दर्भाचा कावळा
क्षीण हालचाल करायलाही त्रास होतोय.... हा हात.. अरे बापरे हालवतं नाहीये. वांसतीला मारावी का हाक? हाक मारायला आवाजही बाहेर पडत नाहीये. आली तर बरं होईल. अखिलेश आला की गेला ऑफिसला? आठवेनास झालंय. कुठली वेळ ही सकाळ आहे की संध्याकाळ.?
**************************************
ए आई...... आई कधी येतेय इकडे. कढीची हाक मारतोय. पण ओ नाही वसंता म्हणून परत नाव नाही. असं का करतेय आई पण. कधी आई हवी असली की ती दादाच्या तैनातीला असते नाहीतर अण्णांच्या. मध्येच थांब रे मला किती काम पडलंय. मग येते हं करून कामाला लागते. किती छान फुलपाखरू उडत होते परवा माझ्या हातावर बसले किती मस्त वाटले.. ताईला सांगायला गेलो तर नुसती हो का म्हणून पुढे गेली. दादाला तर काही सांगायलाच नको. नुसते हिडिसफिडीस करतो नाहीतर उडवून लावतो. अण्णांची भीती नाही वाटत पण आई इतके जवळचे नाही वाटत. थोडा दुरावाच वाटतो. का असेल असे? आई सारखे त्यांच्या कुशीत नाही शिरता येत हवे तेव्हा. बऱ्याचदा कामात असतात ते. कुठल्यातरी जड विषयावर आईशी बोलत असतात. आईपण मग अश्या वेळेस बोलत नाही. काही तरी गंभीर तोंड करून बसते. अण्णां खुशीत असले की मग भारी मजा येते. सगळे घर कसे खुशीत असते. मस्त मज्जा... आईची पण मग चेष्टा करतात. जाम हसायला येते आई रागावली की मला. ती तरी कुठे रागावते खरे खरे. खोटे तर रागावते.. मला माहितेय सगळे.
मागच्या आठवड्यात गोट्याने किती छान रंगपेटी आणली. वा नुसती बघायला पण काय छान वाटत होती. खूप आणावीशी वाटली पण आईला दाखवली वाटलं ही म्हणेल काही पण काहीच नाही म्हणाली. अशी जादू असेल मनांतलं सगळं दुसऱ्याला कळण्याची तर काय मज्जा येईल ना.. आईला तर सारे कळेल मला हवे ते. बंड्याला, गोप्याला, मिरिटलील पण कळेल मला काय हवंय ते, मी काय म्हणतो ते. किती छान चित्र येतात मला. मजा येते चित्र काढताना. ढगांचे आकार बदलतात ना सारखे तसे चित्र काढायचे, वेगवेगळ्या आकाराचे. मागचे ढगांचे चित्र किती सुंदर आले होते. अण्णांना दाखवले तर वाटलं म्हणतील अरे वा! काय छान चित्र काढलेस रे. मोठा चित्रकार करूयात याला. पण कसल्या विचारात होते कोणास ठाऊक बघितलं ही नाही नीटसं... जाऊदे आता काढणारच नाही चित्र....
शाळेच्या ट्रीप ला मला जायचे होते. खूप मज्जा करायची ठरवले होते आम्ही सगळ्यांनी. अण्णांना सांगितलं की शाळेची सहल जातेय. बरं मग? अण्णांच्या या प्रश्नावर काही बोलताच आले नाही. मुलं सहली वरून आल्यावर काय काय मजा केली ते सांगत होती एकताना जीव थोडा थोडा होत होता. मनातल्या मनात फार चरफडलो पाठवलं असतं अण्णांनी तर काय बिघडलं असतं. तीच गत नवीन शर्ट घ्यायची. आई म्हणाली देखील होती घेऊयात नवीन शर्ट... राहिलाच नाही चांगला पण मध्येच सुलुच्या फ्रॉकचे आले. तिला जायचे होते आईबरोबर लग्नाला. मग काय तिलाच शिवला नवीन फ्रॉक. माझा शर्ट मनातच राहिलं. सततच हे अस होत आलं. वाटायचं की आपण लहान आहोत म्हणून हे सगळं होतंय. आपण मोठ्ठ झाल्यावर हवं ते करू. आणि आई अण्णां सुलुला ही कळेल आपोआप आपल्याला काय हवंय ते, सांगावंच लागणार नाही.....
