सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकणाऱ्यांवर वासोटा या शब्दाची विलक्षण मोहिनी आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी गिरिभ्रमणाला सुरुवात केली तेंव्हा आमची पहिली मोहिम वासोटाच होती, पण प्रत्यक्षात गेलो होतो नागेश्वराला.
सह्याद्रितले बरेच जंगल तुटत चालले आहे, कितीतरी किल्ले तर पूर्ण उजाड असतात, काही किल्ल्यांवर थोडीफार झाडी असते, तर तुरळक किल्ल्यांभोवती एखद दुसरा मैल विरळ रान असते. पण सुमारे पाचशे चौ किमीच्या दाट जंगलात वसलेला वासोटा हा या जंगलामुळेच विशेष आवडता आहे.
शनिवार १७ जुलै, रात्री अकराला निघायचे असे ठरले होते, पण मुंबईचे तीन गडी येऊन निघेपर्यंत रात्रीचे साडेतीन वाजले. मिहिर, कुल, भक्ती, आरती, स्वाती, ईंद्र, नरेश आणि फदी असे नऊ जण पुण्याहून दोन गाड्या घेउन निघालो. साताऱ्याला आत वळलो आणि कास तलावाकडे जाणारा मार्ग पकडला. कासच्या पुढे बारा किमीवर असलेल्या बामणोली गावाला आम्हाला जायचे होते. तिथे जायला साताऱ्याहून सहा वाजता पहिली बस आहे, तर परत यायला साडेतीन वाजता शेवटची बस आहे. त्यामुळे वासोटा एक दिवसात करायचा असेल तर स्वतःची गाडी नेण्याला पर्याय नाही.
हा ती पस्तीस किमीचा दऱ्याखोऱ्यातून जाणारा मार्ग, रस्त्य्ची स्थिती काही ठिकाणी खराब असली तरी आजूबाजुच्या सौंदर्यामुळे अतिशय वेधक आहे. वाटेत एक ऊंच डाँगर आणि त्याच्या माथ्यावर अगदी सलग अशी बुलंद तटबंदी दिसते, आता इथे कुठला किल्ला आला म्हणून आपण नवल करतो, सुदैवाने पुढे रस्ता अगदी त्या माथ्याजवळूनच जातो तेंव्हा लक्षात येते हा डोंगरच असा किल्ल्यासारखा बनला आहे. पुधे असे अजून एक दोन डोंगर दिसतात. कास धरण, सेप्टेंबर मध्ये फुलणाऱ्या अगणीत रंगीबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असे कासचे विस्तृत पठार ओलांडुन पुढे गेलो की कोयनेचा जलाशय दिसू लागतो. महाबळेश्वरला उगम पावलेल्या दक्षिणवाहिनी कोयनेला कोयनानगरला धरण बांधले आहे आणि हे अडवेलेले पाणी महाबळेश्वरच्या पायथ्याला तापोळ्यापर्यंत खोऱ्याखोऱ्यातून घुसले आहे, पन्नास किमी उत्तर दक्षिण लांब असा हा फुगवटा आणि पश्चिमेकडे सह्याद्रीची रांग याच्यामधला चिंचोळा घनदाट जंगलाचा प्रदेश म्हणजे कोयना अभयारण्य. एका बाजूला पाणी आणि दुसऱ्या बाजूला सरासरी चार हजार फूट खोल दऱ्या यामुळे हे अरण्य सुरक्षित राहिले आहे. जंगलाच्या उत्तर टोकाला आहे महाबळेश्वरजवळाचा मधु मकरंदगड तर दक्षिण टोकाला आहे कोयनानगरजवळचा 'जंगली जयगड'. आणि भर जंगलात मध्यावर आहेत वासोटा, नागेश्वर, पर्बत, महिमंडणगड, चकदेव हे किल्ले आणि गिरीशिखरे.
इथे जायचे म्हणजे बामणोली किंवा तापोळा येथून बोटीने शिवसागर पार करणे आणि ट्रेक झाल्यावर पुन्हा बोटीने परत येणे. कोकणातून अवघड वाटांनी पश्चिम बाजूने पूर्ण चढुन येणे हा दुसरा पर्याय.
उजाडता उजाडता बामणोलीला पोहोचलो, वन खात्याची परवानगी, बोट ठरवणे , न्याहारी वगैरे पार पडे पर्यंत सकाळचे नऊ वाजले आणि आम्ही बोटीने वासोट्याच्या पायथ्याच्या मेट इंदवली कडे निघालो. सकाळी सोडायचे आणि संध्याकाळी परत आणायचे असे एकून बाराशे रुपये घेतात, एका बोटीत पंधरा लोक बसू शकतात.
आजूबाजूच्या डोंगरांकडे बघत तासाभराचा प्रवास झाला आणि समोरच बलदंड वासोटा, एका बाजूला त्याला खेटुनच उभा असलेला अधिकच दुर्गम असा जुना वासोटा आणि उजवीकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वरासारखाच दिसणारा खोट्या नागेश्वराचा सुळका दिसू लागले, त्यांचे पाण्यात पडलेले सुरेख प्रतिबिंब टिपण्याची गडबड सुरू झाली. थोड्याच वेळात किनाऱ्याला लागलो, पाच वाजायच्या आत परत या असे बजावून बोटवाला निघून गेला. आम्ही काठाकाठाने चालत वनविभागाच्या कार्यालयात पोहोचलो, तिथे आता रात्री तंबूत रहायची सोय आहे [चारशे रुपये]. तिथल्याच कृष्णा गोरेंना सोबत घेतले आणि वासोट्याची वाट चालू लागलो.
