गोष्ट जुनीच ...माणस नवीन (भाग ...३)

तात्याची गाडी असल्याने नाशिकला जाऊन ते अस्थिविसर्जन करून आले. अधून मधून पाटील येतच होते. आज बाबासाहेवांना जाऊन सहा दिवस झाले. सहज म्हणून पाटील तात्याला म्हणाले, " तात्या, मी विचारणं बरं न्हाई, पन बाबासाहेवांनी काही विल वगैरे केलं होतं का? " (एरव्ही इंग्रजी न येणाऱ्या पाटलांना "विल" हा शब्द माहीत होता)माई आतल्या खोलीत होत्या. त्यांनी कान टवकारले. तात्या म्हणाला, " मी वाडेकर वकिलाशी बोललोय, त्याच्याजवळ मृत्युपत्राची मूळ प्रत आहे. दिवस होऊन गेले की तो येऊन वाचून दाखवेल. त्यालापण माईला भेटायचंच आहे. बारावा तेरावा झाला की लगेचच त्याला यायला सांगतो, म्हणजे फार दिवस इथे राहावं लागणार नाही. "

"म्हणजे तू लगेच जानार की काय, तू महिनाभर तरी राहायला हवंसं, माईला पण काही दिवस सोबत होईल. " पाटील मध्येच म्हणाले.

तात्या म्हणाला, " छे, हो, मुलांच्या परीक्षा आहेत. मी तर तेरावा झाला की एक दोन दिवसात निघणार आहे. " बोलणं तेवढ्यावरच थांबलं,

पाटील गेले. पियुष आणि जीवन पण तिथेच होते, पण ते काहीच बोलले नाहीत. माईच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. ती अस्वस्थ झाली. माईला ते दोघेही जास्त लबाड वाटत होते. तात्याला थोडी तरी माया होती. शर्मिलाचा विचार करण्यात अर्थच नव्हता. तारा जरा बरी होती.परस्पर काम कसं होईल असं पाहणारी होती. पुन्हा कोणी काही बोलले नाही.

आज दहावा दिवस. घरातले सगळेच नदीवर आले होते. पाटलांबरोबर काही गावातली मंडळी पण होती. तात्या आणि शशांक या दोघांनीच फक्त केस कापले होते. भटाच्या पोराची लगबग चालू होती. विधीनुसार पि ड तयार झाले. ते टळटळीत उन्हात त्याने कावळ्यांना दिसतील असे ठेवले. काही पिंडांवर पिवळे झेंडे लावले होते. मधल्या पिंडावर मात्र झेंडा नव्हता. मग भटाचा पोरगा बाजूला झाला आणि पारावर बसलेल्यांमध्ये येऊन तो उकिडवा बसला. नंतर तो आपल्या हुकमी स्वरात म्हणाला, " अजाबात कालवा कराचा नाही. पोरांना जवळ पाठवू नका. म्हणजे कावळे लवकर येतील. "माई थोड्या अंतरावर तोंडात पदर धरून होत्या. त्या म्हणत होत्या. असली वेळ सगळ्यांवर येते. पण आपल्याला एवढी भीती का वाटत्ये?. कावळा शिवला नाही तर? सबंध गावभर बोभाटा होईल. परत भटाच्या पोराचा आवाज आला, "मधल्या पिंडाला कावळा शिवल्याशिवाय सुटका नाही. बघा, मृतात्म्याची काही इच्छा अपुरी असल्यास विचार करून ठेवा. ती पुरी करण्याचं आश्वासन द्या. बघा,  बाबासाहेबांचा जी कोणामध्ये अडकला असेल, आठवा. "..........

उन्हाची तीव्रता हळू हळू जाणवू लागली. नदीकाठ असल्याने वारा वाहत होता. आता अगदी शांतता झाली. नदीकाठावर दुसरं कोणीही नव्हते. काही वेळापुरता वाहणारा वाराही थांबला. अचानक दोन तीन कावळे नुसतेच पिंडांवर झेपावले आणि दुसऱ्या एका वडावर जाऊन बसले. तात्या उपरणं पांघरून बसला होता. निशी आणि रचना माईंजवळ होते. शर्मिला पारावर बसली होती. पियुष, जीवन, तारा, शशांक घोळका करून पारावर उभे होते. गावातली मंडळी पण आपापले गट करून आजूबाजूला घुटमळत होते. सरला मात्र एकटीच एका बाजूला उभी राहून डोळे पुशीत होती. शर्मिलाने तिच्याकडे पाहिलं आणि स्वतःशी पुटपुटली, " फुकट खाऊ सरला, निष्कारण पैशात होणारी भागिदारीण. हिला कुठे तरी धडा मिळालाच पाह्यजे. " कारण नसताना तिला ती शिव्याशाप देत होती...... कावळे आजूबाजूचे पिंड चोचीने मोडू लागले. पण मधल्या पिंडावर बिलकूल झेपावत नव्हते. तेवढ्यात पाटील तात्याजवळ आले आणि म्हणाले, "

