मित्रहो, एक नविन कविता सादर करतोय, आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
आपल्या सूचनांचे नेहमीप्रमाणे स्वागतच आहे.
एकदा एक कवी
मनोगतावर आला
सगळं पाहून एकंदर
भलताच खूश झाला
होत्या गरम चर्चा
शिवाय लेख सुंदर
आणि वर पाककृती
भूक लागलीच तर
पण पाहताच कविता
खुलली त्याची कळी
'जणू शुभ्र कमळ
सुंदर फुलले तळीं'
कविता लहान मोठ्या
आणि काही चारोळ्या
काही दुःखाचे हुंकार
काही प्रेमआरोळया
"लिहीन इथे कविता
आता अगदी मनसोक्त
रसिकवाहवा मिळवीन
करून त्यांना तृप्त"
घाईत मग कवीने
केल्या कविता सात
एक त्यातली 'अश्रू'
एक 'मन तळ्यात'
दोन दिवस कवीने
पाहिली कशीतरी वाट
प्रतिसाद पाहून मात्र
बिचारा पडला चाट
निराश झाला कवी
"असे का व्हावें?
सात कवितांना फक्त
तीन प्रतिसाद यावे?"
तेवढ्यात आला आवाज
"वेड्या तू चुकलास !
लिहिल्यास अशा कविता
तेव्हांच तू फसलास."
"काही अश्लील शब्द
टाक थोड्या शिव्या
कुणाची तरी मारून
म्हण परत भ*व्या"
ऐकून सल्ला कवीने
केली कविता जहाल
सांगितलेला सगळा
ठासून भरला माल
मनाशी म्हटला आता
मेलो तरी बेहत्तर
हाय! पण आश्चर्य -
प्रतिसाद आले सत्तर!
म्हणूनच म्हणतो तुम्हाला,
प्रतिसाद हवेतका खूप ?
बदलून पाहा तुमच्या
कवितेचं साधं रूप !
काही अश्लील शब्द
टाका थोड्या शिव्या
कुणाची तरी मारून
म्हणा परत भ*व्या !
एक वात्रट