गोष्ट जुनीच ... माणसं नवीन (भाग २)

खांदे पालट झाला....... आणि ..... यात्रा
नदीकडे वळली. वेळ दुपारची असली आणि ऊन तापलेलं असलं तरी वारा घूं ....घूं
आवाज करीत वाहात होता. अधून मधून धूळ उडत होती. दीडचा सुमार झाला.खरं तर
सगळ्यांनाच भुका लागल्या. तात्या मात्र व्रतस्थ असल्यासारखा तटस्थपणे सगळं
करीत होता. थोड्याच वेळात भटाच्या पोराने जागा निवडली. ती साफसूफ केली.
त्यावर त्याने आणलेली तयारी ठेवली. कणिक, डालडा तूप, मीठ, फुलं आणि इतर
आवश्यक साहित्य होतं. तिरडी बाजूच्याच एका चौथर्‍यावर ठेवली.
बाबासाहेबांच्या देहावरचे हार फुलं काढ्ली गेली. नवीन घातलेले कपडे होते ते
काढून ते तिथेच राहून सर्व व्यवस्था पाहणार्‍या जनूला दिले गेले. जनूचा हा
पिढिजाद धंदा होता. गावातले लोकही त्याला हवे नको ते पुरवित असत. त्याच्या
बरोबर कोणी भांडल्याचे आठवत नाही. शेवटी सगळ्यांनाच त्याचा हात लागणार ही
जाणीव बहुदा त्यामागे असावी. जनूही मन लावून सांगितलेले काम करी. त्याने
बालदीत आधीच गरम पाणी आणलेलं होतं. एका बालदीत थोडं केरोसिन होतं. अगदीच
लाकडं खराब निघाली तर, म्हणून . तात्याने बालदीतल्या पाण्याने अंघोळ केली.
पंचा पिळला.तोच ओलेता पंचा नेसुन , भटाने ठेवलेल्या तयारीजवळ बसला. भटाने
आणलेला अग्नी मडक्यातून काढून केरोसिन टाकू प्रज्वलित केला. तयारी मांडून
एकीकडे कणकीचे पिंड तयार करीत म्ंत्रांना सुरुवात केली. अगीच्या ठिणग्या
वार्‍याने इकडे तिकडे उडू लागल्या. अजूनही जीवनचा पत्ता नव्हता. तात्याला
वाईट वाटलं.
जवळच शशांक बसला होता.त्याने
एकूणच सर्व वातावरणावरून नजर फिरवली. अचानक त्याला इथल्या सगळ्याच गोष्टी
परक्या वाटू लागल्या. जणूकाही हे जग त्याच्यापासून वेगळं पडलय. आपला या
सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही असं त्याला वाटू लागलं. तो केवळ
साक्षीरुपाने तेथे आहे असं त्याला जाणवलं. मात्र ही त्याची अवस्था काही
सेकंदच टिकली. अचानक तो परत मनाच्या अर्धवट अवस्थेत आला. ना धड वर्तमानात
ना धड भूत किंवा भविष्यात. तो उठून बाजूच्याच एका खडकावर बसला.तिकड्जे
तात्याचं सव्य अपसव्य चालू होतं. शेवटी भटाचं आवरलं. .....थोड्याच वेळात
चिता रचण्याचं काम चालू झालं. गावातली बडी मंडळी हातभार लावित होती. आता
देह उचलून चितेवर ठेवण्याची वेळ झाली. शशांक, पियुष ,पाटील आणि इतर लोक
मिळून देह उचलू लागले . सात आठ तास झाल्याने तो चांगलाच जड झाला होता.
शशांकने सहज म्हणून बाबासाहेबांच्या निर्जिव हाताला हात लावून पाहिलं.
त्यांची कातडी प्लस्टिकच्या पेपरासारखी चकाकत होती. बाबासाहेब अस्तित्वात
नाहीत याची त्याला एकदम जाणीव झाली. आपल्यासाठी त्यांनी आणलेल्या बर्‍याच
वस्तू त्याला आठवल्या. तो पण त्यांना बाबासाहेब म्हणूनच हाक मारीत असे.
त्याला एकद्म भरून आलं. त्याला हुंदका फुटला. इतका वेळ याला काहीच कसं
वाटलं नाही आणि आताच याला रडायला काय झालं असं उचलणार्‍यांच्या मनात आलं,
त्यांनी थांबून त्याच्याकडे पाहिलं. पाटिल त्याच्या खांद्यावर हात ठेऊन
म्हणाले, " बाळा, आपल्या हातात काय आहे. सगळि त्याची माया आहे. आपण फकस्त
त्याची आज्ञा पाळायची. रडणं आवर.". अस म्हणून ते बाजूला झाले. मग देह उचलून
चितेवर ठेवला गेला.
सर्व उपचार पुरे झाल्यावर
तात्याने अग्नी दिला. वार्‍याच्या झोतात चिता धडाडून पेटली. जणू काही
मृतदेह आणि लाकडं अग्नीची वाट पाहात होते. तात्याने चितेभोवती
मंत्रोच्चारात उलट्या फेर्‍या मारल्या. दहन विधी समाप्त झाला ( दहन विधी
संपन्न हो गया , आजकालच्या शब्दात). लाल पिवळ्या ज्वाळा एवढ्या उंच गेल्या
की शशांक पाहातच राहिला. थोड्याच वेळात देहाच्या डोक्याजवळ ठिणग्यांचं
मोहोळ जमा झालं. आणि "फ....ट " असा आवाज झाला. भटाचा पोरगा ओरडला," चला काम
झालय. " त्याने मग जनूला बोलावून त्याच्या हातात दहा रुपयाची नोट सरकवीत
चितेची राखण करण्याचे बजावले. मग अश्मा घेऊन सगळ्यांनी तिलांजली दिली.
