ह्यासोबत
पुढे मग फारसा वेळ लागलाच नाही. मिळणाऱ्या पैशांच्या एकूण अंदाजानं की काय, दिवेकरनं स्वतःला अक्षरशः जुंपून घेतलं होतं. जुनं फिलॉसॉफी डिपार्टेमेंट रंगरंगोटी करून, नव्या फर्निचरसकट आधुनिक काळातलं हे शैक्षणिक आव्हान पेलण्यासाठी उभं राहिलं. दिवेकरची कल्पना मूर्त स्वरुपात येत होती.
त्याला स्वतःला अर्थात अनेक आघाड्यांवर एकहाती लढायला लागलं होतं. प्रेस, प्रसारमाध्यमवाले यांना ही कल्पना नवीन होती; पण एकदा गळी पडल्यावर त्यांनी ती चांगलीच उचलून धरली. एक पंधरा मिनिटाची छोटी फिल्मही दिवेकरनं सीडीवर आणली होतीच. www.pavtology.com वेबसाईटचं उद्घाटनही त्यानं शिक्षणचुडामणींच्या खास ओळखीमुळं थेट शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते घडवून आणलं होतं. गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश कसा जमणार या प्रश्नाचं उत्तर शिक्षणमंत्र्यांनीच दिलं होतं. 'नेट' लावून प्रयत्न केला की सगळं जमतं, असं भाषणात सांगून त्यांनी टीकाकारांची तोंडं बंद केली होती.
दिवेकरनं सगळ्यात जास्त लक्ष घातलं होतं ते अभ्यासक्रम तयार करण्यावर आणि 'मानद प्राध्यापकां'च्या नेमणुकांमध्ये. थियरीसाठी त्यानं पहिल्या वर्षी सहा विषय ठेवले होते. त्याचं गेल्या अनेक वर्षांचं विविध जागांवर - पानाचे ठेले, शहरातल्या विविध भागांतले चौक, साजरे होणारे उत्सव, शैक्षणिक संस्थांच्या बाहेरची दुकानं - केलेलं निरीक्षण आता कामी येत होतं. त्यावरून त्यानं केलेलं मनन आणि चिंतन यांतून अभ्यासक्रमाचे थिअरी आणि प्रॅक्टीकलचे विषय तो पक्के करू शकला होता. कोर्स सुरू असताना विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयुक्त ठरेल अशा 'इंटर्नशिप' साठी त्यानं विविध 'चौकां'तल्या अनौपचारिक संघटना, नवनवी उत्सवी फॅडं समाजात रुजवू पाहण्यासाठी स्थापन केलेली अस्थायी मंडळं, स्वयंचलित वाहनचालक (भाडोत्री) संघर्ष समिती अशा काही दिग्गजांकडं विचारणा केली होती. त्यांचा प्रतिसाद तर कल्पनेपलीकडे सकारात्मक होता.
बघता बघता प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी' चं पहिलं शैक्षणिक वर्ष दिमाखात सुरू झालं. सीटस केंव्हाच 'फुल' झाल्या होत्या. थिअरीच्या विषयांपैकी फक्त 'उद्योजकता विकास' हा एकच विषय दिवेकर सरांनी स्वतःकडे ठेवला होता; आणि त्याला कारण होतं. त्यांचे कैक मित्र 'मांडवली', 'पैसे वसुली', 'कंत्राटी पद्धतीने मारामाऱ्या' आदी व्यवसायांमध्ये होते. सर मूळचे उद्योजक असल्यामुळे -आधी या विषयांशी, व्यवसायांशी त्यांचा व्यक्तिगत पातळीवर घनिष्ट परिचय होऊन, मग त्यातले हे उद्योजक, कालांतराने सरांचे मित्र झाले होते.
