वारसा !

घर कुठलंही असो, सकाळी साडे आठ- नऊची वेळ

तव्यावरच्या पोळीला, कुणी बाई लावत असते तेल ।

ओट्यामागच्या खिडकीतून येत असतो सूर्यप्रकाश

पोळ्या लाटून भाजायचं काम, चालू असतं सावकाश ।

ज्याला कधीच 'पोळत' नाही, अशा गोल 'पोळ'पाटावर

भाजली जाणारी प्रत्येक पोळी, लाटली जाते काठावर ।

एखादी पोर जशी वाढते, बापाच्या अंगा-खांद्यावर खेळत

तशीच पोळी गोल होते, पोळपाटावर लोळत ।

सासरी जाताना, लेक रडते बापाच्या गळ्यात पडून

तशीच कधी राहते पोळी, पोळपाटावर अडून ।

तरी जावंच लागतं पोरीला, बापाचं घर सोडून,

पोळीलाही तव्यावर ठेवतात, उचलून अगर तोडून ।

तव्यासारखा तापट नवरा, शेगडीसारखी सासू

तरी फुलायचं आनंदानं, लपवायचे आसू ।

असंच करते पोळी, अन् पोळली जाते, भाजली जाते

तोडून, चावून चवीने मग, जेवणामध्ये खाल्ली जाते ।

ती पोळ्या करणारी बाईसुद्धा पोळीच असते खरोखर

पोळले जातात तिचेही हात, पोळीच्याचबरोबर ।

पूर्वी काय, आत्ता काय, चूल तीच, शेगडी तीच

पोळून काढते सगळीकडून अशी त्यातली आग तीच ।

पण ती बाई रडते का? - रडत नाही, काम करते,हसत असते

ओट्यामागच्या खिडकीबाहेर, मोगऱ्याची वेल बघत असते ।

पोळ्या लाटताना होणारा बांगड्यांचा आवाज असतो सोबत

तुटूनसुद्धा  तृप्ती द्यायला बाई असते राबत ।

मग ती पगारी बाई असो,

आजी किंवा आई असो

पोळ्या करणारी बाई घेऊन येते पोळीचाच 'वारसा',

पण, आपण फक्त पोळी खातो, गरम पोळी

त्या वारशाशी आपला संबंध नसतो फारसा !!