ह्यासोबत
आमच्या जमखंडी गांवापासून सर्वात जवळचे 'कुडची' नांवाचे एम्.एस्.एम्. रेल्वेच्या त्या काळातल्या मीटर गेज लाईनवरचे स्टेशनसुद्धा सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. त्या गांवाला जोडणारा रस्ता होता पण तिथपर्यंत पोचण्यासाठी पूर्वीच्या काळांत कोठलीच सोयिस्कर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसे. त्या मार्गाने जाणारा 'सर्व्हिसची मोटरगाडी' नांवाचा एक प्रकार होता. ती गाडी गांवामधून म्हणजे नक्की कुठून व केंव्हा निघेल, वाटेत कुठे कुठे किती वेळ थांबत थांबत किंवा बंद पडत आणि दुरुस्त होत ती शेवटी कुठे आणि केंव्हा पोचेल याचे कांहीच नियम नसायचे. केवळ ड्रायव्हरच्या मर्जीनुसार ती चालायची. त्याच्या सोबत एक क्लीनर असायचाच, पण गाडी स्वच्छ करण्याचे काम तो क्वचितच करीत असेल. ड्रायव्हरसाठी बिड्या, चहा, पाव, भजी वगैरे आणून देणे, त्याच्याशी गप्पा मारणे, इंजिनात (रेडिएटरमध्ये) पाणी भरणे व मुख्य म्हणजे गाडीच्या समोरून जोर लावून हँडल फिरवून दरवेळी गाडी 'इस्टार्ट'करणे ही कामे तो करीत असे. वाटेत भेटणाऱ्या इतर सर्व्हिस मोटारी व मालमोटारींचे ड्रायव्हर व क्लीनर मंडळींचे बरोबर कुठल्या तरी आडगांवातल्या एखाद्या झाडाच्या आडोशाने बसून बिड्या फुंकत पत्ते कुटणे हा तर या सर्व मंडळींचा आवडता छंद. गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या होत असलेल्या हाल अपेष्टा किंवा त्यांनी केलेल्या आरडाओरडीचा यत्किंचित परिणाम त्यांच्यावर होत नसे. निर्ढावलेले प्रवासी सुद्धा गाडीतून खाली उतरून निवांतपणे आपापल्या चंच्या उघडून तंबाखूचा बार भरीत किंवा बिडी शिलगावीत त्यांच्यात सामील होऊन जात. कुटुंबवत्सल लोक मोठमोठाले टिफिन कॅरियर आणि फिरकीचे तांबे भरभरून खायच्या प्यायच्या गोष्टी नेहमीच प्रवासात बरोबर आणीत. वाटेत कुठे गाडी थांबणार आहे असे दिसले की तिथेच त्यांची पिकनिक सुरू होत असे. मुक्कामाला पोचायची घाई क्वचितच कोणाला असे. त्यातून कोणी तक्रार केलीच तर "गाडीचं इंजिन तापलं आहे, ते थंड झाल्याखेरीज गाडी सुरू होणार नाही" हे डायवरसायबाचे उत्तर ठरलेले असे.
मी लहान असतांनाच एस्.टी.च्या बस गाड्या सुरू झाल्या आणि त्यांचे वेळापत्रक वगैरेसारखी कांही नियमितता त्यांत आली. तरीही रस्त्यांची दुरवस्था व वाटेत आडवे येणारे नदीनाले वगैरेंच्या अनिश्चितता जमेस धरून "शहाण्याने नेहमी एक गाडी मागे ठेऊन आधीची गाडी धरावी" असे धोरण जुन्या काळचे लोक पाळीत असत. रेल्वेमध्ये आरक्षण ही भानगड नव्हतीच. पहिला आणि दुसरा वर्ग सरकारी अधिकारी किंवा फारच श्रीमंत लोकांसाठी असायचा. सामान्यांनी तिकडे पहायचे सुद्धा नाही. इतर सारे डबे तिसऱ्या वर्गाचे आणि सर्वांसाठी खुले असायचे. पण हे फक्त तत्वापुरते झाले. प्रत्यक्षात गाडी मुळात जिथून निघायची ते स्थानक सुटले की डब्यांचे दरवाजे बंद करून व त्यांच्या आंतल्या बाजूला ट्रंकाची चळत लावून ते जे घट्ट मिटायचे ते फक्त एखादे मोठे जंक्शन आले किंवा त्या ट्रंकांच्या मालकांचे उतरायचे स्टेशन आले तरच पुन्हा उघडायचे. मधल्या स्थानकांवरची सारी रहदारी खिडक्यांतूनच व्हायची. त्या काळांत खिडक्यांना गज नसायचे. त्यामुळे पोचवायला आलेल्या मंडळींनी हमालांच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या सामानासुमानासकट बाहेरून खिडकीच्या आंत कोंबायचे आणि त्याचे उतरण्याचे स्थानक आले की डब्यातले इतर प्रवासी त्यांना उचलून आंतून बाहेर ढकलीत आणि त्याचे सामान प्लॅटफॉर्मवर फेकीत.
