उषःकाल होता होता.....

उषःकाल होता होता.....

एक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...

शाळेच्या समूहगीत स्पर्धेत ९वी (ब) तर्फे आम्ही हे कळकळीने गायलो होतो. साहित्य, संगीत, कला, आपले सामाजिक अन राजकिय प्रश्न, यांची जस-जशी जास्त ओळख होत गेली तस-तसे या गाण्याचा खोल अर्थ उलगडत गेला. त्यामुळेच की काय सरांनी हेच गाणे आमच्यासाठी निवडले असावे. मिळालेले बक्षिसाचे तब्बल २५ रू. दर-गुरूवारी दत्तांचा वार साजरा करण्यासाठी लागणारया खर्चासाठी वापरण्याचा मास्तरी आदेश लगेच मिळाला ही गोष्ट वेगळी.

"आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.......उषःकाल होता होता, काळरात्र झाली"

गझल सम्राट सुरेश भट यांचे वास्तवाची जाणीव करून देणारे जळजळीत प्रखर शब्द, १९८० च्या सुमाराची ही ज्वलंत चाल अगदी अलीकडील वाटावी ही पं. हृदयनाथ मंगेशकर यांची संगीती-जादू आणि आशाताईंचा थेट काळजाला साद घालणारा आवाज, यामुळे हे गीत फक्त गाणे किंवा कलाकृती नाही तर एक ’सामाजिक सत्य’ व ’विचार' म्हणून त्याच्या कर्त्यांनी पेटविलेल्या मशालीच्या रूपाणे मराठी मना-मनांत कायम तेवत राहिल.

बाबूजी (सुधीर फडके), गदिमा, राजा परांजपे आणि असे अनेक थोर प्रतिभावंत...यांच्या वैभवी परंपरेला जपणारया ह्या दिग्गजांच्या कारकीर्दिचे कधी-कधी आपणही जिते-जागती साक्षीदार झालो, ही देखील आपली पूर्व-पुण्याईच नाही का?

सुनील चोरे - पुणे, (बेल्हे)
sunilchore@gmail.com