सुरुवाट केली तीच एका झाडाजवळ थांबून लिंबोणीच्या आकाराच्या गुलाबी रंगाच्या आंबोळगी नावाच्या आंबटगोड रानमेव्यावर यथेच्छ ताव मारून. कोरडा पडलेला ओढा दोनदा ओलांडून ओढ्याकाठच्याच मारूतीच्या देवळाकडे पोहोचलो. पावसाळाय्चे चार महिने वासोट्याला जाता येत नाही, आणि त्यानंतरच्या दोन तीन महिन्यात ओढा वाहता असतो तेंव्हा तिथे जाणाऱ्यांना जलवांचा प्रसाद मिळाल्याशिवाय रहात नाही. मारुतीच्या देवळाजवळ पिण्यासाठी पाणी आहे. मे मध्ये तेही कोरडे पडलेले असते.
देवळापासून अतिशय घनदाट जंगलातली पण प्रशस्त अशी गडाची वाट सुरू होते. उन्हासाठी एकमेकांशी स्पर्धा करत शंभर फूट वाढलेल्या वृक्षांची एवढी दाटी, की एवढे कडक उन असून एक तिरीपही वाटेवर येत नव्हती. पक्ष्यांचे आवाज ऐकत, कधी कृष्णाने दाखवलेले झाडांवरचे अस्वलाच्या नखांच्या खुणा बघत, कधी गव्यांचे ठसे न्याहाळत असा आमचा प्रवास सुरू होता. या जंगलात सातशे गवे, भरपूर सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वले, सतरा बिबटे आणि दोन पट्टेरी वाघ आहेत अशी माहिती कळली आणि लोक आपोआपच एकमेकांबरोबर रहायला लागले.
एरवी लवकर किल्ल्यावर जाणे हे लक्ष्य असते. पण इथे या वाटेने चालणे हेही फार मोठे सुख होते. बरेच चढुन झाले की एका ठिकाणि दोन फाटे फुटतात, डावीकडचा वासोट्याकडे तर उजवीकडचा नागेश्वराकडे. अडीच तीन तासात बराच पल्ला गाठून माथ्याजवळ पोहोचलो, मागे वळून पाहिले तर जिथे उतरलो तो जलाशयाचा भाग एखाद्या ठिपक्यासारखा दिसत होता, शेवटचे पंधरा मिनिटे उन्हातून चालावे लागले, ते करून दरवाजाला पोहोचलो. समोरच देउळ आहे, एक तळे आहे, तसेच थोडे आत गेले की वाड्याचे जोते आणि काही अवशेष दिसतात. उजवीकडच्या वाटेने गेलो की अजून एक देउळ, आणि उत्तरेकडे धावत गेलेली एक लोहगडाच्या विंचूकाट्यासारखी माची दिसते. तिकडुन दिसणारा देखावा वर्णन्यासाठी शब्द नाहीत. समोर अक्राळविक्राळ शिखरांच्या रांगा, त्यांना कापत गेलेली नागेश्वराकडे जाणारी थरारक वाट. डावीकडे खोल खोल कोकणात चिमुकली गावं आणि उजवीकडे हिरवकच्च घनदाट जंगल. याचीसाठी केला होता हा अट्टाहास.. असे वाटायला लावणारे स्थळ आहे.
तिथे थोडा वेळ थांबलो, पोटातल्या भुकेची जाणीव होताच पुन्हा दरवाजापाशी येउन आता डावीकडच्या रस्त्याने पुढे गेलो, दोन मोठी टाकी आहेत, पण पाणी पिण्यासारखे उरले नाही. तिथेच जेवण, विश्रांती आटपून जुन्या वासोट्याच्या दिशेने निघालो, भराभर चालता चालता अचानक थबकलो समोर जुन्या वासोट्याचा बाबूकडा आ वासून उभा होता, मध्ये चार हजार फूट खोल खाई, कोकणकड्याची आठवण येईल असेच ते रुद्रभीषण स्वरूप न्याहाळत राहिलो.
तीनच्या सुमारास खाली उतरायला सुरूवात केली, भराभर पळतच उतरलो, मारूतीजवळ पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन बरोबर वेळेवर बोटीसाठी पोहोचलो. थोडा वेळ शिवसागरात पाय बुडवून बसलो. बॉतवाला अंधार होईल, दिसणार नाःई, जाळी पडतील अशा हाका मारू लागल्यावर बोटीत बसलो आणि परतीचा प्रवास सुरू केला. वासोट्याच्या मागे सूर्य अस्ताकडे झुकू लागला होता. कुठे तरी मध्येच एखादा मच्छीमार जाळी टाकण्याच्या कामाला लागलेला दिसत होता, दीड तासात आम्ही बामणोलीला पोहोचणार होतो. पुढच्या वेळेला पौर्णीमेच्या रात्रीच्या मुक्कामाला आल्यास, पाण्याजवळ एका खास ठिकाणी आम्हाला झाडीत लपवून पाण्याला येणारी जनावरे हमखास दाखवण्याचे कृष्णाचे आश्वासन मनात घोळवतच आम्ही वासोट्याचा निरोप घेत होतो.
नरेशने काही फार सुरेख फोटो काढले आहेत, यथावकाश कुठेतरी टाकेनच..