दातात फसलेला आंब्याच्या कोयीचा केस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मन त्यातच अटकून राहतं तसच माझं झालं होत. मी रात्रभर विचार करत होतो, ही श्रुती जोगळेकर कोण?
साहजिकच रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे सकाळी उशिरा उठलो. चहा-नाश्ता उरकून पुन्हा पहिली डायरी हातात घेतली तर मैथिली आली.
"तू अजून आंघोळ नाही केली? यॅक बापा... मी पहा, पहिला नंबर तु कातीन किडा... " असं म्हणत जोरजोरात हसू लागली. तितक्यात आईने 'पाणी गरम झालय रे, अंघोळ उरकून घे' असं म्हणताच 'माकडाच्या हाती कोलित'च मिळाल. मी स्वैपाकघरात शिरलो तर आई ओवाळायची तयारी करत होती.
"ओवाळायचं? आजच? दिवाळीला अजून २ दिवस आहेत न ? "
"आता तु येतोच किती दिवसासाठी ? म्हणतात ना 'साधु-संत येती घरा तोची दिवाळी-दसरा' तसच आता तुझ्या बाबतीत म्हणाव लागेल"
"आज्जी ! विजुकाका साधु-संत झाला ? मला माहितीच नव्हतं. श्रुतीताईला तर मी हे सांगितलच नव्हतं" असं म्हणत ती फिदीफिदी हसू लागली. पुन्हा एकदा श्रुतीचं नाव आलं अन माझं डोकच तडकलं. एकतर ही श्रुती कोण हे अजून मला समजलं नव्हत आणि ही पोरगी मला अजून चिडवत होती. मी तिला पकडायला धावलो पण ती पळाली.
मी कशीबशी अंघोळ उरकली आणि अथर्वशीर्ष उरकून डायरी हातात घेतली. एक डायरी संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. पण श्रुतीचा पुसटसाही उल्लेख त्या डायरीत नव्हता. जेवण झालं आणि मी अधाश्यासारखी दुसरी डायरी हातात घेतली, तोच रवीचा आवाज आला. मलाही त्याच्याशी खुप गप्पा करायच्या होत्या. मुंबईत मी केलेल्या धमाल मजा सांगायच्या होत्या, पण झालं उलटच. माझी जुजबी चौकशी करून त्याने विचारले,
"श्रुतीला फोन केला की नाही ?"
"नाही, फोन नंबर बाबांजवळ आहे. " मी नाराजीने म्हटले.
"अच्छा. पण बाकी काही म्हण ही तुझी मैत्रिण खुप बोलकी आहे. अरे मी तिच्याशी केंव्हा गप्पा करायला लागलो मलाच कळल नाही. " त्यानंतर त्याचं जे 'श्रुती-पुराण' सुरू झालं, की बस रे बस... मी मात्र मलाच माहिती नसलेल्या मैत्रीणीबद्दल 'हुं हुं' करत होतो. त्यात भर पडली ती माधुरीवहिनींची. त्यांना म्हणे त्यांची कोणी जुनी मैत्रीणच भेटल्यासारखी वाटत होती. त्यात आमच्या मांसाहेबांची भर. 'हो ग ! किती गोड पोरगी आहे ती'. मी कितीही डोकं खाजवलं तरी मला कळत नव्हतं ही कोणती माझी मैत्रीण आहे. त्यात शेजारी-पाजारी मला माहीती नसलेल्या माझ्या मैत्रिणीचे गोडवे गात होते. त्यामुळे माझी अधिकच चिडचिड होती होती. कॉलनीत फिरणंसुद्धा कठीण झालं होतं. चला आज बाबा येणार होते. त्यांच्या डायरीतला तिचा पत्ता आणि फोन नंबर पाहीलं की कदाचित आठवल मला. बाबा आले की त्यांना सरळ डायरी मागायची आणि फोन करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असं मी ठरवलं. पण अजून बाबा आले नव्हते. आज संध्याकाळी फिरायला जायच रद्द करायचा विचार होता पण माधुरीवहीनी, नंदुभाउ उगाच मला त्रास देतिल असं वाटलं म्हणून मी बाहेर पडलो.
