अंधाराची सबब कुठवरी
पुळचट भावे सांगायाची ?
प्रकाश जर हवा मुखावरी
सन्मुख सूर्यासी व्हायाचे ॥
सूर्य कधी उगवेल तयाची
वाट कशाला पाहायची ?
रेषा उल्लंघुनी क्षितिजाची
झेप नभांगणी घ्यायाची ॥
सूर्य ! सूर्य तो दिवा नव्हे
तेल संपता विझणारा ।
पुरुषार्थाने स्वयंसिद्ध तो
हनुमंतही तेथे होर्पळला ॥
जमतिल घन वांझोटे हट्टी
तम-नशेत बेधुंद जरी-
प्रभंजना आमंत्रण द्यायाचे
पुनरपी तेजात नहायचे ॥
की वाटते ना ग्रहण लागले
धर्मरविला पाखंड्यांचे ?
नव्या मनूला पुढे करोनी
साऱ्या दैत्या पळवायाचे ॥
मनगट आणि मनास अपुल्या
नवचैतन्याची तृष्णा _
मरगळ झटकुनी जुनी पुराणी
होऊ अर्जुन एकदा पुन्हा ॥