
कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..
रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप आठवायचं..
आठवता आठवता हळूच गालात हसायचं..


नातं आपलं चहा अन् दुधाचं..
दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..
कधी रुसायचं, कधी हसायचं,
पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच विसावायचं..


नातं आपलं हळव्या प्रेमाचं..
एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..
एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं नावाजायचं..
एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं स्वतःला हरवायचं..


नातं आपलं साता जन्माचं,
सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..
कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..
पण आपण सदैव बरोबरच रहायचं..
"
                                                      -अनु