गौरी भेटली तेव्हा तर काय सांगू. मनातून काय झाले ते. सारखं सारखं तिच्याशी बोलावेसे वाटायचे. तीपण वाटच बघत असायची. तिच्या मनात काय चालले आहे ते पटकन कळायचे, तिच्या डोळ्यातून, चेहऱ्यावरून. किती धडपडायचो मग तिला द्यायला, करायला. हिरमुसली की नको वाटायचं. नेहमी हसरी, खळखळणारी छान वाटायची. मध्येच वाटायचं आपण इतका जाणतो हिला. हिला कळत असेल का आपल्या मनात काय चालय ते. कधी घरात कोणी रागावले की गाल फुगवून मला सांगायची. तुला कळत रे मी काय म्हणते ते अस वर म्हणायची. अशी रागावली, रुसली, दुखावली की तिचा हक्काचा खांदा मी असायचो. सोनचाफ्याची फुलं आवडायची तिला तर कुठे कुठे जाऊन आणायचो मी ती फुलं. पावसात गेलेलो एकदा भिजत, गौरीला हवीत ती फुलं म्हणून. आई अण्णांचा किती ओरडा खाल्ला त्या दिवशी. अण्णांनी तर रागाने एक फटका सुधा मारला त्या दिवशी. गौरीला कळल्यावर मात्र धावत आली. किती वेळ हळुवार हात फिरवत होती. त्यावेळेस खरं सांगू काय वाटलं ते.. अण्णांनी असच रोज मारावं आणि गौरीने असा हात फिरवावा........ वेड वय आणि वेड्या कल्पना... दुसरं काय. पण इतके एकमेकात गुंतून कधी सांगायचा बोलायचा धीरच नाही झाला. अबोलणे बघत राहिलो कधी कळेल या वेडीला. मला ती किती आवडते ते. पण ते सारं मनातल्या मनातच राहिलं. कॉलेज साठी शहरात गेलो गौरीशी संपर्क बराच कमी झाला. तरी सुट्टी मिळाली की पळायचो गावाला सारखा ती भेटेल म्हणून. तिच्याशी बोलता येईल म्हणून. पण तिला वेडीला वाटत असावे की हा आता शहरात गेला, मोठा होणार आता फार, याचा मित्रपरिवार वाढला असेल, कॉलेज मध्ये नवे मित्र मैत्रिणी मिळाल्या असतील. हाच विचार करत असेल ती बहुदा. कारण मी तिच्याशी बोलायची संधी बघायचो, आसपास रेंगाळायचो तिच्या घराच्या पण ती कधी बाहेर नाही यायची. दिसली तरी नुसती हसून निघून जायची. आणि एका सुट्टीत कळलं गौरीचं लग्न ठरलंय दुभंगून गेलो मनातून. इतक्या वर्ष धीर झाला नाही आता तर कसा होणार. आतल्या आत फाटत गेलो. माझ्या मनातलं कुणालाच नाही का कळणारं? जीव ओवाळून टाकला त्यांनाही नाही ज्याच्या जीवातून जन्मलो त्यांनाही नाही. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर असच होत गेलं. वाटेवरच्या झाडांना ही मी कळलो नाही, गवतालाही नाही की वाटेतल्या दगडधोंड्यानाही नाही, इतकाच काय पण वाटेला सुद्धा नाही. लग्न करण्याची इच्छा मेली. पण आई अण्णांचा आग्रह यामुळे पुन्हा एकदा मनात नसलेलं...... पण करावं लागणार लग्न वासंती बरोबर केलं. वासंती आहे चांगली पण माझ्या मनातल्या त्या कोपऱ्यातली जागा तिने कधीच नाही भरून काढली. तिला नावं ठेवायला जागा नव्हती. अगदी चांगली सून, चांगली आई होती ती पण माझी सखी माझी गौरी कधीच नाही होऊ शकली ती. क्षणोक्षणी हरणारा मी इथेही हरलो होतो.
पुढे तर बरंच मन मारून होत. वाटायचं खूप माझ्या मनातल्या गोष्टी माझ्या माणसांना कळाव्या. न सांगता ही त्यांनी जाणावं पण अस कधीच नाही घडलं कधी. स्वतःच्या इच्छा मारून इतरासाठी जगणार मी एक यंत्र होतो. लहानपणापासून कायम दुसऱ्यासाठीच जगत आलो. माझा स्वतःच अस जगणच राहून गेलं. कधी दैवानेही त्याच दान माझ्या पदरात टाकलं नाही. ऑफिस मध्येही सगळ्या कामात पर्फेक्ट असणारा, कष्टा़ळू असणारा मी माझ्या स्वतःविषयी न बोलण्याने कधीच वर आलो नाही. ज्या पदावर होतो तिथेच राहिलो. अनेक सहकारी आले गेले, मला ज्युनियर पासून सीनियर पोस्ट पर्यंत गेले. पण मला कधी जमलेच नाही साहेबांच्या पुढे पुढे करायला, त्यांची खुशामत करायला. आई दादाला कायम म्हणायची "सगळं करतोस पण बोलून घालवतो".. तो बोलतो म्हणून घालवतो आणि मी?.. न बोलून घालवतो... वाटायचं बऱ्याचदा झुगारावी ही बंधनेपण जगण्याची बंधने झुगारायची कधी हिंमत झाली नाही मी गेल्यावर त्यांचे काय या कल्पनेनेही तसे पाऊल कधी उचलले नाही. मुलांनी कधी फारशे जवळीक नाही केली. कितीदा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला... पण नाही... अखिल आणि निखिल... त्यांच्या बाबतीत वाटायचे आपल्यावर सतत कोणी काही ना काही लादत आले आपण नको कोणावर काही लादायला. पण त्यांनी तरी कधी समजावून घेतले असेल की नाही कोणास ठाऊक. कदाचित घेतले असेल माझी मुले ती बोलून नसतील ही दाखवत कदाचित मनातून वाटतही असेल त्यांना फार. त्यांची ही लग्न झालीत आता दोघ दोन दिशांना गेले. आता घरात फक्त वासंती आणि मी. ती तिच्या व्यापात, कामात. माझ्या साठी द्यायला फार वेळ नाही तिला आणि मी तरी काय बोलू तिच्याशी? बोलायचे विषय तर सगळे बोलून झाले..............
