जर तसे झाले असते तर...

खरेतर 'जर' आणि 'तर' याला काही अर्थ नसतो. पण तरीही हे जर-तर विलक्षण हुरहुर लावून जातात. कारण जर तसे घडते तर जगाचा इतिहास बदललेला दिसला असता, अनेक संदर्भ बदलले असते.


डंकर्क ला कैचीत सापडलेल्या तीन लाख पस्तीस हजार दोस्त सैन्याला फ़्यूरर ने जर जाउ दिले नसते तर आज जगाचा नकाशा फ़ार वेगळा दिसला असता. बेफ़ाम पॅझर्स का थांबले आणि लुफ़्त्वाफ़ेने झडप का घातली नाही हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कुणी या मागे गुडेरिन आणि गोअरिंगच्या श्रेष्टत्वाची चुरस हेही कारण सांगतात. पण जर नाझी सैन्य त्या वेळी डंकर्क वर एकवटले असते तर... तेव्हा नेमके हेच दिवस होते. ३० मे ते चार जून. आज त्याला साठ वर्षे झाली.


आज हे सर्व आठविण्याचे आणखी एक कारण म्हणजे आज १ जून. आजपासुन बरोब्बर ७५ वर्षांपूर्वी एक सनसनाटी घटना घडणार होती पण दुर्दैवाने तसे घडु शकले नाही. जर तसे घडते तर हिंदुस्थानच्या क्रांतिचा इतिहास वेगळाच लिहिला गेला असता. सरदार भगतसिंह व सुखदेव लाहोर येथे तुरुंगात होते आणि त्यांना फ़ाशी होणार हे निश्चित होते. आपले जिवलग साथी असे अडकून मृत्युच्या प्रतिक्षेत असताना सेनापती स्वस्थ बसणे शक्य नव्हते. भैयाजी, भगवतीचरण, वैशंपायन, यशपाल, छैलबिहारी, मदनगोपाळ, कैलाशपति वगैरे एच.एस.आर.ए च्या भूमिगतांनी भगतसिंह व सुखदेव यांच्या सुटकेचा धाडसी बेत आखला. कानपूर येथून दोन बॉम्ब बनविण्याचे साहित्य लाहोरात आणले गेले. एक टॅक्सी व ती हाकण्यासाठी विश्वासू चालक टहलसिंग असा सर्व इंतजाम करण्यात आला. भगतसिंह व सुखदेव तेव्हा बोर्स्टल तुरुंगात होते व त्यांना लवकरच सेंट्रल जेल मध्ये हलविण्यात येणार असल्याची पक्की खबर होती. सेंट्रल जेलमध्ये जायच्या आत सुटका करायचे ठरले - दि. १ जून १९३० हा दिवस ठरवला गेला.


आणलेल्या सामग्रीचे बॉम्ब बनवीले गेले. मात्र त्यांची कसोटी झाली नव्हती. काहींच्या मते सामग्री व सूत्र हे सिद्ध झालेले असल्याने परिक्षणाचा धोका पत्करून शिवाय कालापव्यय करण्यापेक्षा थेट कृतीच करावी असे होते. मात्र भगवतिचरण व भैयाजी यांना या जोखमीच्या कामात असलीही हयगय होउ द्यायची नव्हती. २८ मे रोजी भगवतिचरण, यशपाल, मदन इत्यादी लोक बोट क्लब वरून एक नाव भाड्याने घेउन रावी नदीच्या पलीकडील तीरावर दाट झाडी असलेल्या भागात गेले. तेथे एका खोल खड्ड्यात बॉम्ब चा परिक्षा स्फ़ोट करायचे ठरले. मात्र बॉम्बची पिन थोडी सैल असल्याचे वैशम्पायन यांच्या लक्षात आले. त्यांनी ते भगवतिचरण यांना सांगीतले व परत फ़िरून उद्या दुसरा बॉम्ब आणुन परिक्षा करण्याचे सुचविले. मात्र १ जून ला जर कृति करायची तर २८ मे हून अधिक उशीर करणे भगवतिचरणांनी साफ़ नाकारले. मग किमान तुम्ही स्वतः न करता आम्हाला स्फ़ोट घडवू द्या अशी विनंती त्यांना वैशंपायन यांनी केली. मात्र भैयाजींनी सर्वांची जबाबदारी माझ्यावर दिली असल्याने तो स्फ़ोट मी स्वतःच करणार असे भगवतीचरण यांनी निक्षून सांगितले. भगवतीचरण बॉम्ब घेउन एकटेच पुढे खड्ड्याचे दिशेने निघाले. त्यांनी पिन काढली आणि बॉम्ब फ़ेकायला हात उंचावला तोच त्या बॉम्बचा प्रचंड स्फ़ोट झाला आणि भगवतिचरण यांच्या देहावर असंख्य जखमा झाल्या. एक हात कोपरापासून उडाला तर एका हाताची बोटे गेली, आतडी पोट फ़ाडून बाहेर आली. हादरलेल्या साथीदारांनी त्यांना वाचवाची खूप धडपड केली पण अखेरीस सूर्यास्तापूर्वी भगवतिचरण यांना वीरमरण आले.


एक अमूल्य मोहोरा तर हरपलाच पण १ जून चा बेतही बारगळला.