अरे, बाबासाहेबांना सरलाची काळजी असनार. तिची काळजी घेयाचं तेवढं बोला म्हंजी शिवल कावळा. मधल्या पिंडाभोवती त्यांचा देह फिरतोय ना रे बाबा, मं ग कस शिवल कावळा? ".... शर्मिला सावध झाली. ती तात्याच्या कानात कुजबुजली, " अजिबात काही बोलू नका. बाकीचे आहेत तिचं सगळं करायला. जरा ऐका. नाहीतर, व्हाल पुढे. तात्याच्या मनात खरं तर असच होतं. पण त्याने शर्मिलाला जास्त नाराज न करण्याचं ठरवलं. थोडावेळ पुन्हा शांतता.... कोणीच पुढे जाऊन बोलायला धजेना. सरला आपल्या गळ्यात पडली तर? तिचं लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या (? ) त्या कोण निभवणार? शर्मिलाच्या मनात आलं. मुंबईचे लोक तसेही बदनाम. कशाला आपण काही बोला.

कोणीच काही बोलेना शांतता बोचू लागली... ̮.. ̮लांबून येणारा लोहाराचा घण तेवढा आवाज करीत होता. बाकी सगळं चिडीचूप....

नंतर काय झालं कोण जाणे. कधेच एकदम वारा सुटला. वडावर्चे दोन चार असलेले कावळेही उडून गेले. भटाचा पोरगा अस्वस्थ झाला. बारा वाजायला पंधरा मिनिटं होती. त्याच्या पोटात कावळे कोकलू लागले. चहाच्या पाण्याशिवाय सकाळ पासून पोटात काहीच गेले नव्हते. त्याने आशेने तात्याकडे, मग पियुष आणि जीवनकडे पाह्यले. कोणीच हालचाल करीना.......

मग मात्र माई तोंडांत पदराचा बोळा कोंबून पुढे झाल्या. आणि दूर गेलेले कावळे कलकलाट करीत परत वडावर आले. ते पाहून, परमेश्वरी लीला अगाध असल्याचे प्रत्यंतर आल्याने, पाटलांनी आकाशाकडे पाहून हात जोडले. माई पिंडांपुढे गुडघे टेकून बसली. तिने एकदा आपल्या मुलांकडे पाहिले. आणि मग ती जरा मोठ्या आवाजातच निश्चयाने म्हणाली, " सरलाची, शशांकची अजिबात काळजी करू नका, मी सगळं करीन त्यांच्यासाठी, तेही स्वतःच्या बळावर. मग इतका वेळ दाबलेला हुंदका त्यांना फुटला. तिच्या आवाजानंतर कावळ्यांना कळलं, की मृतात्म्याला, कोणास ठाऊक, पण दोन कावळे झेपावत आले आणि मधला पिंड मोडून परत वडावर जाऊन बसले. भटाचा पोरगा पुढे होऊन माईंना आधार देत म्हणाला, " माई, शेवटी तुम्हीच जबाबदारी घेतलीत, त्यामुळे हे शक्य झालं., बाकीच्यांनी म्हटलं असतं तर कावळा शिवला असता की नाही, माहीत नाही. त्यांना पारावर बसवून तो पुढे म्हणाला, " चला आपलं काम झालंय, सगळ्यांनी तिलांजली द्यायची आहे आणि मग घरी जायचंय. " असं म्हणून तो तिथेच पारावर ताम्हण घेऊन बसला. तिलांजली साठी रांग लागली.....

घरी आल्यावर तो दिवस तसाच गेला. रात्री बाबासाहेबांची बहीण म्हणाली, " दिव्या भोवतालच्या रांगोळीत म नुष्य कोणत्या योनीत जन्म घेणार त्याप्रमाणे त्या त्या प्राण्याच्या पायाचे ठसे दिसतात. म्हणून प्रत्येक जण मग ठसे पाहू लागला. आणि अर्थ लावू लागला. पियूष म्हणाला, " आता मृतात्म्याला अस्थीही पोचल्या आहेत. त्याचं कुठेतरी फॉर्मेशन झालं असेलच. " माईंना ते आवडलं नाही.

