होऊ अर्जुन एकदा पुन्हा

अंधाराची सबब कुठवरी

पुळचट भावे सांगायाची ?

प्रकाश जर हवा मुखावरी

सन्मुख सूर्यासी व्हायाचे ॥

सूर्य कधी उगवेल तयाची 

वाट कशाला पाहायची ?

रेषा उल्लंघुनी क्षितिजाची

झेप नभांगणी घ्यायाची ॥

सूर्य ! सूर्य तो दिवा नव्हे

तेल संपता विझणारा ।

पुरुषार्थाने स्वयंसिद्ध तो

हनुमंतही तेथे होर्पळला ॥

जमतिल घन वांझोटे हट्टी

तम-नशेत बेधुंद जरी-

प्रभंजना आमंत्रण द्यायाचे

पुनरपी तेजात नहायचे ॥

की वाटते ना ग्रहण लागले

धर्मरविला पाखंड्यांचे ?

नव्या मनूला पुढे करोनी

साऱ्या दैत्या पळवायाचे ॥

मनगट आणि मनास अपुल्या

नवचैतन्याची तृष्णा _

मरगळ झटकुनी जुनी पुराणी

होऊ अर्जुन एकदा पुन्हा ॥