अशा बिकट परिस्थितीमुळे माझे प्रत्यक्ष प्रवास करण्याचे योग कमीच आले. दिवाळीच्या सुटीसाठी मोठी भावंडे घरी यायची किंवा माहेरपणासाठी बहिणी यायच्या त्यांच्या तोंडून ऐकलेल्या हकीकतीमध्ये या रणधुमाळीतून आपण कशी शिताफीने गाडीत जागा मिळवली याचा वीररसपूर्ण वृत्तात किंवा खिशातले किती पैसे आणि सामानातल्या कोणकोणत्या वस्तु चोरीला गेल्या, हरवल्या किंवा कुठेतरी राहून गेल्या वगैरेची करुण कहाणी, त्यातूनही लहानग्यांची कशी काळजी घेतली याची वात्सल्यगाथा, कुठल्या भल्या माणसाने ऐन वेळी कशी मदत केली याबद्दल कृतज्ञता असे विविध रस असत. युद्धस्य कथाः रम्याः असे म्हणतात, तशातलाच थोडा प्रकार. कदाचित यामुळेच प्रवासवर्णनांची पुस्तके वाचायला खूप आवडायची. पु.ल.देशपांडे यांच्या युरोपच्या यात्रेचे सचित्र वर्णन शि.द.फडणीसांच्या कुंचल्यातून उतरलेल्या मार्मिक रेखाचित्रांसह अपूर्वाई या नांवाने किर्लोस्कर की मनोहर मासिकांत धारावाहिक स्वरूपांत यायला लागले तेंव्हा दर महिन्याला ते वाचण्याची अहमहमिका लागायची.
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिथला जो तो पुढील शिक्षणासाठी परदेशी जायचीच भाषा करतो आहे असे दिसले. सगळ्या परीक्षांमध्ये बऱ्यापैकी गुण मिळत गेले असल्याने कदाचित आपल्यालाही गुणवत्तेच्या आधारावर कुठे तरी जायची संधी मिळणार असे वाटू लागले. तोपर्यंतच्या काळात मी भारतातसुद्धा फारसा प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे मदुराईची गोपुरे किंवा दिल्लीचा कुतुबमीनारसुद्धा न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगइतकेच उंच व दूर भासायचे. 'पुलंच्या अपूर्वाईने चाळवलेले कुतूहल' यापलीकडे परदेशाचे आकर्षणही वाटत नव्हते. तरीही 'जायची संधी मिळालीच तर त्या दृष्टीने पूर्वतयारी केलेली बरी' असे मनात ठरवले.
'देश तसा वेष' धारण करण्यात फारशी अडचण नव्हती. इथेसुद्धा मी शर्ट पँट तर वापरतच होतो. वेळ आल्यावर एखादा सूट शिवून घेतला की झाले. त्याची इतक्यात घाई नव्हती. तिकडचे अन्नपाणी खाण्यापिण्याची संवय कशी करायची? घरातले संस्कार आणि राज्यात असलेली कडक दारूबंदी यामुळे पिण्याचा प्रश्नच येत नव्हता. कँपातल्या हॉटेलांत जाऊन थोडेसे अभक्ष्यभक्षण करून पाहिले. पण हे शिक्षण फार महाग पडत होते, शिवाय जिभेला रुचत नव्हते त्यामुळे फार काळ टिकले नाही. आमची इंग्रजी बोलीभाषा सुद्धा तर्खडकरी स्पष्ट उच्चाराची होती. ती सुधारती कां ते पहावे म्हणून कॉन्व्हेंटमध्ये शिकून आलेल्या मुलांशी गट्टी केली. व्याकरण किंवा शब्दसंभार या बाबतीत ते माझ्यापेक्षा फारसे पुढे नव्हते हे त्यातून समजले. पण बोलण्यातले नखरे, तोरा आणि आंग्लभाषेतल्या शिव्या शिकायला मिळाल्या व त्याने आत्मविश्वास वाढला. तिकडचे लोक बोलत असलेली त्यांची भाषा समजून घेण्यासाठी इंग्रजी सिनेमे पहाण्याचा सपाटा लावला. तो मात्र बराच काळ चालू राहिला.
हळूहळू वरच्या वर्गातल्या मुलांबरोबर ओळख होत गेली. त्यातली कांही मुले परदेशी जाण्यासाठी वेगळ्याच प्रकारची तयारी करीत होती. वेगवेगळ्या कॉलेजांचे व युनिव्हर्सिटींचे फॉर्म मागवणे, ते भरून परकीय चलनातील फीसह तिकडे पाठवून देणे, परकीय चलन मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळवणे, फॉर्मसोबत पाठवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची प्रमाणपत्रे आणि शिफारसी गोळा करणे, 'गेट' व 'टोफेल' नांवाच्या परीक्षांना बसण्यासाठी फॉर्म भरणे, त्यात चांगला स्कोअर होण्यासाठी कसून तयारी करणे वगैरे बारा भानगडी ते करतांना दिसत होते. त्याशिवाय पारपत्र काढणे व परदेशातल्या सरकारकडून व्हिसा मिळवणे अत्यंत जरूरीचे होते. तो मिळवण्यासाठी तिथला सगळा खर्च भागवता येईल इतकी गडगंज रक्कम आपल्यापाशी आहे याचे पुरावे पाहिजेत. ते नसतील तर तिकडे स्थाईक झालेल्या कुणीतरी आपली हमी घेतली पाहिजे. अखेरीस विमानाचे महागडे तिकीटसुद्धा आपल्याच खर्चाने आपणच काढायचे. म्हणजे अगदी दर वर्षी विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवणाऱ्याला सुद्धा गुणपत्रिकेबरोबर विमानाचे तिकीट आपसूक मिळण्याची आशा नव्हती. त्यालाही या सगळ्या दिव्यातून जायलाच हवे.
मला तर त्या वेळी यातले कांहीसुद्धा करणे आंवाक्याबाहेरचे होते. शिवाय नोकरीच्य़ा निमित्याने परदेशी जायला मिळाले तर मिळेलच. तेंव्हा आता कशाला उगाच जिवाला त्रास करून घ्यायचा असा सूज्ञ विचार केला आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा बेत तहकूब करून सध्या तरी आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचे असे ठरवले.
. . . . .. (क्रमशः)