बहुतेकांना सुटका झाल्या सारखं वाटलं. अजून बाबासाहेवांच्या घरी जाऊन
"दिवयाचे दर्शन घेतल्याशिवाय घरी जाता येणार नव्हते. पण ती अगदी साधी बाब
होती. तात्या आणि पियुष शशांकला आधार देत समजावित निघाले. हळूहळू सगळेच घरी
आले. दिवाणखान्याच्या एका कोपर्‍यात दिवा लावला होता. तीन वाजायला आले.
सगळे घरात शिरले आणि त्यांच्या पाठोपाठ जीवन शिरला. त्याला पाहून माईंना
राग आला. " हा लवकर येणार होता ना ?" त्या स्वतःशीच पुटपुटल्या.
.............
पाटीलहि गेले. गावकरीही
गेले. आता सगळेच घरातले राहिले. बैठकीवर बसून जडशीळ झालेली तारा
सगळ्यांसाठी चहा करायला स्वैपाकघरात गेली.शर्मिला बैठकीवर तशीच बसून होती.
तिला जीवनचा राग आला होता. हा कामाच्या वेळी कधीच हजर नसतो. तिने मनाच्ल्या
मनात त्याला शिव्याशाप दिले. जीवन हातपाय धुऊन माईंजवळ येऊन बसला. तिला
म्हणाला," माई काळजी करू नकोस. आम्ही सगळेच तुझ्याबरोबर आहोत. तू एकटी
नाहीस. ". उत्तरादाखल माईंनी त्याच्याकडे फक्त पाह्यलं. त्यांच्या नजरेत एक
प्रकारचा तिरस्कार होता. कधीही पैसे न पाठवणारा जीवन . म्हणतोय
माझ्याबरोबर आहे. याला इतके वेळा फोन करून यांची तब्बेत ठीक नाही असं कळवलं
तरी एक फोनसुद्धा केला नाही, आणि म्हणतोय 'तू एकटी नाहीस' . निर्लज्ज,
बेशरम..... अर्थातच त्या उघडपणे काहीही बोलल्या नाही. सगळेच जन जीवनकडे
त्रासिकपणे पाहात होते. ते पाहू जीवन चिडून म्हणाला," मी काही मुद्दाम
उशिरा आलो नाही. ऐन वेळेवर इन्स्पेक्शनला जावं लागलं म्हणून उशीर झाला.
नसेल माझ्याशी बोलयचं तर बोलू नका. माई तुझी पण कमाल आहे. " हे ऐकल्यावर
माई जरा वरमल्या. दिवस यांत्रिकपणे गेला. बाबासाहेबांच्या आठवणि काढण्यात,
शिवाय प्रेतयात्रेला येऊ न शकलेल्या गावकर्‍यांच्या भेटण्यात वेळ गेला.
दुसर्‍या दिवशी अस्थि गोळा करायला मात्र जीवन होता. अस्थि घरी आणून त्या
बाहेर टांगेपर्यंतचा वेळ विक्षिप्त शांततेत गेला. शशांकच्या मनात आलं ,
अगदी दोन तीन दिवसांपूर्वि , कसेही असले तरी बाबासाहेब घरात होते. आणि आज
ते नाहीत. केवढी तफावत आहे ......माणसाचं असणं आणि नसणं .....
आपल्यालाही आता काही तरी जॉब करायला हवा. किती दिवस आपण तात्या आणि पियुष
वर अवलंबून राहणार आहोत ? माईची जबाबदारी आपल्यालाच घ्यायला हवी. बाकी सगळे
कडेनी पोहणरे आहेत आपण मधे पोहणारे आहोत. सरला काय, लग्न होईल आणि जाईल.
त्याला अचानक , तात्पुरता का होईना, पोक्तपणा आला. .....
मग कोणीतरी दहावा,
बारावा , तेरावा, याच विषय काढला. बाबासाहेबांना बहीण नव्हती. एकच भाऊ तोही
गेलेला होता. त्यांच्या बाजूनी फारसं कोणी नव्हतं. माईंच्या बाजूनी मात्र
अजून दोन भाऊ आणि एक बहीण होती.दोन भावांपैकी , गजामामा तेवढा संबंध ठेऊन
होता. बाकी दुसरा तर कधीही ढुंकतही नसे. गजामामा येण्याची अजून वाट होती.
बाबासाहेबांचं त्याच्याशी जरा तरी पटायचं. तेही तो भाऊबिजेला येण्याची वाट
पहायचे. असेच कसेतरी दोन् तीन दिवस गेले. खरतर आता सगळ्यांना राहायचा
कंटाळा आला होता. पण माईला काय वाटेल असा विचार करून सग्ळे गप्प होते. मग
माईंनी या गोष्टीला एका रात्री तोंड फोडलं. जेवणं झाली होती. अंथरूणं
घालण्याचं काम चालू होतं. तेवढ्यात माई म्हणाल्या," ज्यांना कुणाला राहायला
जमत नसेल त्यांनी आपले वेळेवर निचा. आम्ही काय ते दिवस वगैरे जमतील तसे
करू. " पण अजूनही कोणी जाण्याचे नाव घेईना. माईना कळेना काय कारण असावं ?
मग त्यांच्या डोक्यात विचार चमकला. " मृ त्यु प त्र " बापरे ! विचारासरशी
त्या केवढ्या दचकल्या. मृत्युपत्रासाठी तर सगळे थांबले नाहित ना ? आता
तात्याच्या मुलांच्या परिक्षा नाहित वाटतं ? "

(क्र म श: )                         (पूर्व प्रकाशनः  मीमरठीं. नेट/ नोड/४९६७)