**********************************
वासंतीची अस्वस्थता वाढायला लागली किती दिवस झाले हे असे ग्लानीत आहेत. हालचाल ही करत नाही. सारखं धस्स होऊन बघावं कसे आहेत? श्वास तर चालू आहे मंद. चेहऱ्यावर कसलं दु:ख पिळवटलंय... काय यांना आयुष्यभर मनात होत कोणास ठाऊक? कधी धडधड बोलले नाही, कधी खुलले नाही. त्रास कधी दिला नाही. दुखवलं नाही कधी मला... पण कधी फार जवळ आलेच नाहीत. जवळ असूनही सतत लांबच वाटले मला का मीच नाही समजू शकले त्यांना?.... अग बाई ओठ हालतायेत का यांचे? अहो... काय हवंय? काही म्हणालात का? अरे अखिल.. निखिल बाबा बघ थोडी हालचाल करायला लागले. काही म्हणतायेत का रे ते? ओठांजवळ कान नेला तरी काही कळत नाही.. कुणाला बोलावतायेत का?...
****************************************************
..... गौरी.... ए गौरी ए ये ना चल माझ्या सोबत आता तरी.... इतकं कस हलकं हलकं वाटायला लागलं. शरीर अगदी पिसासारखं हलकं झालंय तरंगतंय...... मघाशी ओठातून शब्द बाहेर जात नव्हता... आणि हे काय वासंती रडतेय? अखिल निखिल सूनबाई, मुलं सगळीच रडतायेत आणि मध्ये हे कोण झोपलंय? अरेच्या हा मीच आहे? म्हणजे... मेलो की काय? म्हणूनच मला इतकं हलकं हलकं वाटतंय. खरंच काय मस्त अनुभव आहे हा. कुणाच बंधन नाही.. अपेक्षांच ओझं नाही.. कर्तव्याच बंधन नाही सगळं कस मुक्त मुक्त.. आता गौरीला भेटता येईल का? तिला कोणी सांगेल का? मला भेटायला ये म्हणून... तिला कळवा रे कोणी तरी..
आता तर काय शरीराचा तो साम्गाडा पण गेलाय. सगळं वातावरण कस गंभीर. वासंतीने तर सकाळ पासून काही खाल्लं नाही. अग खा बाई खा माझ्यासाठी कशाला उपाशी राहतेस? सगळे जमलेत. तिच्या माहेरचे, माझे नातेवाईक.. जातील हळूहळू सगळे.. पांगतील दहावा, तेरावा की संपलं...... अरे दहावा उद्याच की म्हणून सगळे जमायला लागले वाटत. दहा दिवस गेले? किती पटापट जायला लागले. तरी अस बांधल्यासारखे का वाटतेय. गौरी भेटल्याशिवाय नाही मुक्ती मला. सगळा प्राण त्यातच अडकला होता तिथेच तडफडत होता. पण सांगताच नाही आलं. मी ओरडलो कोणाला ऐकूच नाही गेलं. कोणालाच नाही वासंतीला पण नाही. अजून कोणाच्याच लक्षात येत नाही का? दादा ताई सुलू सगळेच आले... दादा ताई तर किती म्हातारे वाटायला लागले... त्यांच्या आधी मी गेलो लहान असून म्हणून शोक करतायेत.... त्यांच्याही स्मृतीतून गेली का गौरी? कोणालाच का आठवत नाही तिला बोलावणे धाडायला... एकदाच फक्त येऊ देत ना तिला. मग होईल मी मुक्त.....
हे काय दहावा सुरू झाला. पिंड पण ठेवलाय.. सगळे वाट बघतायेत मी स्पर्श करायची. घास घ्यायची... पण गौरीला बोलवाना कोणीतरी. येईल ती असेल तशी येईल मला खात्री आहे... किती वाट बाघातायेत सगळे कावळा शिवायची. नानातर्क सुरू झाले वाटतं..... अखिल निखिल ला काय सांगतेय ताई? काय म्हणतायेत ते आम्ही आईला अंतर देणार नाही. तुमच्या पाठी अगदी जपू तिला. अरे वेड्यांनो मला कुठे तशी काळजी आहे तिची मला महितेय तुम्ही कधी दुखावणार नाही तिला. तुमचा फार जीव आहे तिच्यावर. पण गौरीला बोलवा नारे...... भटजीनं काय सांगितले? दर्भाचा कावळा करायला?... अरे हे काय? आयुष्यभर ही माझ्यावर सतत तुमच्या इच्छा लादत आलात आता मरणानंतर तरी यातून सुटका करा. कधीतरी माझ्या मनातले करा. नको रे हे ओझे मेल्यावरही माझ्यावर नको..... नको...