महिदासाचा हात धरून इतरा नवीन क्षेत्रावर आली. एक पर्णकुटी उभारण्यापासून सगळी सुरुवात करायला हवी होती, महिदासाचा इवला हात आता तिची शक्ती झाला. लवकरच ती जमीन तिने लागवडीखाली आणली. झाडं तिच्या हातच्या घागरभर पाण्यासाठी आसुसलेली असत. हात अक्षरशः हिरवा होता. बी नुसतं फेकलं तरी रुजून येत होतं. तिची शेते विलक्षण यशस्वी होत होती. दरवर्षी गाड्या भरभरून धान्य आणि इतर वस्तू ती आश्रमात पाठवत असे. पण त्या गाड्यांमधुन एक साधा खुशालीचा निरोप किंवा साधी शौकशीसुद्धा परत यायची नाही. महिदास बिचारा हिरमुसला होऊन जायचा. पण इतरा त्याची समजूत घालायची. आचार्यांबद्दल कुठलीच वाईट भावना नाही येऊ दिली तिने महिदासाच्या मनात. ती म्हणायची, त्यांनी बेघर केले नाही. हक्काचे छप्पर माथ्यावर तर दिलेय ना! आणि ही धरती आई आहे तुझी माझी. ती कधी दूर लोटणार नाही आपल्याला.....
असे काही दिवस उलटले.युवराज जानकीर्तीचा राज्यारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. आचार्यांना तिथे अतिशय मानाने आमंत्रित करण्यात आले होते. आचार्य, द्वितीया, मुलं सगळे तिथे अगदी अभिमानाने मिरवत होते. महिदासानेही इतरेकडे हट्ट केला समारंभाला जाण्याचा. नाइलाजाने तिने संमती दिली. समारंभात आहेर म्हणून काही उत्कृष्ठ वस्तू पाठवायलाही ती विसरली नाही. आणि युवराज जानकीर्तीने दिलेली मुद्रिकाही तिने महिदासाबरोबर दिली. गरज पडली तरच वापर म्हणाली. महिदास समारंभाच्या स्थळी पोचला. रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य समारंभ होणार होता. जिकडेतिकडे गजबज,लगबग,घाईगर्दी होती. चौकशी करत करत महिदास वडिलांच्या उतरण्याच्या ठिकाणापाशी पोहोचला. अतिशय आनंदून त्याने वडिलांना हाक मारली. त्याला उत्तर घुश्श्यातच मिळाले..."तू?इथे कशाला आला आहेस?तुझ्यासारख्याचं इथे काय काम आहे? समारंभ पहायचा असेल तर लांबून पहा. आणि इथून चालू लाग. कोणी नाव विचारलं तर माझा मुलगा आहेस असं सांगू नकोस..." संतापाने डोळ्यातून अश्रूंचे मोठेमोठे थेंब गळत असलेल्या अवस्थेत ताडताड चालत महिदास घरी आला....
त्याला येताना इतरेने लांबूनच पाहिलं. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. अपमानाने प्रक्षुब्ध बालमन झालेल्या अन्यायाची तिच्याकडे दाद मागत होतं. इतरा कळवळली. तिच्याबद्दल असलेला राग ती साजू शकत होती पण प्रत्यक्ष पोटच्या मुलाशीही अशी वर्तणूक? तिने क्षणात सारी परिस्थिती ओळखली. महिदासाला विद्येविना, अशिक्षित राहू द्यायचं नाही अस तिने ठरवलं. ती स्वतः त्याची गुरू झाली. शेतावरच्या पर्णकुटीत तिने त्याचं उपनयन केलं. त्याला विद्या देण्याचं काम ती करू लागली. शास्त्रांचा अभ्यास पूर्ण केल्यावर तिथेच न थांबता त्या दोघांनी कृषीविद्येचा अभ्यास सुरू केला. धरणीची उपासना तिने आरंभली. निसर्गाच्या सान्निध्यात सूक्षातिसूक्ष्म तत्त्वांचे ज्ञान त्यांना होऊ लागले.वनस्पती कशा रुजतात, कशा वाढतात,पाऊस कसा पडतो वगैरे गोष्टींचे संपूर्ण ज्ञान त्यांना मिळू लागले. धरणीमातेच्या कृपेने आणि इतरामातेच्या आशीर्वादाने महिदासांना भूमीचे सात स्तर, त्यांची संरचना, त्यांच्यातील विविध घटकांचे परस्परावलंबन वगैरे गोष्टींचे ध्यानमग्न अवस्थेत प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यांचे ज्ञान सिद्ध आणि प्रयोगसाध्य बनले. या ज्ञानसाधनेत मग्न असलेल्या त्या दोघांनाही कळले नाही की काळ कुठे आणि कसा निघून जात होता...