माझ्या आठवणीतली कविता ' आजीचे घड्याळ'

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनी ते कुठे अजुनी हे नाही कुणा ठाऊक,
त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधी, तरी ते सारखे चालते !

अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी,
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी,
बाळा झांजर जाहले आरवला तो कोंबडा ऊठ की !

ताईची करण्यात जम्मत तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनिया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता!
आली ओटीवरी उन्हे बघ म्हणे आजी दहा वाजले
जा जा लौकर कानी तो घणघणा घंटाध्वनी आदळे. 

खेळाच्या अगदी भरात गढुनी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तिन्हीसांज ते न समजे, आजी परी आतुनी
बोले खेळ पुरे घरात परता, झाली दिवेलागण
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन !

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा,
जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता
अर्धी रात्र कि रे म्हणे उलटली गोष्टी पुरे, जा पडा,
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा.

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो, तरी ना मिळे.

ही कविता केशवकुमार उर्फ प्र. के. अत्रे यांची आहे.