गेलेल्याची चेष्टा करणं बरं नाही. पण त्या काहीच बोलल्या नाही. एक प्रकारचं गूढ वातावरण निर्माण झालं. आत्याबाईंच्या म्हणण्याप्रमाणे कोणाला कुत्र्याच्या पायाचे, तर कोणाला गायींच्या पायाचे, तर कोणाला घोड्याच्या पायाचे ठसे दिसले. माईंनी मात्र तिकडे जाऊन पाहण्याचं टाळलं, न जाणो, या गोष्टी खऱ्या निघाल्या तर.......?

बाराव्या तेराव्याला जवळ जवळ सगळा गावच जेवायला होता. पाच एकशे पान झालं. पाटलांचा मुलगा मात्र त्या दिवशी झिंगूनच जेवायला बसला होता. त्याने वाढायला आलेल्या सरलाचा हातच धरून ठेवला आणि " आय लव यू "म्हणाला. जेवायला आलेले सगळे प्रतिष्ठित लोक पाहत राहिले. मग पाटील ओरडले तेव्हा कुठे त्याने सरलाचा हात सोडला. सरला आत जाऊन बसली ती बाहेर आलीच नाही. हे एक सोडलं तर, बाकी सर्व कार्यक्रम (? ) ठीक झाला. तो दिवस गेला तरी कोणी जाण्याचे नाव घेईना. तात्याने वकिलाला फोन केला तो संध्याकाळी येणार होता. सगळे नेहमीप्रमाणे वागत होते. पण माईंना त्यात लबाडी वाटली. संध्याकाळी सहाच्या सुमारास वाडेकर आला. बरोबर पाटील होतेच. आता मात्र पाटलांचं येणं कोणालाच आवडलं नाही. पण बोलणार कोण?. मग वाडेकरनीच खुलासा केला.

"एक जबाबदार साक्षीदार म्हणून मी यांना आणलंय. यांच्या हजेरीतच मी हे 'विल ' वाचणार आहे. थोडावेळ थांबून त्याने तात्याला विचारलं.

" आले का सगळे? म्हणजे घरातले. " आली नाही ती फक्त सरला. " सरलालाही घेऊन या. " वकील म्हणाला.

झोपाळा लावला असल्याने, पाटील आणि वाडेकर झोपाळ्यावर बसले. दिवाणखान्यात कमालीची शांतता पसरली.शर्मिला कान टवकारून बसली. तात्या आणि पियूष यांना फारसा रस नव्हता. काही मिळालं अन नाही मिळालं तरी त्यांना चालणार होतं. पण जीवन, तारा आणि शर्मिला यांना अपेक्षा होत्या. निशी आणि रचना तिथेच घुटमळत होती. विल वाचायला प्रारंभ झाला............

" मी बाबासाहेब शिंत्रे पूर्ण विचारांती असे सुचवितो की, माझ्या नावे असणारी खालील मिळकतीची वाटणी पुढीलप्रमाणे करावी :

१) माझ्या तीन बँकांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींची वाटणी सरला, शशांक आणि तात्या यांच्यात सारख्या प्रमाणात वाटवी. एकूण मुदत ठेवीची रक्कम रू. ७, ००, ०००/-

२)देवस्थानची शिंतरी येथील जमीन फक्त शशांकच्या नावे ठेवावी. व देवस्थान साठी विश्वस्त मंडळ बनवावे. ज्यात घरातील सर्व पुरुष व चंद्रकांत पाटील असतील. देवस्थानच्या उत्पन्नातील तिसरा हिस्सा जिंदगीभर माईला मिळावा व नंतर पियुषच्या मुलांना मिळावा.

३) घरातले परंपरागत दागिने मात्र माई सोडून सर्व सुनांनी सारखे वाटून घ्यावेत. किंमत रु. ४, ००, ०००/-

४) वाड्याची मालकी त्यालाच मिळावी जो माईला शेवटपर्यंत सांभाळील.

५)निशी आणि रचना यांना घरामागील बागेचा भाग विकून येणारी रक्कम सारखी वाटून त्यांच्या लग्नामध्ये देण्यात यावी.

६)सरलाची जबाबदारी पूर्ण पणे तात्याने घ्यावी.

(क्र म शः )