रात्री आठला परत आलो तरी बाबा आले नव्हते. पुन्हा मी उरलेल्या डायऱ्या काढल्या आणि वाचायला सुरुवात केली. रात्री पावणेबारा वाजले तेंव्हा दार वाजलं. बाबा आले होते. गाडी मध्येच बिघडल्यामुळे आणि दिवाळीच्या गर्दीमुळे दुसरी गाडी न मिळाल्यामुळे उशिर झाला होता. आता इतक्या रात्री त्यांना डायरी मागणं मला प्रशस्त वाटलं नाही. आणि नंबर मिळुनही इतक्या उशीरा फोन थोडीच करणार होतो?
ती ही रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी आळश्यासारखा १० वाजता उठलो. बघतो तर काय बाबा पुन्हा गायब ! मला वाटलं बाजारात गेले की काय. आईला विचारलं तर म्हणाली,
" अरे अंजीचे पांडे माहीती आहे न तुला ?"
" त्यांचं काय? " आईची गाडी पुन्हा भरकटली की काय असं मला वाटलं.
"त्यांचा मुलगा आला होता. लग्नाची बोलणी करायची आहे आणि मुहुर्त काढायचा होता म्हणून गाडीवर घेउन गेला, येतील जेवायच्या वेळेपर्यंत ! "
मी एक मोठा सुस्कारा सोडला. त्यापेक्षा जास्त मी त्यावेळी काहीही करू शकत नव्हतो. मी चहा घेउन उरलेली माझी अर्धी डायरी संपवली. चार डायऱ्या, फोन नंबरच्या डायऱ्या, माझी डिजिटल डायरी सगळं काही शोधून झालं. इतकच नाही तर दोन - चार एम. एस्सी. च्या मित्रांनाही फोन करून झालं, पण श्रुती कोण हे मला अजुनही समजलं नव्हतं.
जेवायच्या वेळेपर्यंत बाबा आलेच नाही, त्यामुळे माझी चिडचिड अधिकच वाढली होती.
" करा , दुसऱ्यांच्या मुलांचे लग्न करा, त्यांच्या घरी बारश्याला जा.... स्वतःचा मुलगा लग्नाचा झालाय हे काय मी सांगायचं का?" मी मनाशीच बडबड करत होतो. शेवटी मला न आवडणारी भेंडीची भाजी खाल्ली हे मला भाजी संपल्यावर कळलं. शेवटी मी फस्ट्रेट होउन झोपून गेलो. रात्री झोप न झाल्यामुळे कदाचित असेल, मला गाढ जोप लागली. मी उठलो तेंव्हा ५ वाजले होते. बाबा चहा घेत होते. मलाही चहाची खुप गरज होती. चहा घेता-घेता बाबांनी लग्नाच्या बोलणीत झालेली गंमत सांगितली तसं मी पोट धरून हसू लागलो. अचानक बाबांना काहीतरी आठवलं. त्यांनी स्वतःची बॅग काढून डायरी माझ्यासमोर धरली. ते नंदुभाऊंनी बघितलं. त्यांनी चान्स सोडला नाही.
"डायरी मिळाली वाटते. "
मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. 'जे' च पान काढलं. त्यात काळ्या शाईच्या पेनने टपोऱ्या मोत्यासारख्या अक्षरात लिहिलं होतं, "कु. श्रुती अरुण जोगळेकर ", पुढचा पत्ता वाचताच मी अधिकच गोंधळात पडलो. "बुधवारा, अमरावती".
'बुधवारा', अमरावतीचा अतिशय जुन्या वस्तीचा भाग. या भागात नवीन व्यक्तीला एखाद्याच्या घरी जातांना जसा पत्ता विचारावा लागतो तसा तिथून परत येतांनाही विचारावा लागतो इतका गल्लिबोळाचा भाग. अमरावतीला चार वर्ष होतो पण या भागात कधी जायचं कामही पडलं नाही, आणि इच्छाही झाली नाही.
मी अमरावतीच्या सगळ्या मैत्रीणींकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने जाउन आलो होतो, पण बुधवाऱ्यात जायच कधिच काम पडलं नव्हतं. पत्ता मिळुनही, माझा प्रश्न तसाच होता,
"ही श्रुती जोगळेकर कोण?"
(क्रमशः)