इतर वर्गांवरही दिवेकर सरांचं बारकाईनं लक्ष असे. वर्गात घडणाऱ्या काही विचारप्रवर्तक गोष्टींमधून आपल्या शिक्षणक्रमाची समाजातली गरज त्यांना अनेकवेळा जाणवे. उदाहरणार्थ, थिअरीतलाच एक महत्त्वाचा विषय प्रा. आंजन टोकरे हे शिकवत. 'जनसंपर्क- पोलीस, राजकीय व्यक्ती तसेच प्रतिस्पर्धी संघटनांशी सुसंवाद' असा तो विषय होता. प्रा. टोकरे त्यांच्या ऐन उमेदीच्या दिवसांमध्ये एका व्यावसायिक समाजहितरक्षक संघतनेत 'डेंजर टोकऱ्या' या व्यावसायिक नावाने सुपरिचित होते. अशाच काही सामाजिक महत्त्वाच्या वादांतून एका समाजविघातक घटकाचा त्यांनी कायमचा निकाल लावला. या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या संपूर्ण भोजन आणि निवासाची जबाबदारी चौदा वर्षे सरकारने उचलली होती. त्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तथापि मानद सल्लागार या नात्यानं अजूनही त्यांचा या क्षेत्रातील विविध संघटनांशी संपर्क होता.
तर असे हे टोकरे सर, वर्गात तन्मय होऊन विषय मांडत असताना सहजच पण अचानक त्यांचं लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेलं. त्यांनी एक डोळा बारीक करून त्याच्याकडे नीट पाहिलं, आणि फर्मावलं, "तू.... रे - उठ, उभा राहा. " विद्यार्थी उभा राहिला.
"परिमलच्या गँगला लागला होता ना तू कामाला? मग परत कुठं आला इथं एबीसीडी शिकायला, आं? "
"लागलो होतो सर... प्रॉब्लेम झाला. यादवाड गँगवाले आमचे रायव्हल. त्यांचा एक पंटर लोनली जाताना सापडला. ऱ्हाववलं नाई. मजबूत टोले टाकले. परिमलदादा पार सटकले. चार गोष्टी कामाच्या शिक, आन ये म्हनले. फी पन त्यानीच भरली. मग आलो स्ट्रेट इथं"
सरांनी समंजसपणे मान हलवली. "पाहिलंत, भिडू लोक... डोकं सटकलं ह्याचं, आन निस्तारायला कुनाला लागलं? ह्येच्या परिमालदादान्ला. जनसंपर्कात आसं पर्सनल घेऊन चालत नाही. दादाला, भाईला.. जो कोण मेन असेल त्याला विचारल्याशिवाय आंगावर हात टाकायचा नाई... काय समजलेत? " विद्यार्थ्यांनी माना हलवल्या. "बैस आता खाली. सांग परिमलला. मी हाये इकडं टीचिंगला म्हनून. "
"सांगतो सर. आजच टपरीवर गाठून सांगतो. "
राऊंड घेत असलेले दिवेकर सर बाहेर थबकून ऐकत होते. ते समाधानानं पुढं निघाले.
थिअरीपैकीच 'मंडळे व संघटनांचे अर्थकारण व बदलते प्रवाह' हा विषय शिकवण्यासाठी खुद्द शिक्षणचुडामणींनी स्वतः आग्रहानं दिवेकरकडं मागून घेतला होता. त्यांच्या आजवरच्या प्रवासाला तो विशेष जवळचा होता. त्यामुळे या विषयाबद्दल सर्वाधिक कळकळ, आस्था आणि अनुभवही त्यांनाच होता.
"दुसऱ्याच्या मालकीची 'जल-जंगल-जमीन' ही त्रिसूत्री ज्याला हिसकावून घेता आली, तो जिंकला" ते विद्यार्थ्यांना सांगत. "मग ते आपल्या मंडळाच्या ऑफिससाठी चोरून काढलेलं पाण्याचं कनेक्शन असेल किंवा होळीसारख्या सणासाठी बिनदिक्कत तोडलेली टेकडीवरची झाडं असतील, किंवा संस्थेच्या वापरासाठी हडप केलेली सार्वजनिक किंवा व्यक्तिगत जमीन. "
याचं उदाहरण देताना त्यांचा कंठ स्वाभिमानानं रुद्ध होई. "आपल्याच कँपसचं पाहा. ही टोलेजंग इमारत आज दिसतेय तुम्हाला- पण या बाळासाहेब कलंत्र्याचा लढा नाही दिसत! काय होतं इथं आधी? नागरिकांनी 'रिकामटेकडं' फिरण्यासाठी राखलेली एक टेकडी, आणि शे-दोनशे झाडं! आठ आठ वर्षं पर्यावरणवादी, महानगरपालिका सगळ्यांना टांगलं, तेंव्हा कुठं ही निर्मिती झाली. " भावी पावटे हे कानात प्राण आणून ऐकत.
(क्रमशः)